Monday, 8 January 2018

मला मीच माझे हृदय अर्पिले बघ
तमा काय मजला तुझ्या स्पंदनांची ।
कितीही जरी तू मला टाळले ना
तरी प्रीत जुळली असे दो मनांची...॥

Monday, 9 October 2017

..#कुबेर _लग्नसोहळा..

          लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हणतात. खरे असावे ते. माझा तरी यावर विश्वास आहे. भावंडात मी वडील मुलगा म्हणून जबाबदा-या खूप. १९व्या वर्षी मी मुंबईला नोकरीस लागलो. पण तीन वर्षातच वडिलांनी नोकरी सोडून बोलावले. नोकरी करतो म्हणून मुली सांगून येत होत्या पण बहिणींची लग्ने झाल्याशिवाय लग्न करायचे नाही असे मी ठामपणे सांगितले होते. शेवटी १९७५ साली वडिलांनी फर्मान सोडले. मी तुमच्याकरिता वधूसंशोधन करायला जात आहे. मी आणि माझा चुलत भाऊ दोघांचेही लग्न एकाच वेळी करायचे दादाजींनी ठरवले होते.( वडिलांना आम्ही दादाजी म्हणत असू.)
             एक दिवस त्यांनी फर्मान सोडले, " अमरावतीला दोन मुली मी निवडून ठेवल्या आहेत. दोन दिवसांनी जावयासोबत जाऊन त्या मुली पसंत करून या." वडिलांसमोर काही बोलायची सोय नव्हती.
                 आम्ही अमरावतीला गेलो. पहिल्या घरी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. बुजरेपणा आणि संस्कार यामुळे मी धीटपणे मुलीकडे पाहू शकलो नाही. मेहुण्यांनी तिला जुजबी प्रश्न विचारले. कार्यक्रम आटोपला. तेथून लगेच दुसरी मुलगी पाहायला निघालो. वाटेत मेहुण्यांनी आम्हाला विचारले, " कशी वाटली मुलगी ?" मी काही बोलू शकलो नाही पण माझा भाऊ लगेच उत्तरला," मला वहिनी म्हणून पसंत आहे."
मला चॉईसच उरला नाही. मुकाट्याने दुसरी मुलगी मला भावससून म्हणून पसंत करावी लागली. अशा त-हेने हिच्याशी माझी जन्माची गाठ पडली.
                   ३० मे १९७५ साली वयाच्या २८व्या वर्षी आम्ही बंधनात अडकलो. ४२ वर्षानंतरही .....आम्ही आजही काया-वाचा-मनाने एवढे एकरूप आहोत की जोडीदार म्हणून दुस-या कोणाचा विचारही मनाला शिवला नाही.
                                  सुरेश इंगोले

Thursday, 5 October 2017

ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी..
भेटीत तुष्टता मोठी.....

          बाळ कोल्हटकर यांचे गीत, वसंत देसाई यांचे संगीत.....आणि...कुमार गंधर्व, वाणी जयराम यांच्या अत्यंत सुमधुर स्वरांनी अजरामर केलेले हे गाणे आज कानावर पडले आणि मन तृप्त झाले.
         
             या ऋणानुबंधाचे मला मोठे नवल वाटते. हजारो लोकांशी आपल्या ओळखी असतात. नेहमी भेटणारांची नावे आपल्या स्मरणात असतात. क्वचित भेटणारांशी आपण हसून दोन शब्द बोलतो. काही लोकांशी आपली नित्य भेट होत असते. तर काही जणांशी आपण फार क्वचित.... अधूनमधून  भेटत असतो. पण ऋणानुबंध ज्यांच्याशी जुळतात त्यांची गोष्टच वेगळी असते. ते या कोणत्याच वर्गवारीत बसत नाहीत. कारण त्यांचं स्थान केवळ स्मरणात, मेंदूत नसतं...तर ते थेट काळजात असतं.

                  असे अनेकजण माझ्या काळजात ठाण मांडून बसले आहेत. वर्ष दोन वर्षे भेट झाली नाही तरी हृदयाची स्पंदने त्यांना जाणवत असावीत याचा मला विश्वास आहे. कारण नागपूरचा माझा जिवलग मित्र दत्तू केदार याच्याशी दोन वर्षांपासून भेट नसूनही फोन केल्यावर ज्या आत्मीयतेने तो विचारपूस करतो, जुन्या आठवणी काढतो की मन हेलावून जातं. वार्धक्यामुळे तो बाहेर जाऊ शकत नाही आणि फिरस्तीमुळे मी त्याची भेट घेऊ शकत नाही याचे कधीकधी वैषम्य वाटते.

                 ज्याचे स्थान हृदयात...काळजात असते अशांनाच आपण जिवलग म्हणतो. त्यांची संख्या कमी असते. पण त्यांच्यामुळे आपले जीवन सुखकर होते. पुन्हा पुन्हा भेटीची ओढ लागते.
         भेटीलागी जीवा। लागलीसे आस।
          पाहे रात्रंदिस। वाट तुझी ॥
अशी अवस्था निर्माण होते. जिवलगा, कधी रे येशिल तू..असे आपले मन आक्रंदत असते.

