Monday, 15 February 2016

** घरकुल **

 आज मी खरेच अवाक् झालोय्. !
सर्वसामान्यांप्रमाणे जीवन घालवणारे आपण ....शिकतो, नोकरी किंवा उद्योग करतो. लग्न करतो, कुटुंबाच्या रहाटगाडग्यात गुंतवून धेतो. काळजी, संकटे, ओढाताण या फे-यातून काही आनंदाचे क्षण शोधण्याचा प्रयत्न करतो. शरीर धडधाकट असतं. मन, बुद्धी शाबूत असते. त्या दृष्टीने आपण श्रीमंत असतो.
         पण .... शरीराच्या एखाद्या अवयवाला अपंगत्व आले तर काही अंशी कुटुंबावर अवलंबून असतो. असे अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सहाय्याद्वारे स्वावलंबी होऊ शकतात.
             परंतु ' मतिमंदां ' च्या बाबतीत ' समजणं ' ही प्रक्रियाच नसते. त्यामुळे ते पालकावर सर्वस्वी अवलंबून असतात. तीव्र मतिमंदत्व असेल तर त्यांना जगविण्याची जबाबदारी पालकांवर येते. अशावेळी आई वडील नसले तर.... त्यांचा सांभाळ इतर नातलग कसोशीने करु शकत नाही.
                डोंबिवलीत 'खोणी ' या गावी अशा मतिमंद व्यक्तींचा सांभाळ तहहयात करण्यासाठी पालकांनी एकत्र येऊन ' अमेय पालक संघटना ' ही संस्था स्थापन केली आहे. शासनाकडून कोणतेही अनुदान न घेता सुजाण व सहृदय हितचिंतकांच्या पाठबळावर सुरु आहे.
              आज ' कुबेर ' स्नेही चंदूकाका सीएम जोशी यांच्यामुळे मला या ' घरकुलाला' भेट देण्याचा योग आला. आणि मी खरेच धन्य झालो. मतिमंदांच्या विश्वात डोकावण्याची, त्याना जाणून घेण्याची संधी प्राप्त झाली.
                 उजाड माळरानावर अथक परिश्रमाने आज नंदनवन फुलले आहे. प्रशस्त इमारत, अतिशय नीटनेटका परिसर, फळझाडे, फुलझाडे, बाग मन मोहून घेते.
          अविरत सेवा देणारे श्री अशोक वल्लभदास यांनी पूर्ण इमारत व परिसर फिरून दाखवला. तिथल्या मुलामुलींना पाहून, भेटून  मी स्तिमित झालो. अतिशय स्वच्छ, नीटनेटके आणि शिस्तबद्ध वागणे पाहून मला सामान्यांशी तुलना करण्याचा मोह आवरला नाही. त्यांचे स्वच्छ टॉयलेट पाहून मला सार्वजनिकच नव्हे तर इतर कोणत्याही संस्थेतल्या टॉयलेटची आठवण आली.
       मुदपाकखाना, भोजनगृह पंचतारांकित टापटिपीचे ! काही विद्यार्थ्यांना स्वत:च्या हाताने जेवताही येत नाही. तिथलीच एक मतिमंद मुलगी त्याला आपल्या हाताने भरवीत होती. ते पाहून माझे डोळे पाणावले. काका, काका करीत मुले बिलगत होती तेव्हा जाणवले की यांना फक्त मायेचा ओलावा हवा आहे. काही मुले तिशी, चाळिशी ओलांडलेली सुद्धा आहेत. प्रथम दाखल होणारा प्रकाश शेनोलीकर म्हणतो की ही इमारत मी बांधली तेव्हा त्याचे कौतुक वाटते कारण भूमीपूजनाची पहिली कुदळ त्याने मारली असते. येथल्याच एका मुलीने चित्रपटात काम केले म्हटल्यावर तुम्हाला ती व तो चित्रपट आठवला असेलच....
                खरंच मित्रांनो.... आपल्या भेटीने या मुलांना एक वेगळाच आनंद व समाधान मिळते. आपण आपल्या मुलांना यांना भेटायची, यांचे आयुष्य जाणायची एक संधी द्या. मला खात्री आहे की तुम्ही तुमच्या मुलांवर दुपटीने प्रेम करु लागाल.
       
सुरेश इंगोले**

Saturday, 13 February 2016

व्हेलेन्टाईन डे.

अगदी ठरवून
ठराविक दिवशी
ठरलेलं
किंवा न ठरलेलं
प्रेम
करायला
...... हृदयात आवेग असतो ?
की नुसताच
                  भोग असतो ?

उथळ प्रेमाचे प्रदर्शन करायला
मात्र
' व्हेलेन्टाईन डे ' चा योग असतो.


