Thursday, 30 June 2016

तुझा एक अलवार स्पर्श
            अजूनही मन शहारते ....!
तुझ्या सान्निध्याचा भास
             अवघी काया मोहरते....!
शिशीरातही फुलतो वसंत
              वठलेले मन बहरते......!
 तुझ्या साथीने मनपाखरु
               मुक्त होऊनी विहरते....!

सुरेश इंगोले.....
तुझा एक अलवार स्पर्श
            अजूनही मन शहारते ....!
तुझ्या सान्निध्याचा भास
             अवघी काया मोहरते....!
शिशीरातही फुलतो वसंत
              वठलेले मन बहरते......!
 तुझ्या साथीने मनपाखरु
               मुक्त होऊनी विहरते....!

सुरेश इंगोले.....

Monday, 11 April 2016

चिमखडे बोल.....

   पाहुणे जायला निघाले. निरोप द्यायला सगळे बाहेर आले. पण घाई कोणालाच नव्हती. सुनंदा एका बाजूला सौ.सोबत माहेरच्या गोष्टीत रमली. माझा मुलगा व सून त्यांच्या मुलाशी व सुनेशी गप्पा मारत होते. मुले झाडाभोवती शिवाशिवी खेळत होती. मी व पाहुणे बोलत बोलत टेरेसवर आलो.

     संध्याकाळचे सोनेरी ऊन पसरले होते. भोवतालचे दृष्य पाहून सुभाषरावांच्या चेह-यावर प्रसन्नता उमटली.  " वा सर ! निसर्गाच्या सान्निध्यात राहायला मिळण्यासारखे भाग्य आम्हा शहरी लोकांना कुठून मिळणार ?"
मी हसलो. त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणालो, ' येथे घर बांधायला सर्वांचाच विरोध होता. मुलांना शहरात राहायला हवे होते. बायकोला एवढे मोठे घर नको होते. मोठ्या घराचे काम तिच्याने होत नव्हते. मी येथे वीस वर्षे भाड्याच्या घरात काढली. दोन खोल्यांच्या लहान लहान घरात अडचणी सोसत मुलांना वाढवले. तेव्हाच मनाशी खूणगाठ बांधली होती की जेव्हा स्वत:चे घर बांधीन तेव्हा मोठे प्रशस्त बांधीन."
    " तुमची इच्छा पूर्ण झाली म्हणायची. "
   " सर्वांचा विरोध पत्करून मी हे घर बांधले. वास्तुपूजनाला येणा-या सर्वच लोकांनी जेव्हा घर व परिसराची प्रशंसा सुरु केली तेव्हा घरातला विरोध मावळला."
   
    आम्हाला पाहून सगळेच टेरेसवर आले.  मुले अवती भवती बागडू लागली. आमच्या संभाषणात भाग घेत सौ म्हणाली, " खरेच आधी माझा विरोध होता. पण यांना कर्मभूमी सोडायची नव्हती. येथे सगळे जिव्हाळ्याचे लोक आहेत. अडीनडीला धावून येतात."
" ताई, सर्वात महत्वाचे म्हणजे मुले काही तुमच्यासोबत राहणार नव्हती. नोकरीधंद्यानिमित्ताने दूर कोठेतरी जाणारच होती ना !" सुभाषराव म्हणाले.
" हो ना ! निवृत्त आयुष्य निवांत काढण्यासाठी याहून दुसरा मार्ग नाही असे मला वाटते. आता सणांच्या निमित्ताने तीन ही मुले आपापल्या कुटुंबासह येतात. घर आनंदाने नाचू लागतं. पुढच्या वेळी जेव्हा मुले येतील तोपर्यंत सगळ्या स्मृती घर जपून ठेवतं. तुम्हाला सांगतो सुभाषराव....घराला मन असतं. घर माया लावतं. ओढ लावतं. त्याच ओढीने मुंबई असो की सौदी असो, मुलं घरी येण्याचे प्लॅनिंग करतात. पुन्हा पुन्हा येतात. खूप बरं वाटतं."