                  हृदयाच्या कप्प्यात अढळ स्थान असणारे माझे परममित्र...विदर्भाची शान...गझलगंधर्व..संगीतकार...गझलगायक...श्री सुधाकर कदम यांचे पाय माझ्या घरी शहापुरला कधी लागतील याची मला शाश्वती नव्हती. ते पुण्यात स्थायिक झाल्यामुळे विदर्भात प्रसंगानेच येणे होत असे. पुण्याच्या त्यांच्या घरी नेहमीप्रमाणे यावेळी आमची १८ सप्टेंबरला भेट झाली तेव्हा मी शहापुरला कधी येता असे विचारले. ते यवतमाळ - वर्धेला येणार हे कळले होते. २६ तारखेला त्यांनी शहापुरची चौकशी केली व २८ तारखेला येतो म्हणाले तेव्हा माझा आनंद गगनात मावेना.
   अखेर तो दिवस उजाडला. त्यांचे शहापुरात आगमन झाले. आम्ही उभयता त्यांच्या स्वागतास सज्ज होतो. सारे घर आनंदाने भरून गेले. सुधाकराव, सुलभावहिनी, निषाद, पल्लवी आणि गोड नातू अबीर यांना घराने आपल्या कवेत घेतले.

              आमचे घर, विहीर व आंब्याचे झाड यांनी आम्हाला जोडलेली माणसे टिकवण्यात मोलाची साथ दिलेली आहे. दोन दिवस एकमेकांच्या सहवासात, थट्टामस्करीत, खेळीमेळीत कशी गेली ते कळलेच नाही. त्यांच्या नागपूरच्या मित्राचा अस्वस्थ असल्याचा निरोप आला म्हणून जाणे अपरिहार्य असूनही त्यांचा पाय निघेना.
              जाताना हातात हात घट्ट धरून एवढेच म्हणाले," डिसेंबरमध्ये चांगले आठ दिवसाच्या मुक्कामाने येतो भौ...." मन भरून आले.
          यालाच ऋणानुबंध म्हणतात ना........

Wednesday, 6 September 2017

मला छळण्याला
किती हे बहाणे
चोरून पहाणे
इथे तिथे.......।

पुसटता स्पर्श
लावी हुरहूर
जाऊ नये दूर
असे वाटे.....।

आवेगाने मिठी
घालाविशी वाटे
परी भय दाटे
मनामध्ये.......।

मनात काहूर
जिवा तगमग
सखा जिवलग
दूर जाता......॥

Sunday, 2 July 2017

मतल्यात शोधले ना वृत्तात शोधले मी...
गझलेस या मनाच्या कप्प्यात शोधले मी...

Wednesday, 28 June 2017

आज आठवडी बाजार होता.
सौ बाजारातून आली. पिशवी खाली ठेवत, घाम पुसत म्हणाली," काय महाग होत्या भाज्या आज ? थोडी उशीरा गेले असते तर स्वस्त तरी मिळाल्या असत्या."

   पुस्तकातून डोके वर न काढता मी सहज बोलून गेलो," त्यापेक्षा बाजार संपता संपता गेली असतीस तर टमाटर, वांगी, कांदे, पालेभाज्या  या सर्व फुकट मिळाल्या असत्या."
                   ********

आत्ता आठ वाजून गेले तरी किचनमध्ये शुकशुकाट आहे. आज जेवायला मिळणार की नाही कळत नाही.
मी काही चुकीचे बोलून गेलो का मघाशी....?
मला तर काही आठवत नाही......

असो... शुभ रात्री !!
                                             == सुरेश इंगोले ==

Friday, 9 June 2017

*सुमुहूर्त सावधान*

           प्रत्येकाच्या आयुष्यात  येणारा विवाह संस्कार हा अत्यंत महत्वाचा असा सोहळा असतो. तो कशा प्रकारे साजरा करावा हे प्रत्येकाने ठरवायचे असते. अर्थात वरपिता किंवा वधूपिता यांनाही पूर्णपणे हे स्वातंत्र्य नसते.  अनेक तडजोडी करुन हा सोहळा संपन्न केला जातो. देणीघेणी, हुंडा, मानपान, आहेर या गोष्टी महत्वाच्या असतात. लग्नाची तिथी ठरते. मग मुहूर्त काढला जातो.
             त्या मुहूर्तावर लग्न लागणे अपेक्षित असते. बहुधा मुंबई पुण्यासारख्या शहरात मुहूर्तावर लग्ने लागलेली मी पाहिली आहेत. सफल विवाहासाठी हा सुमुहूर्त पाळणे आवश्यक आहे असे मानले जाते.