* सुरेश इंगोले *

Wednesday, 10 February 2016

होस्टेल लाईफ

*  होस्टेल लाईफ  *
                               -------------------

     होस्टेल लाईफची मजाच काही और असते. ज्याने ते अनुभवले तो पुढील आयुष्यात परिपक्व होतो. माझे कॉलेजचे पहिलेच वर्ष. होस्टेलचेही पहिलेच वर्ष. आर्वीसारख्या लहानशा गावातून आम्ही सात जण नागपूरला शिकायला आलो. शालेय जीवनात अभ्यासाबरोबर दांडगाई सुद्धा भरपूर केली होती. त्यामुळे बुजरेपणा नव्हताच.

           पहिल्याच दिवशी रुमपार्टनरने मला रँगिंगची कल्पना दिली होती. पण आम्ही शिताफीने सीनियर मुलांशी अदबीने, प्रेमाने वागून त्यांची मने जिंकली होती. रोज एक दोघांचा नंबर लागायचा. वाट्टेल ते प्रकार केले जायचे. आमची मात्र सुटका होत असे. पण फायनलच्या एका बिहारी मुलाच्या हे लक्षात आले.

           एक दिवस त्याने मला हाक मारून मधल्या चौकात उभे केले. सगळे गोळा झाले होते.
" चल, कान पकडके मुर्गा बन जा."  त्याने फर्मान सोडले.
" मुझे नही आता मुर्गा बनना."
" क्यों ? स्कूल में कभी मुर्गा नही बना क्या ?"
" नही , कभी नौबतही नही आयी. मुर्गा कैसे बनते है, तुम बनके दिखाओ."
अनवधानाने त्याने उकिडवे बसून पायातून हात घालून कोंबडा बनून दाखवले. सगळे खदखदा हसू लागले. आपली फिरकी घेतली गेली हे त्याच्या लक्षात आले. तो चिडून मला मारायला धावला तसे त्याला सीनियर्सनी धरले. " छोड दे उसे. सीधासादा बच्चा है "
" फिर उसे कभी छेडना मत." दुस-याने त्याला बजावले.
पण...... त्याने मनात डूख धरून ठेवला. कॉलेजच्या आवारात त्याने एकदोनदा मला पकडण्याचा प्रयत्न केला पण माझी सात आठ जणांची गँग पाहून थबकला. याचा सोक्षमोक्ष लावावा म्हणून एकदा आम्ही त्याला वॉर्निंग दिली. पण त्याला स्वत:च्या फजितीचा वचपा घ्यायचाच असेल, त्याने मला त्रास द्यायचे थांबवले नाही.

           मार्च महिन्यात आमची अभ्यासाची जागरणे सुरू झाली. तो रोज रात्री आमच्या खोलीत येऊन दूध पिऊन टाकायचा. मग आम्हाला काळा चहा प्यावा लागे. एक दिवस माझ्या मित्राने मला भांग आणून दिली. दुधाच्या ग्लासात भांग टाकून काजू बदाम वगैरे टाकून ग्लास झाकून ठेवला. नित्याप्रमाणे त्याने दूध पिऊन टाकले. आणि मधल्या चौकातल्या एका खाटेवर झोपला.
          रात्री दोनच्या सुमारास आम्ही उठलो. त्याच्या अंगावरचे सर्व कपडे काढले. एक चादर पांघरून त्याला खाटेला दोराने घट्ट बांधले. ती खाट चौघांनी उचलून वर टेरेसवर नेऊन टाकली. आणि रुममध्ये येऊन झोपलो.

           सकाळी खूप गलका ऐकू येऊ लागला. आम्ही उठून बाहेर आलो. तो सर्वांना कपडे मागत होता. त्याला सोडवू देत नव्हता. एकदोघांनी त्याची चादर हटवून पाहिली आणि हास्याचा जो धबधबा कोसळू लागला की सारे होस्टेल त्यात सामिल झाले.

           पुन्हा त्याने कधीच कोणाला त्रास दिला नाही.

                                                                          _____        सुरेश इंगोले

#कुबेर_हम_भी_है_जोश_मे
With संतोष जगन्नाथ लहामगे,
अनिल हंबीर,
Amey T Sonawane

Tuesday, 9 February 2016

** बुवाबाजी **

**  बुवाबाजी  **
                                   --------------

       अंधश्रद्धा व बुवाबाजी यांचा जवळचा संबंध असतो. देवभोळ्या लोकांच्या अज्ञानाचा फायदा कसा घेतला जातो हे मला अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करीत असताना वेळोवेळी जाणवले. बरेचसे प्रयोग मी शिकून घेतले होते. जाहीररित्या ते प्रयोग करून आम्ही समाजप्रबोधन करीत असू.
       