      मी जरा जास्तच भावुक झालो होतो. वातावरणाला हलके करण्यासाठी सुभाषरावांनी विषय बदलला.

" बाकी काही म्हणा सर, येथून आजूबाजूचे दृष्य अगदी नयनरम्य दिसते. एका बाजूला नॅशनल हायवे नं. ६ वरुन सतत सुरु असणारी वाहनांची वर्दळ, उत्तर आणि दक्षिणेकडे असणा-या टेकड्या...समोर पसरलेली भातशेती... वा ! केवळ अप्रतिम ..."

     सर्वजण टेकड्यांकडे बघू लागले. मधेच सुभाषरावांचा मुलगा म्हणाला, " अरे इतर टेकड्यावर झाडे व किती छान हिरवळ आहे. ही एकच टेकडी कां बरं बोडकी आहे ? "
माझा सहा वर्षांचा नातू शौर्य चटकन म्हणाला,-" काका, ती रिकामटेकडी आहे."

    सर्वजण खळखळून हसू लागले.

                               ....... सुरेश इंगोले.

Thursday, 7 April 2016

वेशीवर पावसाच्या
आल्या सरीवर सरी
चिंब भिजले झोपडे
डोळे कोरडेच तरी ॥

Monday, 4 April 2016

वो  कौन  था ?

            दोन तीन वर्षापुर्वीची गोष्ट.  मुंबईहून नागपूरला यायला निघालो तेव्हा मुलाचा फोन आला ," बाबा, मी आवश्यक कामासाठी अमरावतीला जात आहे मित्रासोबत. कार नागपूरला आत्याकडे ठेवली आहे." आम्ही दोघेही नागपूरला सकाळी ९.०० वाजता उतरलो. बहिणीकडे गेल्यावर तिने काही लवकर जाऊ दिले नाही. जेवण, आराम, गप्पा यातच दिवस गेला. संध्याकाळी दोघेही कारने शहापूरला जायला निघालो.

             अवघा ५० कि.मी.चा प्रवास. त्यातच नागपूर - भंडारा चौपदरी रस्ता झालेला. तरी संध्याकाळची गर्दीची वेळ असल्यामुळे नागपूरबाहेर पडायला सहा वाजले. एकदा हायवेला लागल्यावर गाडी सुसाट सोडली. एफ एमवर मस्त गाणी लागलेली. बायकोला गमतीने म्हटले, " काय मग ? लाँग ड्राईव्हचा फील येतोय ना ! "
ती हसून म्हणाली, " पन्नास किलोमीटर....लाँग ड्राईव्ह...छान ! "

            अर्धा रस्ता पार होईपर्यंत अंधार गडद झाला. सुसाट वेगातल्या गाडीला एकाएकी जोरात झटका लागला. गाडी डिव्हायडरला धडकलीच असती पण...... कशीबशी कंट्रोल झाली व हेलकावत बाजूला थांबली. बराच वेळ बसूनच राहिलो. छातीची धडधड कमी होताच खाली उतरलो. मागचे उजवीकडचे चाक बसले होते. स्टेपनी बदलणे भाग होते. पण मदतीला कोणीच नव्हते. स्टेपनी, जँक सगळे बाहेर काढून ठेवले. थोडा प्रयत्नही करून पाहिला. पण स्क्रू एवढे टाईट होते की हलायलाच तयार नव्हते.  ती खाली उतरली होती. तिला म्हटले, " तू गाडीतच बसून रहा. आतून दार बंद करुन घे. मी मदतील कोण भेटतो का ते पाहतो."

