Tuesday, 27 February 2018

आम्ही प्रवासी घडीचे

प्रवास कधीच आणि कोणालाही चुकला नाही. सतत आपण कुठूनतरी कुठेतरी जात असतो. पृथ्वी, चंद्र, तारे हे खरे अविश्रांत प्रवासी. अथक चालणारे. गन्तव्यस्थान नसणारे. आपले गन्तव्य मात्र ठरलेले. घर ते कार्यालय ...शाळा, बाग, चित्रपटगृह, रंगमंदिर, मंडई....रोजचा प्रवास...

            लग्न, मुंज, बारसे, वाढदिवस, मरण, तेरावे...कितीतरी प्रसंगी प्रवास करावाच लागतो. निरनिराळ्या वाहनाने. दुचाकी, चारचाकी, बस, आगगाडी आणि विमानसुद्धा.. हल्ली प्रवासाला  कारण आणि साधन शोधावे लागत नाही. बाहेरचं जग खुणावत असतं. पहाड, दरी, हिरवाईने नटलेली सृष्टी, जगातली आश्चर्ये, जंगल, पशुपक्षी, सरोवर....निसर्ग साद घालत असतो..आपण हुंकार भरण्याची वाट पाहत !

            प्रवासाची तयारी करुन निघालो की सुखाचा प्रवास होण्यासाठी शुभेच्छांची बरसात होऊ लागते. हॅपी जर्नी, आपला प्रवास सुखाचा होवो, बॉन व्हॉयेज, आपकी यात्रा सुखमय हो इ.इ.
            प्रवासात असताना अधून मधून चौकशी करणारे फोन येतात. ख्यालीखुशाली विचारली जाते. क्षणाक्षणाची बित्तंबातमी देणारा भ्रमणध्वनी हा वर्तमानयुगाचा चमत्कार होय.

        ... पन्नास वर्षांपुर्वी किती वेगळी परिस्थिती होती ? प्रवासाची साधने तुटपुंजी होती. रेल्वे, बसगाड्या यांची संख्या फार कमी होती. जवळच्या ठिकाणी जायलासुद्धा खूप वेळ लागायचा. बाहेरगावी गेलेला माणूस परत घरी येईपर्यंत त्याची ख्यालीखुशाली कळत नसे. प्रवासाचे प्रसंग फार कमी येत. जवळचा प्रवास बैलगाड्यांनी केला जाई. पाचदहा मैलांचा प्रवास सायकलने होई. सारी नातलग मंडळी पंचक्रोशीच्या आतच राहायची. 

               दूरचा प्रवास करायचे प्रसंग क्वचितच येई. पण ते प्रसंग कायम लक्षात राहत. पेटी, होल्डॉल, वॉटरबॅग वगैरे सामान तयार असायचे. स्टेशनवर सोडायला बैलगाडी (दमणी) तयार असायची. आई हातावर दही घालायची. थोरांच्या पाया पडून होताच आजी पाठीवरून, गालावरून सुरकुतलेला हात फिरवत म्हणायची," बाबू, जपूून जाय. खिडकीच्या बाहेर हात नोको काढू. दारात नोको उभा राहू. बाहेरचं खाऊ नोको. डबा देल्ला हाये संगं. गावाले गेेल्यावर पत्रं टाकजो. जाय मा...सुखाचा राह्य.."
       
               सुखरूप पोहचल्याचे पत्र आठ दिवसांनी मिळायचे. तोवर इकडे सर्व व्यवहार सुरळीत चालायचे. कोणतेच अभद्र विचार कोणाच्याही मनात येत नसत. जगण्याला स्थैर्य होतं, सुरक्षितता होती. प्रवास खरोखर सुखाचा होत असे. त्यासाठी शुभेच्छा द्यायची गरज कोणालाच वाटत नसे.