        ८०च्या दशकात ही अंधश्रद्धा बरीच पसरली होती. मी भंडारा जिल्ह्यात निर्मूलनाचे कार्य करीत असताना तिकडे वर्धा जिल्ह्यात आमच्या खेड्यात कुणी एक शंकरबाबा अवतरले होते. आणि कहर म्हणजे माझे वडील त्यांच्या नादी लागले होते. प्राथमिक शिक्षक असलेले माझे वडील बुवाच्या नादी लागतील अशी शंकाही मला आली नव्हती. पण भावाने मला याची कल्पना दिली व मी चकित झालो. त्या बाबाने गावातील काही मुलींना नादी लावल्याचे कळल्यावर तर माझी सटकलीच. याचा बंदोबस्त करायचाच असे ठरवून मी तयारीला लागलो.

      दोन तीन दिवस सुट्या घेऊन मी गावी गेलो. रात्री आईकडून कळले की उद्या म्हणजे रविवारी आपल्या घरीच बाबांचा दरबार आहे. मी मनातल्या मनात योजना तयार करीत राहिलो. दरबारात काय काय घडत असतं याची माहिती घेतली.
     दुस-या दिवशी मी सकाळी सगळं आवरुन शेतावर गेलो. आमचा सालकरी गडी भेटला. तो बराच लुबाडला गेल्याची  मला माहिती होती. त्याच्याशी बोलल्यावर त्याला घरी यायला सांगितले. मी घरी परतलो . बघतो तो आमचे अंगण भक्तगणांनी फुलून गेले होेते. मी कसाबसा मार्ग काढीत पडवीत आलो. चौरंगावर शंकरबाबा बसले होते. त्यांची पूजा सुरु होती. मला पाहताच दादाजी ( वडील) म्हणाले, " महाराज, हा माझा मोठा मुलगा सुरेश. पाया पड रे महाराजांच्या." मी उभाच होतो. त्यांचा अंदाज घेत होतो.
       " अरे पाया पड ना !" दादाजी पुन्हा म्हणाले. मी आईच्या व नंतर दादाजींच्या पाया पडलो. बाबांच्या पायावर मी डोके ठेवत नाही हे पाहून वडील चिडले. ते काही बोलणार तोच मी बोलायला सुरुवात केली.
    " दादाजी, मी तुम्हा दोघांशिवाय कधी कोणाच्या पाया पडत नाही हे तुम्हाला माहीत आहे. मी या बाबांना मानीत नाही."
     एकजण म्हणाला, " बाबांचे चमत्कार तुम्हाला माहीत नाही. बाबा, यांना प्रसाद द्या !"
बाबांनी हवेतून हात फिरवून माझ्या हातावर पेढा टाकला.  मी तो त्याच माणसाला दिला आणि हवेतून हात फिरवून त्याच्या हातावर एक सफरचंद टाकले. तो आणि इतर सगळेच अवाक झाले.
 "असले चमत्कार मीही करतो. " बोलता बोलता एका तंबाकू मळणा-या इसमाच्या हातावर भिंतीचा चुना नखाने खरडून टाकला व खायला सांगितला. ' चुना साखरेसारखा गोड लागतो ' असे त्याने सांगितल्यावर मी आणखी चार पाच लोकांच्या हातावर भिंतीचा चुना टाकला.

     वातावरण चांगलेच तापल्याचे जाणवल्यावर मी माझे ठेवणीतले अस्त्र काढले. मंत्राने अग्नी पेटवून दाखवा मग मी तुम्हाला मानतो असे बाबांना आव्हान दिले. हल्ली असे मंत्र उपलब्ध नाहीत वगैरे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि मी माझे शेवटचे आव्हान दिले. तुम्हाला मंत्राने अग्नी पेटवता येत नसेल तर मी पेटवून दाखवतो मात्र असे झाले तर तुम्हाला हा गाव सोडून जावे लागेल.

     काही क्षण नीरव शांतता पसरली. मग हळूहळू जमाव उत्तेजित होऊ लागला. अग्नी पेटवा नाहीतर गाव सोडा असे नारे लागू लागले.  नाईलाजाने बाबा तयार झाले. मी तयारीला लागलो. एकाला अगरबत्तीचा गुल एका कागदावर काढायला सांगितला. दहा बारा अगरबत्त्या त्याला दिल्या. विटांचे कुंड तयार करुन त्यात तो अगरबत्तीचा गुल असणारा कागद ठेवला. त्यावर काटक्या रचून समिधा नीट रचल्या. गोव-यांचे तुकडे वगैरे ठेवून झाल्यावर माझ्या भावाला तुपाची वाटी आणायला सांगितली.
 मी आसन मांडून बसल्यावर गायत्री मंत्राचा जप सुरू केला. व पळीने वाटीतले तूप सोडायला सुरुवात केली.
         बराच वेळ होऊनही धूर निघेना तसा माझा धीर सुटत चालला. प्रयोग फसतो की काय असे वाटले. पण चिकाटीने तूप सोडणे व मंत्र म्हणणे सुरूच होते. आणि........
धूर निघायला सुरुवात झाली . लोकांनी टाळ्या वाजवणे सुरु केले. आणि शेवटी अग्नी प्रदीप्त झाला. कुंड धडाडले. मी कुंडाला नमस्कार केला. उठून उभा राहिलो तो बाबाजी निघून जात होते. लोक जोरजोरात माझ्या नावाने ओरडत होते.