             पण ग्रामीण भागात किंवा नागरी भागात या मुहूर्ताची ऐसीतैसी केली जाते. मुहूर्त हा पाळण्यासाठी नसतोच अशी यांची ठाम धारणा असते. त्यामुळे सकाळी नऊ वाजताचे लग्न दुपारी दीड-दोन वाजता लागते. मग जेवणारांची झुंबड उडते. सगळा गोंधळ माजतो.

           याला कारणीभूत असतात वरातीत नाचणारे नवरदेवाचे मित्र आणि वराकडील पाहुणे मंडळी. डीजेच्या तालावर ठुमके घेत, वेडेवाकडे अंगविक्षेप करीत, कमरेला  विचित्र झटके देत प्रत्येक जण नाचायची हौस पूर्ण करून घेतो. वेळेचे भान कुणालाही नसते. ते करून देण्याचाही उपयोग नसतो. नवरदेवाच्या खिशातून मित्रांच्या अपेयपानाची व्यवस्था होत असते. अंगूरी चढत जाते. नाच रंगत जातो. बँडवाल्यांचीही चांदी असते. कुणीतरी नाचणा-यावरून नोटा ओवाळून त्यांना देत जातो. या सगळ्या प्रकारात मुहूर्ताची वाट लागते. वधूकडील मंडळी बिचारी वाट पाहून थकून गेलेली असते.

               या सर्व प्रकारामागे एक गोंडस समजूत असते की लग्न आयुष्यात एकदाच होते. ही मजा नंतर कधी करणार ? वीस वर्षांपुर्वी आमच्या गावातील शिक्षकाच्या मुलीचे लग्न होते. मुहूर्त सकाळी नऊचा होता. लग्न लावून जेवण करुन शाळेत येता येईल म्हणून कोणीही सुटी घेतली नव्हती. ऑफिसला जाणारी इतर मंडळी याच विचाराने मंडपात जमली. मुहूर्त टळून एक तास झाल्यावर चुळबुळत एकेकजण सटकू लागला. आम्ही सगळे परत आलो. नंतर कळले की लग्न दुपारी दीड वाजता लागले तेव्हा मंडपात फक्त नातलग मंडळी तेवढी शिल्लक होती. किमान तीनशे ते चारशे लोकांचा स्वयंपाक शिल्लक राहिला होता.

             आम्हा मित्रमंडळीत या मुहूर्ताबद्दल नेहमी काथ्याकूट होत असे. मुहूर्त किंवा लग्नाची वेळ पाळायलाच हवी हे माझे मत मी ठामपणे मांडत असतो. आमच्या मित्राच्या मुलाच्या लग्नात बोलणी करताना मला हजर राहण्याचा योग आला. मुलीकडच्यांनी लग्न वेळेवर लागावे म्हणून गळ घातली तेव्हा मित्राच्या वतीने मी त्यांना हमी दिली. मित्राला माझे विचार माहीत होते. तो काही बोलला नाही. मी नव-या मुलाला सांगितले की नाचणा-या मित्रांचे काय ते तू बघ. लग्न वेळेवर लागेलच.

          मुहूर्त सकाळी साडे अकराचा होता. जानवशावरून वरात सकाळी दहालाच निघाली. मारुतीच्या मंदिरातून मंगल कार्यालयाकडे येताना नाचणारांचा जोश वाढू लागला. मी मंडपाकडे निघून गेलो. अकरा वाजून दहा मिनिटे झाली तसा वधूपित्याचा जीव वरखाली होऊ लागला. त्याने माझ्याकडे येऊन घड्याळ दाखवले. त्याच्या चेह-यावरील काकुळती मला हेलावून गेली. मी मित्राला बोलावून गाडीत बसवले व वळसा घालून वरातीच्या मागून गाडी नाचणारांच्या बाजूला आणली. त्याच्या एका मित्राला बोलावले. त्याला माझी योजना सांगितली. त्याला पूर्वकल्पना होतीच. त्याने वराला घोड्यावरून खाली नाचायला उतरवले. मित्र आणखी जोशात नाचू लागले. मी मित्राला खुणावले. तो खाली उतरला. नाचणारात जाऊन त्याने वराला हात धरून आणले व गाडीत बसवले. बाजूला तोही बसला. मी काचा चढवून गाडी पुढे काढली. चारच मिनिटात आम्ही मंडपात पोहचलो. सुमुहूर्त बरोबर साधला गेला. मंगलाष्टके झाली. वरमाला घातल्या गेल्या. फटाके फोडण्यात आले पण नाचणा-यांचे उन्मादात नाचणे सुरूच होते. ते मंडपाशी पोचल्यावर बराच वेळाने वस्तुस्थिती त्यांना कळाली.
     
             नंतर बराच हंगामा झाला. असो !
वराचे वरातीतून अपहरण अशी नंतर लोकल वर्तमानपत्रात बातमी झळकली होती. आजही परिस्थिती बदलली नाही. मुहूर्ताची ऐशीतैशी होतच असते.

                                      ***  सुरेश इंगोले. ***