            *   *    *    *     *    *     *     *      *    *

                आज आम्ही पुण्याहून नागपूरला जायला निघालो तेव्हा कुटुंबीय, शेजारी हॅपी जर्नीच्या शुभेच्छा देऊ लागले. ट्रॅव्हल्समध्ये बसल्यावर मुलाचा फोन आला. पोचताक्षणी फोन करा म्हणून सूचना मिळाल्या. त्यावरून हा सगळा प्रवासप्रपंच आठवला.

                                              ==+ सुरेश इंगोले  +===

राजभाषा मराठी

१९६६ मध्ये मराठीला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला आणि लगेचच सरकारी परिपत्रक आमच्या कार्यालयात येऊन धडकले. यापुढे कार्यालयाचे कामकाज मराठीतूनच व्हावे. आमचे संचालक श्री दारूवाला हे पारशी असल्यामुळे त्यांनी ते कदाचित न वाचताच आमच्या अवलोकनार्थ अग्रेषित केले. मी त्यावर मुद्दाम मराठीत स्वाक्षरी केली.
         मुंबईतील आमच्या कार्यालयाचे सगळे कामकाज इंग्रजीतच चालायचे. संचालकांशी संभाषण सुद्धा इंग्रजीतच करावे लागे. मराठीत कामकाज करणे म्हणजे कार्यालयीन पारिभाषिक शब्दांना पर्यायी शब्द शोधणे हे महाकठिण कर्म होते.
        मी आमच्या कार्यालयातला वयाने सर्वात लहान...केवळ एकोणीस वर्षांचा ! परिपक्वता आणि पोरकटपणा यांचे बेमालूम मिश्रण असलेला कर्मचारी.
        मी लगेचच सुटीचा अर्ज लिहिला. पारिभाषिक शब्दकोषाचा आधार घेऊन शुद्ध मराठीत अर्ज लिहून शिपायाकरवी पाठवून दिला. पारशीबावाची भंबेरी उडणार होती. हंगामा होणार होता. मी बोलावणे येण्याची वाट पाहू लागलो.
थोड्याच वेळाने शिपाई बोलवायला आला. मी आत गेलो.
(आता मला इंग्रजीचा आधार घ्यावाच लागेल.)
--What is this Mr. Ingole ?
-- Sir. Its my leave application.
-- Why didn't you write in English ?
--Sir, today we receive a circular mentioning the use of Marathi in daily routine work. So its my application in Marathi.
-- You know very well that I don't know Marathi.
-- Sir, please call Mr.Bhide to translate it. He is well educated among us.
      भिडे साहेबांना पाचारण करण्यात आले. दारुवाला साहेबांनी अर्ज त्यांच्याकडे टाकला.
      ते बराच वेळ अर्ज वाचत राहिले. माझ्याकडे करडी नजर टाकून म्हणाले," ही कोणती भाषा आहे ? "
      " मराठी.."
संचालक ?....Director
अंगुली मुद्रा केंद्र..?..Finger Print Bureau.
गुन्हा अन्वेषण विभाग ?..CID...Criminal Investigation Department.
माझा जबाब अशा पद्धतीने सुरु होता जणू मी फार मोठा गुन्हा केला होता.
पारिभाषिक शब्दांचे अर्थ विचारून झाल्यवर उरलेल्या अर्जाचा अर्थ सांगून जळजळीत नजरेने माझ्याकड पाहत भिडे साहेब निघून गेले.
             दारूवाला साहेब माझ्याकडे रोखून पाहत होते. अर्जावर स्वाक्षरी करीत ते म्हणाले, " Mr. Ingole, henceforth no Marathi..Only English."
---But Sir, the circular...."
--Forget it. I will send another circular tomorrow."

.........अशा त-हेने राजभाषेच्या परिपत्रकाचा त्याच दिवशी खून करण्यात आला. त्यानंतर बहुधा ते परिपत्रक बासनातच गुंडाळून राहिले असावे. कारण सीआयडी सहित सर्वच सरकारी कार्यालयांचे कामकाज आजतागायत इंग्रजीतूनच चालवले जात आहे. न्यायव्यवस्था हे याचे ज्वलंत उदाहरण आहे.
   