       अशा रितीने गावातील बुवाबाजी संपली. वडील बरेच दिवस अबोल राहिले. भाऊ मला वारंवार विचारत होता, " बाबा, सांग ना ! आग कशी पेटली ?"
शेवटी त्याला गुपित सांगितले. तुम्ही कुणाला सांगणार नाही ना !!
ज्या कागदावर अगरबत्तीचा गुल काढला होता त्या कागदावर मी पोटँशियम परमँगनेट मिसळले होते. दोहोंचा रंग काळा असल्यामुळे कळत नव्हते. तुपाच्या वाटीत तूप नसून ग्लिसरीन होते. ते तुपासारखेच दिसते. ग्लिसरीनचा स्पर्श जेव्हा पोटँशला होतो तेव्हा अग्नी पेटतो.

                                                                         सुरेश इंगोले

#कुबेर_हम_भी_है_जोश_मे
With... संतोष जगन्नाथ लहामगे,  अनिल हंबीर,  Amey T Sonawane

#कुबेर_हम_भी_है_जोश_में मावशी आली धावून ..... ---

#कुबेर_हम_भी_है_जोश_में

 मावशी आली धावून .....
------------------------
                                 स्वत:ची फजिती सांगायला धाडस लागते म्हणे. तेव्हा म्हटले सुरवात फजितीपासूनच करावी.
                                  चाळीस वर्षापुर्वीची गोष्ट. १९७५ मध्ये आमचे लग्न झाले. नवी नवरी घरात आली. आठ दिवसांनी चुलत भावाचे लग्न होते. त्यामुळे आठ दिवस ती घरात असूनही तिच्याशी बोलण्याची संधी मिळत नव्हती कारण संपूर्ण घर पाहुण्यांनी भरलेले आणि संधी मिळाली तरी बोलण्याचे धाडस नव्हते. तो काळ असा होता की वडीलधा-यासमोर बोलताही येत नसे.
     
                                 माझी मुंबईची मित्राची बायको संधी मिळवून द्यायचा आटोकाट प्रयत्न करीत असे. पण आम्ही मुलींच्या बाबतीत लाजाळूचं झाड. माझी थट्टा टोकाला जायची पण मी घाबरून शेतात पळून जाई. माझा चुलत भाऊ तिची खूप चेष्टा करायचा आणि ती ही त्याला  प्रत्युत्तर द्यायची. असे आठ दिवस निघून गेले. आम्ही दुरूनच आमच्या सौ ला केवळ बघत बसायचो.
                           
                                 चुलत भावाच्या लग्नाला परत अमरावतीला गेलो. ( माझे लग्नही अमरावतीलाच झाले होते.) लग्नाच्या सगळ्या विधीत 'ही' एवढी उठून दिसत होती की अस्मादिकांचं लक्ष इतरत्र नव्हतंच. नव्या नवरीला घेऊन परत गावी आलो. दुस-या दिवशी पूजा घातली गेली. दोन जोडपी पूजेला बसलेली. माझा भाऊ अधून मधून त्याच्या बायकोशी बोलायचा तेव्हा मी त्याच्यावर डोळे वटारायचो. तो हसायचा.

                                  दुस-या दिवशी अमरावतीला पूजेसाठी जायचे होते. आम्ही चौघे म्हणजे दोन्ही जोडपी ट्रेनने निघालो. माझा भाऊ प्रवासात दोघींशीही मनसोक्त गप्पा मारत होता. पण प्रवासात सुद्धा मी तिच्याशी बोललो तर कुणी पाहील तर नाही ना ही धाकधूक. वेडेपणाचा कळसच ! मधे एका स्टेशनवर चहा घेताना मी भावाला म्हटले, " भास्कर, चहा हवा का विचार तिला." तो म्हणाला, " अरे ! तू विचार ना !" तर मी डोळे वटारले.

                                  अमरावतीला पूजा आटोपली. दुस-या दिवशी सकाळी अंबादेवीच्या मंदिरात ओटी भरायला  जायचे होते. रिक्षात बसून निघालो. काहीतरी बोलायचे म्हणून मी हिंमत करुन विचारले," ओटी भरून लगेच निघायचे ना? " " थोडी खरेदी करायची आहे. " ती हळूच म्हणाली.