            ती आधी तयारच नव्हती. आजूबाजूला दाट झाडे व माकडांचा हैदोस सुरु होता.  रहदारी सुद्धा तुरळक होती. ती गाडीत बसताच मी आधी समोर गेलो. तिकडे कोणीच नव्हते. मग मागे आलो. परत तिला धीर देऊन मागच्या बाजूला डिव्हायडर ओलांडून रस्ता पार केला. थोड्या अंतरावर एक पेट्रोल पंप दिसला. तेथे एक झोपडी होती. बाहेर टायर वगैरे ठेवलेले होते. मोठ्या उमेदीने मी तेथे गेलो. एक विशीतला पोरगा दिसताच मी त्याला सगळी आपबीती सांगितली. " मालक बाजारमें गये है सब्जी खरीदने. ये छोडके मै कैसे आ सकता हूँ ?" मी त्याला मदतीची विनंती करताच तो तयार झाला. झोपडीचे दार टेकवून तो माझ्यासोबत आला. गाडीपाशी येताच तिने आवाज दिला. ती खूपच घाबरली होती.

            त्याने ताकदीने स्क्रू काढून स्टेपनी बदलली. डिकीत चाक व सामान ठेवून म्हणाला, " साब, स्टेपनी जल्दी बना लेना. वो टायर कमजोर है. " तो जायला निघाला तसा मी खिशात हात घातला. खिशात पाचशेचीच नोट होती. मी त्याला म्हणालो, " मुन्ना, तुम गाडी में बैठो. मै तुम्हे पेट्रोल पंप पर छोडता हूँ. तुम्हे पैसै भी तो देने है."
   " नही साब, पैसे नही होना. मँडमजी डर रही है. आप जल्दी निकल जाईये." एवढे बोलून तो झपझप डिव्हायडर ओलांडून अंधारात नाहीसा झाला. मला फार चुटपुट लागून राहिली. कार स्टार्ट करून मी पुढे निघालो. माझी चुकचुक ऐकून ती म्हणाली, " तुम्ही नेहमीच तर नागपूरला जात असता. मुद्दाम गाडी थांबवून त्याला पैसे देऊन टाका. बिचारा देवासारखा धावून आला." आता स्पीडवर कंट्रोल आले होते. सावकाश घरी पोचलो.

               दोन तीन दिवसांनी मित्रासोबत नागपूरला जायचा योग आला. वडोदा गांव येताच मला त्याची आठवण झाली. मी मित्राला पेट्रोल पंपजवळ गाडी थांबवायला सांगितली. खाली उतरून मी त्या झोपडी जवळ गेलो. दार बंद होते. आजूबाजूला कोणीच नव्हते. पेट्रोल पंपवर जावून चौकशी केली तेव्हा कळले की तेथे कोणी मुलगा काम करीत नाही. पंक्चर दुरुस्तीवाला गावी गेला होता. मी परतलो.
             ........ नागपूरला जाताना अजूनही त्या पेट्रोल पंपजवळ येताच मला त्या मुलाची आठवण येते. तो कोण होता हे गूढ काही उकलले नाही. फक्त त्याच्या दीर्घायुष्याची कामना करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय आहे ?

                                                                            *****  सुरेश इंगोले  *****

Sunday, 27 March 2016

काल क-हांडला जंगलात वाघांनी भेटीस बोलावले होते. सकाळी लवकर या म्हणूनही बजावले होते. पण आपण सुस्त.... म्हणूनच मस्त !
सकाळी साडेसातला जंगलात प्रवेश केला. समोरून येणा-या वाहनातील पोरी खूपच excited झाल्या होत्या. दोन वाघ भेटले म्हणून कॅमे-यातील फोटो दाखवीत होत्या. आम्ही उत्साहाने पुढे गेलो.
पण वाघोबा आम्ही वेळ न पाळल्यामुळे नाराज होऊन सखीला घेऊन जंगलात निघून गेले होते. मनधरणी, विनवणी कशालाही न जुमानता....
      चलता है यार.... बेटर लक नेक्स्ट टाईम !
ही आपली मनोवृत्ती.....वाघांची नाही बरं....!
त़्यांची वेळ पाळावीच लागते. नाही तर मग सांबर, मोर, गरुड यांच्यावर भागवावे लागते. आम्ही शार्दूलचरण पादुकांचे [ वाघाच्या पावलांच्या ठशाचे] दर्शन घेऊन ...बड़े बेआबरू होकर....परतलो.