                                            **** सुरेश इंगोले ***

Monday, 8 January 2018

मला मीच माझे हृदय अर्पिले बघ
तमा काय मजला तुझ्या स्पंदनांची ।
कितीही जरी तू मला टाळले ना
तरी प्रीत जुळली असे दो मनांची...॥

Monday, 9 October 2017

..#कुबेर _लग्नसोहळा..

          लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हणतात. खरे असावे ते. माझा तरी यावर विश्वास आहे. भावंडात मी वडील मुलगा म्हणून जबाबदा-या खूप. १९व्या वर्षी मी मुंबईला नोकरीस लागलो. पण तीन वर्षातच वडिलांनी नोकरी सोडून बोलावले. नोकरी करतो म्हणून मुली सांगून येत होत्या पण बहिणींची लग्ने झाल्याशिवाय लग्न करायचे नाही असे मी ठामपणे सांगितले होते. शेवटी १९७५ साली वडिलांनी फर्मान सोडले. मी तुमच्याकरिता वधूसंशोधन करायला जात आहे. मी आणि माझा चुलत भाऊ दोघांचेही लग्न एकाच वेळी करायचे दादाजींनी ठरवले होते.( वडिलांना आम्ही दादाजी म्हणत असू.)
             एक दिवस त्यांनी फर्मान सोडले, " अमरावतीला दोन मुली मी निवडून ठेवल्या आहेत. दोन दिवसांनी जावयासोबत जाऊन त्या मुली पसंत करून या." वडिलांसमोर काही बोलायची सोय नव्हती.
                 आम्ही अमरावतीला गेलो. पहिल्या घरी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. बुजरेपणा आणि संस्कार यामुळे मी धीटपणे मुलीकडे पाहू शकलो नाही. मेहुण्यांनी तिला जुजबी प्रश्न विचारले. कार्यक्रम आटोपला. तेथून लगेच दुसरी मुलगी पाहायला निघालो. वाटेत मेहुण्यांनी आम्हाला विचारले, " कशी वाटली मुलगी ?" मी काही बोलू शकलो नाही पण माझा भाऊ लगेच उत्तरला," मला वहिनी म्हणून पसंत आहे."
मला चॉईसच उरला नाही. मुकाट्याने दुसरी मुलगी मला भावससून म्हणून पसंत करावी लागली. अशा त-हेने हिच्याशी माझी जन्माची गाठ पडली.
                   ३० मे १९७५ साली वयाच्या २८व्या वर्षी आम्ही बंधनात अडकलो. ४२ वर्षानंतरही .....आम्ही आजही काया-वाचा-मनाने एवढे एकरूप आहोत की जोडीदार म्हणून दुस-या कोणाचा विचारही मनाला शिवला नाही.
                                  सुरेश इंगोले

Thursday, 5 October 2017

ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी..
भेटीत तुष्टता मोठी.....

          बाळ कोल्हटकर यांचे गीत, वसंत देसाई यांचे संगीत.....आणि...कुमार गंधर्व, वाणी जयराम यांच्या अत्यंत सुमधुर स्वरांनी अजरामर केलेले हे गाणे आज कानावर पडले आणि मन तृप्त झाले.
         
             या ऋणानुबंधाचे मला मोठे नवल वाटते. हजारो लोकांशी आपल्या ओळखी असतात. नेहमी भेटणारांची नावे आपल्या स्मरणात असतात. क्वचित भेटणारांशी आपण हसून दोन शब्द बोलतो. काही लोकांशी आपली नित्य भेट होत असते. तर काही जणांशी आपण फार क्वचित.... अधूनमधून  भेटत असतो. पण ऋणानुबंध ज्यांच्याशी जुळतात त्यांची गोष्टच वेगळी असते. ते या कोणत्याच वर्गवारीत बसत नाहीत. कारण त्यांचं स्थान केवळ स्मरणात, मेंदूत नसतं...तर ते थेट काळजात असतं.