                                  ओटीभरण व पूजा आटोपल्यावर आम्ही बाजूच्या  मार्केटमधे गेलो. ती उत्साहाने दुकाने फिरू लागली. मला एक परिचित भेटले त्यांच्याशी गप्पा मारण्यात मी दंग झालो.   त्या काळी विमा एजंट असल्यामुळे मी प्रत्येकाला गि-हाईक समजून वागायचो. त्यामुळे बराच वेळ आमच्या गप्पा रंगल्या. तेवढ्यात ती आली व मला म्हणाली, " पन्नास रुपये हवे होते. " मी खिशातील पन्नास रुपये तिला दिले आणि माझ्या डोळ्यासमोर वीज चमकली.

                                  माझ्या खिशात  फक्त दहा रुपये उरले होते. घरून निघताना मी खिशात किती पैसे आहे ते पाहिलेच नव्हते. घरून पैसे घेतलेच नव्हते. मला दरदरुन घाम फुटला. आता काय करायचे.!

                                 रिक्षा करून आम्ही तिच्या माहेरी आलो. माझ्यासमोर एवढे संकट होते की रिक्षात तिच्या होणा-या स्पर्शाने सुद्धा माझ्या चित्तवृत्ती फुलल्या नाहीत. गावी कसे जायचे ? तिकिटाला पैसे कुठून येणार ? कुणाला मागायचे ? शरमेने काळाठिक्कर पडायची वेळ आली होती. रिक्षाचे पैसे चुकवून  घरात आलो.

                                 खिसा आता पूर्ण रिकामा झाला होता. मी घाम पुसत सोफ्यावर बसत होतो तोच आतून एक महिला बाहेर आली. माझ्याकडे बघून हसू लागली. " काय रे, ओळखलंस ना !"  तिच्याकडे निरखून बघत मी म्हणालो, " तू  मालती मावशी ना ! " तिने हसत हसत आपल्या मिस्टरांची ओळख  करून दिली. " अरे हे आशाचे भाऊ लागतात ...दूरचे "  मी चकित झालो. म्हणालो, " म्हणजे तू  माझी मावशी आणि हिची वहिनी का ?" सगळे हसू लागले.

                                मी क्षणभर स्वत:ची व्यथा विसरलो.  त्यांच्याशी गप्पांमध्ये रमलो. परत चिंता पोखरू  लागली तेव्हा एक मार्ग सुचला की भावाला भेटून काहीतरी मार्ग निघेल. तेवढ्यात एक नातलग येऊन सांगू लागले की माझा भाऊ त्याच्या सासरी खेड्यावर गेलाय. माझे उरले सुरले अवसान गळाले.

                                आमच्या बोळवणीची पूर्ण तयारी झाली होती. सगळं सामान बांधून तयार झालं. रिक्षा आणायला कुणीतरी गेलं. मी रडकुंडीस आलो होतो. शेवटी विचार केला की प्रोफेसर साहेबांस ( सौ चे मोठे बंधू) स्पष्ट कल्पना द्यावी. होऊ झाली फजिती !

                                निघताना मी इतर ज्येष्ठांसोबत मावशीच्या पाया पडलो. " जोडीने पाया पड रे " मावशी म्हणाली. आम्ही पाया पडताच मावशीने माझ्या हाती शंभराची नोट दिली. त्या काळात .....शंभराची नोट.....

        मंडळी....! माझी अवस्था काय सांगू !  आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन....साला मै तो साब बन गया ! आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. माझ्या डोळ्यासमोरून सारा घटनाक्रम सरकू लागला. आणि सगळी भीड सोडून मी बेधडक बायकोशी बोलायला सुरवात केली. भीड चेपल्यावर मी तिला माझी अवस्था विशद केली ......
                 
                     आणि ती सहज म्हणाली," माझ्याकडे होते की पैसे...मला विचारायचे की !"
       माझाच पोपट झाला.........

                                                                       सुरेश इंगोले

अनिलहंबीर
Amey T Sonawane

With...
 संतोष जगन्नाथ लहामगे

Tuesday, 15 December 2015

न्यायदेवता अंध असे, ती पाही साक्षी पुरावे |
त्यामुळेच का मानवामधे येती नित्य दुरावे ?

