Sunday 27 March 2016

काल क-हांडला जंगलात वाघांनी भेटीस बोलावले होते. सकाळी लवकर या म्हणूनही बजावले होते. पण आपण सुस्त.... म्हणूनच मस्त !
सकाळी साडेसातला जंगलात प्रवेश केला. समोरून येणा-या वाहनातील पोरी खूपच excited झाल्या होत्या. दोन वाघ भेटले म्हणून कॅमे-यातील फोटो दाखवीत होत्या. आम्ही उत्साहाने पुढे गेलो.
पण वाघोबा आम्ही वेळ न पाळल्यामुळे नाराज होऊन सखीला घेऊन जंगलात निघून गेले होते. मनधरणी, विनवणी कशालाही न जुमानता....
      चलता है यार.... बेटर लक नेक्स्ट टाईम !
ही आपली मनोवृत्ती.....वाघांची नाही बरं....!
त़्यांची वेळ पाळावीच लागते. नाही तर मग सांबर, मोर, गरुड यांच्यावर भागवावे लागते. आम्ही शार्दूलचरण पादुकांचे [ वाघाच्या पावलांच्या ठशाचे] दर्शन घेऊन ...बड़े बेआबरू होकर....परतलो.

                                सुरेश इंगोले....

Saturday 5 March 2016



                           अजि म्या भूत पाहिले...
                            -------------------------

                         दिवाळीच्या दिवसात मुंबईहून सुलागलेहर्ध्याला आलो होतो. काही कामासाठी व मित्रांना भेटण्यासाठी नागपूरला आलो. मित्र काही सोडीनात. पण जाणे भाग होते. रात्री ८.०० च्या गाडीने निघालो. मधे सिंदी(रेल्वे) स्टेशन लागले. मला ताईची आठवण आली. ताई म्हणजे माझी धाकटी मावशी. सिंदी पासून तीन किलोमीटरवर तिचे खेडेगाव होते. कसलाही विचार न करता मी सिंदीला उतरलो. विशीचे वय. अंगात तारुण्याची रग. बेदरकार वृत्ती.
               
                         स्टेशनबाहेर येऊन टपरीवर चहा पीत काही वेळ घालवला. मग सावकाश गावात आलो. ताईच्या गावाचा रस्ता आठवत नव्हता. सुमारे सहा-सात वर्षांपुर्वी तिच्या  लग्नाच्या वेळी ते गाव पाहिले होते. पळसगाव(बाई). गावाला लागून असलेली नदी. नदीच्या काठावर मंदीर. बांधून काढलेला घाट. सगळे आठवत होते.

                         मी एका पानाच्या गादीवाल्याला पळसगावचा रस्ता विचारला. त्याने आधी घड्याळ पाहिले. मग माझ्याकडे रोखून पाहिले. " पँसेंजरनं आले काय बाबू ?" त्याने विचारले. मी मान हलवली. " मंग आतापावतर कुठी व्हते ?" मला त्याच्या आगावूपणाचा भारी राग आला. "कां ?" तरी मी विचारले. " तो कपड्याचा बेपारी मघाच गेला ना. सोबती पाहत होता." त्याने मला रस्ता दाखवीत विचारले, " सिंदीत कोनी न्हाई का वयखीचं ? सकायी गेले अस्ते."
"नाही हो. सकाळी मला वर्धेला परत जायचे आहे." असे म्हणून मी त्याने दाखवलेल्या रस्त्याने चालू लागलो. बहुधा अष्टमीची रात्र होती. चंद्राचे टिपूर चांदणे पडले होते. त्या आल्हाददायक वातावरणात उल्हसित मनानेे मी गाणे गुणगुणत रस्त्याला लागलो. रात्रीचे दहा वाजायला आले होते. सुनसान रस्ता असूनही मनात कोणतेही विचार नव्हते. त्यामुळे सावकाश चालत मी गावाच्या जवळ आलो. एक वळण आले. आणि ......