                                सुरेश इंगोले....

Saturday, 5 March 2016



                           अजि म्या भूत पाहिले...
                            -------------------------

                         दिवाळीच्या दिवसात मुंबईहून सुलागलेहर्ध्याला आलो होतो. काही कामासाठी व मित्रांना भेटण्यासाठी नागपूरला आलो. मित्र काही सोडीनात. पण जाणे भाग होते. रात्री ८.०० च्या गाडीने निघालो. मधे सिंदी(रेल्वे) स्टेशन लागले. मला ताईची आठवण आली. ताई म्हणजे माझी धाकटी मावशी. सिंदी पासून तीन किलोमीटरवर तिचे खेडेगाव होते. कसलाही विचार न करता मी सिंदीला उतरलो. विशीचे वय. अंगात तारुण्याची रग. बेदरकार वृत्ती.
               
                         स्टेशनबाहेर येऊन टपरीवर चहा पीत काही वेळ घालवला. मग सावकाश गावात आलो. ताईच्या गावाचा रस्ता आठवत नव्हता. सुमारे सहा-सात वर्षांपुर्वी तिच्या  लग्नाच्या वेळी ते गाव पाहिले होते. पळसगाव(बाई). गावाला लागून असलेली नदी. नदीच्या काठावर मंदीर. बांधून काढलेला घाट. सगळे आठवत होते.

                         मी एका पानाच्या गादीवाल्याला पळसगावचा रस्ता विचारला. त्याने आधी घड्याळ पाहिले. मग माझ्याकडे रोखून पाहिले. " पँसेंजरनं आले काय बाबू ?" त्याने विचारले. मी मान हलवली. " मंग आतापावतर कुठी व्हते ?" मला त्याच्या आगावूपणाचा भारी राग आला. "कां ?" तरी मी विचारले. " तो कपड्याचा बेपारी मघाच गेला ना. सोबती पाहत होता." त्याने मला रस्ता दाखवीत विचारले, " सिंदीत कोनी न्हाई का वयखीचं ? सकायी गेले अस्ते."
"नाही हो. सकाळी मला वर्धेला परत जायचे आहे." असे म्हणून मी त्याने दाखवलेल्या रस्त्याने चालू लागलो. बहुधा अष्टमीची रात्र होती. चंद्राचे टिपूर चांदणे पडले होते. त्या आल्हाददायक वातावरणात उल्हसित मनानेे मी गाणे गुणगुणत रस्त्याला लागलो. रात्रीचे दहा वाजायला आले होते. सुनसान रस्ता असूनही मनात कोणतेही विचार नव्हते. त्यामुळे सावकाश चालत मी गावाच्या जवळ आलो. एक वळण आले. आणि ......

                       पुढे आमराई लागली. आंब्याचे दाट बन. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडे. अगदी एकमेकात मिसळलेली. आमराईत शिरलो आणि एकदम अंधारल्यासारखे झाले. चंद्राचा उजेड दिसेनासा झाला होता. मी शहारलो. आणि  मला अचानक आठवले. या आमराईत भुताटकी असल्याचे ऐकले होते. अरे बापरे !  म्हणूनच तो पानवाला रात्रभर थांबण्याचा आग्रह करीत होता तर....
                 मला दरदरून घाम फुटला. आता काय करायचे ?  परत फिरायचे की पुढे जायचे.....परत दोन कि.मी.जाण्यापेक्षा एवढी आमराई पार केली की लगेच गाव होते. किंकर्तव्यमूढ अवस्थेत काही क्षण गेले. शेवटी मनाचा हिय्या केला. सगळा धीर एकवटला. दीर्घ श्वास घेऊन मी भराभर चालायला सुरवात केली. माझ्याच पावलांचा आवाज ऐकू येऊ लागला. ' वाजे पाऊल आपुले...म्हणे मागे कोण आले..' खरेच.! छ्या : !! भुताटकी वगैरे काही नाही. पण हे काय......