Tuesday, 13 October 2015

एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे

थारेपालट :=
                         भर दुपारच्या उन्हाने जीवाची काहिली होत होती. कुलरच्या समोर बसले तरच गार हवा लागत होती. इतरत्र वातारणातली तप्तता जाणवत होतीच. रुपाने घाम पुसत केबिनमध्ये प्रवेश केला.खुर्चीवर बसून ती आधी गार पाणी प्यायली. मग तिने घरी फोन लावला. ब-याच वेळाने नलिनीने फोन उचलला.
" नलू, किती वेळ लावलास फोन उचलायला ? कुठे गेली होतीस ?  " तिने चिडून विचारले.
" ताई ! तन्मय बाबाला आणायला गेले होते शेजारी... फोनची घंटी ऐकून परत आले." नलिनी म्हणाली.
" आला का तन्मय ?"
" नाही. तो खेळण्यात रमलाय. यायलाच तयार नाही."
" नवीनच खूळ शिरलंय याच्या डोक्यात. बरं मी आल्यावर बघते. लक्ष ठेव त्याच्यावर." रुपाने फोन कट केला. त्याचवेळी आशिश दार ढकलून आत आला.
" काय रुपा, वैतागलेली दिसतेस ?" त्याने हसत विचारले.
" अरे, काय रे हा तुमच्या नागपूरचा उकाडा ! कसे राहता रे तुम्ही येथे ? मी तर सहा महिन्यात कंटाळले बाबा. कसे काढेन मी येथे काही वर्षे ?" रुपा वैतागून म्हणाली.
" होईल गं सवय हळूहळू. इथला कडक हिवाळा अनुभवला, आता उन्हाळ्याचा अनुभव घे. मग पावसाळ्याचा...."
" कसले टोकाचे ऋतु आहेत रे इथले...! हिवाळ्यात कडाक्याची थंडी...आता ४२ / ४५° चे ऊन..माय गॉड..! " रुपा बोलत असतानाच आशिश हसू लागला. " तुमच्या पनवेलचे वातावरण मीही अनुभवले आहे. फरक तर पडणारच. बरं, शेजारी कसे आहेत ? जात असतेस की नाही त्यांच्याकडे ?"
" चांगले आहेत. मी उगीचच गैरसमजुतीने एवढे दिवस अलिप्त राहिले. थँक्स हं आशिश. "
" चालतं गं...देर आये दुरुस्त आये...तन्मयला आवडतं का त्यांचं घर ?"
" आवडतं ? अरे तो तेथेच असतो नेहमी. बरं नाही वाटत रे...त्यांना काय वाटेल ?"
" काही नाही वाटणार .लहान मुलांनी भरलं घर आहे ते. बरं ...उद्या शेखरला घेऊन जेवायला ये. संध्याकाळी विद्या फोन करीलच तुम्हा दोघांनाही " आशिश उठत म्हणाला. ती काही बोलणार तोच ' नो कमेंटस् ' म्हणत तो बाहेर पडला.
          × × × ×
                   