                  असे अनेकजण माझ्या काळजात ठाण मांडून बसले आहेत. वर्ष दोन वर्षे भेट झाली नाही तरी हृदयाची स्पंदने त्यांना जाणवत असावीत याचा मला विश्वास आहे. कारण नागपूरचा माझा जिवलग मित्र दत्तू केदार याच्याशी दोन वर्षांपासून भेट नसूनही फोन केल्यावर ज्या आत्मीयतेने तो विचारपूस करतो, जुन्या आठवणी काढतो की मन हेलावून जातं. वार्धक्यामुळे तो बाहेर जाऊ शकत नाही आणि फिरस्तीमुळे मी त्याची भेट घेऊ शकत नाही याचे कधीकधी वैषम्य वाटते.

                 ज्याचे स्थान हृदयात...काळजात असते अशांनाच आपण जिवलग म्हणतो. त्यांची संख्या कमी असते. पण त्यांच्यामुळे आपले जीवन सुखकर होते. पुन्हा पुन्हा भेटीची ओढ लागते.
         भेटीलागी जीवा। लागलीसे आस।
          पाहे रात्रंदिस। वाट तुझी ॥
अशी अवस्था निर्माण होते. जिवलगा, कधी रे येशिल तू..असे आपले मन आक्रंदत असते.

                  हृदयाच्या कप्प्यात अढळ स्थान असणारे माझे परममित्र...विदर्भाची शान...गझलगंधर्व..संगीतकार...गझलगायक...श्री सुधाकर कदम यांचे पाय माझ्या घरी शहापुरला कधी लागतील याची मला शाश्वती नव्हती. ते पुण्यात स्थायिक झाल्यामुळे विदर्भात प्रसंगानेच येणे होत असे. पुण्याच्या त्यांच्या घरी नेहमीप्रमाणे यावेळी आमची १८ सप्टेंबरला भेट झाली तेव्हा मी शहापुरला कधी येता असे विचारले. ते यवतमाळ - वर्धेला येणार हे कळले होते. २६ तारखेला त्यांनी शहापुरची चौकशी केली व २८ तारखेला येतो म्हणाले तेव्हा माझा आनंद गगनात मावेना.
   अखेर तो दिवस उजाडला. त्यांचे शहापुरात आगमन झाले. आम्ही उभयता त्यांच्या स्वागतास सज्ज होतो. सारे घर आनंदाने भरून गेले. सुधाकराव, सुलभावहिनी, निषाद, पल्लवी आणि गोड नातू अबीर यांना घराने आपल्या कवेत घेतले.

              आमचे घर, विहीर व आंब्याचे झाड यांनी आम्हाला जोडलेली माणसे टिकवण्यात मोलाची साथ दिलेली आहे. दोन दिवस एकमेकांच्या सहवासात, थट्टामस्करीत, खेळीमेळीत कशी गेली ते कळलेच नाही. त्यांच्या नागपूरच्या मित्राचा अस्वस्थ असल्याचा निरोप आला म्हणून जाणे अपरिहार्य असूनही त्यांचा पाय निघेना.
              जाताना हातात हात घट्ट धरून एवढेच म्हणाले," डिसेंबरमध्ये चांगले आठ दिवसाच्या मुक्कामाने येतो भौ...." मन भरून आले.
          यालाच ऋणानुबंध म्हणतात ना........

Wednesday, 6 September 2017

मला छळण्याला
किती हे बहाणे
चोरून पहाणे
इथे तिथे.......।

पुसटता स्पर्श
लावी हुरहूर
जाऊ नये दूर
असे वाटे.....।

आवेगाने मिठी
घालाविशी वाटे
परी भय दाटे
मनामध्ये.......।

मनात काहूर
जिवा तगमग
सखा जिवलग
दूर जाता......॥

Sunday, 2 July 2017

मतल्यात शोधले ना वृत्तात शोधले मी...
गझलेस या मनाच्या कप्प्यात शोधले मी...