                      समोर एक आकृती हलत होती. अगदी मधोमध. खाली काही नाही. वरही काही नाही. म्हणजेच पायही नाहीत व डोकेही नाही. फक्त मधे पांढरे पांढरे हलत होते. माझी पाचावर धारण बसली. हातपाय गळाल्यासारखे झाले. पुन्हा अवसान गोळा करून मी जोरात ओरडलो, "ए, कोण आहे रे ? थांब. थांब !"
              ती आकृती जोरजोरात हलायला लागली व एकदम दिसेनाशी झाली. च्यायला ! नक्कीच भूत आहे. अचानक गायबच झाले की. एकाएकी मी धावायला लागलो. कसेही करुन एवढा रस्ता पार करायला हवा. गाव गाठायलाच हवे. मनात राम राम म्हणत मी जोरात धावू लागलो. एक वळण आले व आमराई संपली. पुढे नदी संथपणे वाहत होती. चंद्राच्या शीतल लख्ख उजेडात सगळे स्पष्ट दिसू लागले.

               मी हातपाय धुवून फ्रेश झालो. नदी ओलांडून वर आलो. जवळच ताईचे घर होते. दार वाजवले. काकांनी दार उघडले. मी दिसताच ताईने शिव्या द्यायला सुरवात केली. स्वागताचा हा प्रकार मला नवीनच होता. काकांनी तिला आवरले. " आधी त्याला जेवायला घाल. सकाळी बोलू"
               मी जेवून थोड्याच वेळात गाढ झोपी गेलो. सकाळी काकांनी मला हलवून उठवले.
" काय झाले ?" मी विचारले.
" तुला काल तुझ्या मावशीने शिव्या घातल्या होत्या कारण आमराईत भुताटकी आहे. काल आमच्या गावातल्या कापड दुकानदाराला भूत बाधले. सगळा गाव गोळा झालाय त्याच्या घरासमोर " काकांनी सांगितले. मी ताडकन उठून बसलो.

       " काका, मला त्यांच्या घरी घेवून चला. मला भुताची भेट घ्यायचीय्." मी काय बोलतोय हे काकांना काही कळले नाही. आम्ही त्यांच्या घरी गेलो. घरासमोर चिक्कार गर्दी होती. लोक आपापसात बोलत होते. सगळीकडे भुताच्याच गोष्टी. आम्ही घरात गेलो. लोकांनी आम्हाला जागा करुन दिली.
      " तुम्हाला भूत कुठे व कसे दिसले सांगता का ?" मी विचारले. " मी ही रात्रीच आलो."
तो उठून बसला. थरथर कापत सांगू लागला," आमराईत बराच दूर चालत आल्यावर मला मागून भुताने आवाज दिला. ' ए कोण आहे? थांब.' मी माग पाहिले तर पांढरी आकृती हलत होती. खाली वर काहीच नाही." तो परत किंचाळला.
          मी हसू लागलो. सगळे माझ्याकडे विचित्र नजरेने बघू लागले.
मी त्यांच्या शेजारी खाटेवर बसलो. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो, " काका, भूत वगैरे काही नाही. आपण दोघांनी एकमेकांना पाहिले. "
" नाही हो ! भूतच होते ते. पाय नाही डोके नाही...."
" मलाही तसेच दिसले होते. पाय नाही डोके नाही...वास्तविक अंधारात पाय व डोके दिसले नाही. फक्त पांढरे कपडे तेवढे दिसत होते." माझा युक्तीवाद बहुतेक सर्वांना पटलेला दिसत होता.
" आवाज दिल्यावर आकृती जोरात हलत होती ना !" त्याने मान हलवली.
" कारण तुम्ही पळू लागले होते व मी तुमच्या मागे धावू लागलो होतो. "
...... आता सारेच हसू लागले होते.

                                                                              ..**.. सुरेश इंगोले..**..