             आशिश हा शेखर व रुपाचा मित्र होता. मुंबईला शिकत असताना रुपा व आशिश वर्गमित्र होते. कॉम्प्युटर सायन्समध्ये दोघांनीही एकदमच पदवी घेतली होती. आशिशच्या नागपुरी भाषेला सुरवातीला सगळे हसत. पण हळूहळू तो रुळला होता. शेखरचे बी.टेक.पूर्ण होताच त्याला दुबईला जॉब ऑफर मिळाली. रुपाशी लग्न करूनच दुबईला जावे असे शेखरला वाटले. त्याने आशिशच्या मदतीने सगळे जुळवून आणले. शेखरच्या आई बाबांचा आशिशवर खूप जीव होता. त्याचा स्वभावच लाघवी होता.
              रुपा उच्च मध्यमवर्गीय आईबापाची एकुलती एक मुलगी होती. लाडात वाढलेली, जिद्दी, एककल्ली ! त्याउलट शेखर भरल्या कुटुंबातून आला होता. पनवेलला त्यांचा मोठा वाडा होता. आजी, आजोबा, आई वडील, दोन काका, काकू, आणि भावंडं....चुलत भावंडांची लग्ने झाली होती, त्यांची लहान मुले....असे सगळे एकत्र राहत. हसणे, खिदळणे, रुसवे फुगवे, थट्टा मस्करी, रागावणे ,भांडणे या सगळ्यातून सारे कुटुंब एका अतूट नात्याने बांधले गेले होते. लहान मुलांच्या बागडण्याने सगळा वाडा फुलून येत असे.
          आशिशच्या मध्यस्थीने शेखर व रुपाचे लग्न झाले. रुपा या घरात आली. तिला या वातावरणाची सवय नव्हती. प्रत्येकाला स्वतंत्र बेडरुम असले तरी रात्र सोडली तर दिवसभर एकमेकाशी बोलायलाही संधी मिळत नसे. रुपा फारशी कोणात मिसळत नसे. तिला घरातील नाती सुद्धा कळत नव्हती. तिला लवकरात लवकर हे घर सोडावेसे वाटत होते. दुबईच्या संधीने तिची वाट मोकळी केली.
           दुबईत दोन वर्षे काढल्यावर ते पुन्हा मुंबईत आले. पुन्हा त्या वाड्यात राहावे लागेल म्हणून ती नाराज होती पण तन्मयची चाहूल लागली होती. तिचे लाड कौतुक पुरवणे सुरु झाले, तशी ती सुखावली.
              तन्मयच्या जन्मानंतर काही काळ तिला जड गेला. शेखरला ऑफिसच्या कामानिमित्त जर्मनीला जावे लागले. सहा महिने तो तेथे होता. त्या सहा महिन्यात तिला घरच्यांशी जुळवून घेणे फार जड जाऊ लागले.
            ती बरेचदा माहेरीच राहत असे. तिच्या एककल्ली स्वभावाची आता सर्वांनाच कल्पना आली होती.
         दोनच वर्षांनी शेखरला नागपूर ब्रँचचा हेड म्हणून संधी मिळाली. तो नागपूरला निघून गेला. रुपा माहेरीच होती. ती सासरी राहायला तयारच नव्हती.
           एक दिवस तिला आशिशचा फोन आला. त्याने तिच्यासाठी जॉब पाहिला होता. ती आनंदून गेली. तिने लगेच नागपूरची तयारी केली.
                         ×××××××××××
  आशिशच्या मदतीनेच त्यांना रामदासपेठेत एक चांगले घर मिळाले. पण रुपा कधी कोणाशीही मिळून मिसळून वागत नसे. आशिशने तिला नेहमी म्हणत असे," अगं, जरा शेजा-यांशी बोल, ओळखी काढ..त्यामुळे तुला व तुझ्या कुटुंबाला करमेल.." त्यावर ती म्हणायची, " छी: ! अरे काय ती त्यांची भाषा...त्यांचे मोठ्या आवाजात बोलणे...पोरांच्या शिव्या व त्यांचे खेळ....शी:!  मी तर माझ्या तन्मयला शेजारच्या पोरांत मिसळूच देत नाही."
" आम्ही नागपूरकर जरा मोकळ्या स्वभावाचे असतो. अघळपघळ बोलणे...वागणे.. ! पण तू तर आम्हाला तुच्छतेनंच झिडकारलं... एकदा शेजारी थोडे संबंध वाढव मग त्यांचा शेजारधर्म बघ...."
" नको रे बाबा, इकडची भाषाच माझ्या अंगावर काटा आणते.."
" नाही रुपा ! असे म्हणू नकोस ! प्रत्येक भागात एक अस्सल प्रादेशिक भाषा असते. तिचेच आपल्यावर खरे संस्कार असतात. पुस्तकी भाषा आपण शाळेत शिकतो. महाराष्ट्रभर संवादाचे माध्यम जरी पुस्तकी भाषा असली तरी आपले संस्कार मूळ भाषेतच आपल्यावर झालेले असतात. आई, बाबा, काका, काकू, आजी, आजोबा सगळ्यांशी आपले जिव्हाळ्याचे नाते असते. या जिव्हाळ्याने, आपुलकीने घर आपल्याला बांधून ठेवते, लळा लावते." आशिश भावनावश होऊन म्हणाला होता.
          एकदा आशिशकडे शेखर व रुपा जेवायला आले होते. आशिशच्या मुलाचे ...कैवल्यचे व तन्मयचे चांगले मेतकूट  जमेल असे वाटले होते पण घडले भलतेच. कैवल्यची सारी खेळणी तन्मयने हिसकावून घेतली. तो कैवल्यला खेळूच देईना. शेखर रागावला. रुपा चिडून मारायला धावली. तिला आशिशने आवरले.
" अरे, हा नेहमी असाच वागतो. आपली कोणतीही वस्तु कोणालाच देत नाही. शेअरींग नाहीच याच्याकडे.." रुपा चिडून म्हणाली.
" सोप्पं कारण आहे रुपा. तो एकटाच असतो म्हणून एकलकोंडा झालाय. त्याच्या वयाच्या मुलांमध्ये तो राहू लागला की आपोआपच शेअरींग येईल त्याच्यामधे."
" मी काय म्हणते रुपाताई... तुम्ही आता दुस-या बाळाचा विचार करा. म्हणजे तन्मयला खेळायला एक बाळ येईल." विद्या हसून म्हणाली तशी रुपाने तिला धपाटा घातला. सगळे हसू लागले.
                           ×××××××××××××
    आशिशने रुपाला एकदा बळजबरीने तिच्या शेजारी नेले. घर फार मोठे होते त्यापेक्षाही घरातील सर्वांची मने फार मोठी होती. डॉक्टर काका फारच प्रेमळ होते. काकू तर खूपच लाघवी होत्या. त्यांचा मुलगा महेश शेखरच्याच वयाचा होता. तो आणि त्याची बायको मनाली दोघेही डॉक्टर होते. स्वभावाने खूप चांगले. अगदी थोड्या वेळातच रुपा त्या कुटुंबात मिसळून गेली. एवढे दिवस आपण त्यांच्यापासून फटकून राहिल्याची तिला खंत वाटू लागली. आताशा रोज ती त्यांच्याकडे जाऊ लागली. महेश व मनालीशी तिचे छान सूत जुळले. डॉक्टर काका तन्मयशी व त्यांचा नातू सुहृदशी खूप खेळायचे. तन्मय तेथे रोज खेळायला येऊ लागला.
                           ××××××××××××
.........शेखर सोबत रुपा घरी आली. तन्मय अजूनही शेजारीच होता. फ्रेश होऊन दोघेही डॉक्टरकाकांकडे आले. तन्मय व सुहृद समोर बरीच खेळणी पडली होती व प्रत्येक खेळणे दोघेही एकमेकांना देत होते. रुपाचा विश्वासच बसेना. तन्मय आणि शेअरींग ?
       रुपाने काकांना सारं सांगितलं. काका हसले. दोघांनाही जवळ बसवून ते म्हणाले, " तुम्ही दोघेही कामावर जाता व बाळाला मोलकरणीवर सोपवता. त्याच्यावर संस्कार कोणाचे होतील ? तुम्हाला त्याच्याशी खेेळायला किती वेळ मिळतो ? बाळ जन्माला येतं कुटुंबात..वाढतं कुटुंबात..त्याच्यावर आपल्याच कुटुंबाचे संस्कार होतात. एकत्र कुटुंब असलं की बाळ सुरक्षित असतं. त्याला सर्वांचं प्रेम मिळतं. त्याला प्रेमाचं महत्व कळतं. आजी आजोबांसाठी नात किंवा नातू म्हणजे दुधावरची साय असते. स्वत:च्या जीवापाड ते त्यांना जपतात. त्यांच्यावर भरभरुन प्रेम करतात. तुमचा मुलगा या गोष्टीपासून वंचित राहतो असं नाही वाटत तुम्हाला ?"
" काका, आमची चूक आम्हाला कळतेय पण काही इलाज नाही. आता तुम्हीच त्याचे आजोबा होऊन त्याला वळण लावलंत. खरंच हे आम्ही कधीच विसरु शकणार नाही." शेखर सद्गदित होऊन म्हणाला.
डॉक्टरकाकांनी त्याच्या पाठीवरुन हात फिरला.  रुपा कसल्या तरी विचारात गढलेली होती. ते जायला निघाले तसा तन्मय आजोबांना बिलगला. तो त्यांना सोडीना. सर्वांना हेलावणारा प्रसंग होता तो.
                 रात्री आशिशकडे जेवायला गेल्यावर हा सगळा प्रसंग शेखरने त्याला सांगितला. आशिशने तन्मयकडे पाहिले. तो कैवल्यशी खेळण्यात गुंतला होता.
   " रुपा, कसला विचार करतेस ?" आशिशने तिला विचारले.
   " शेखर, आशिश...मला खरंच पश्चाताप होतोय. पनवेलच्या घरात माझं मन रमेना. आई बाबांशी मी तुटक वागायचे. काका, काकू किंवा इतर सारेच मला परके वाटायचे. पण तन्मयच्या वेळी त्या सगळ्यांनी माझी केवढी काळजी घेतली. ....मला .....मला परत जायचंय...पनवेलला.... सगळ्यांची माफी मागायचीय..." रुपा रडू लागली.
  आशिशने तिच्या खांद्यावर थोपटले. " रुपा, तुला नागपुरला जॉब मिळवून देण्याबाबत मला काकांनी....शेखरच्या बाबांनीच फोन केला होता. तुझी द्विधा मन:स्थिती त्यांना कळली होती. "
ती अधिकच रडू लागली. हे पश्चातापाचे अश्रू होते. एकत्र कुटुंबाचे महत्व तिला पटले होते. " शेखर, आपण कधी जायचे पनवेलला ?"  तिने विचारले तसा तो हसला.
" बघतो, मी बदलीचाच प्रयत्न करतो." शेखर म्हणाला.
आशिश समाधानाने हसला.
" बरं, रुपा एक सांग....तुम्ही दोघेही तन्मयला घरी शेरू म्हणून कां हाक मारता ?"
दोघेही मनमोकळे हसले.
" अरे, शेखरचा ' शे ' आणि रुपाचा ' रु ' मिळून आम्ही त्याला शेरु म्हणतो."
सर्वजण जोरजोरात हसू लागले.
                                    •••••••
                                        सुरेश पुंडलिकराव इंगोले
                                          शहापुर. . जि. भंडारा. 
                                         .   9975490268