                       पुढे आमराई लागली. आंब्याचे दाट बन. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडे. अगदी एकमेकात मिसळलेली. आमराईत शिरलो आणि एकदम अंधारल्यासारखे झाले. चंद्राचा उजेड दिसेनासा झाला होता. मी शहारलो. आणि  मला अचानक आठवले. या आमराईत भुताटकी असल्याचे ऐकले होते. अरे बापरे !  म्हणूनच तो पानवाला रात्रभर थांबण्याचा आग्रह करीत होता तर....
                 मला दरदरून घाम फुटला. आता काय करायचे ?  परत फिरायचे की पुढे जायचे.....परत दोन कि.मी.जाण्यापेक्षा एवढी आमराई पार केली की लगेच गाव होते. किंकर्तव्यमूढ अवस्थेत काही क्षण गेले. शेवटी मनाचा हिय्या केला. सगळा धीर एकवटला. दीर्घ श्वास घेऊन मी भराभर चालायला सुरवात केली. माझ्याच पावलांचा आवाज ऐकू येऊ लागला. ' वाजे पाऊल आपुले...म्हणे मागे कोण आले..' खरेच.! छ्या : !! भुताटकी वगैरे काही नाही. पण हे काय......

                      समोर एक आकृती हलत होती. अगदी मधोमध. खाली काही नाही. वरही काही नाही. म्हणजेच पायही नाहीत व डोकेही नाही. फक्त मधे पांढरे पांढरे हलत होते. माझी पाचावर धारण बसली. हातपाय गळाल्यासारखे झाले. पुन्हा अवसान गोळा करून मी जोरात ओरडलो, "ए, कोण आहे रे ? थांब. थांब !"
              ती आकृती जोरजोरात हलायला लागली व एकदम दिसेनाशी झाली. च्यायला ! नक्कीच भूत आहे. अचानक गायबच झाले की. एकाएकी मी धावायला लागलो. कसेही करुन एवढा रस्ता पार करायला हवा. गाव गाठायलाच हवे. मनात राम राम म्हणत मी जोरात धावू लागलो. एक वळण आले व आमराई संपली. पुढे नदी संथपणे वाहत होती. चंद्राच्या शीतल लख्ख उजेडात सगळे स्पष्ट दिसू लागले.

               मी हातपाय धुवून फ्रेश झालो. नदी ओलांडून वर आलो. जवळच ताईचे घर होते. दार वाजवले. काकांनी दार उघडले. मी दिसताच ताईने शिव्या द्यायला सुरवात केली. स्वागताचा हा प्रकार मला नवीनच होता. काकांनी तिला आवरले. " आधी त्याला जेवायला घाल. सकाळी बोलू"
               मी जेवून थोड्याच वेळात गाढ झोपी गेलो. सकाळी काकांनी मला हलवून उठवले.
" काय झाले ?" मी विचारले.
" तुला काल तुझ्या मावशीने शिव्या घातल्या होत्या कारण आमराईत भुताटकी आहे. काल आमच्या गावातल्या कापड दुकानदाराला भूत बाधले. सगळा गाव गोळा झालाय त्याच्या घरासमोर " काकांनी सांगितले. मी ताडकन उठून बसलो.

       " काका, मला त्यांच्या घरी घेवून चला. मला भुताची भेट घ्यायचीय्." मी काय बोलतोय हे काकांना काही कळले नाही. आम्ही त्यांच्या घरी गेलो. घरासमोर चिक्कार गर्दी होती. लोक आपापसात बोलत होते. सगळीकडे भुताच्याच गोष्टी. आम्ही घरात गेलो. लोकांनी आम्हाला जागा करुन दिली.
      " तुम्हाला भूत कुठे व कसे दिसले सांगता का ?" मी विचारले. " मी ही रात्रीच आलो."
तो उठून बसला. थरथर कापत सांगू लागला," आमराईत बराच दूर चालत आल्यावर मला मागून भुताने आवाज दिला. ' ए कोण आहे? थांब.' मी माग पाहिले तर पांढरी आकृती हलत होती. खाली वर काहीच नाही." तो परत किंचाळला.
          मी हसू लागलो. सगळे माझ्याकडे विचित्र नजरेने बघू लागले.
मी त्यांच्या शेजारी खाटेवर बसलो. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो, " काका, भूत वगैरे काही नाही. आपण दोघांनी एकमेकांना पाहिले. "
" नाही हो ! भूतच होते ते. पाय नाही डोके नाही...."
" मलाही तसेच दिसले होते. पाय नाही डोके नाही...वास्तविक अंधारात पाय व डोके दिसले नाही. फक्त पांढरे कपडे तेवढे दिसत होते." माझा युक्तीवाद बहुतेक सर्वांना पटलेला दिसत होता.
" आवाज दिल्यावर आकृती जोरात हलत होती ना !" त्याने मान हलवली.
" कारण तुम्ही पळू लागले होते व मी तुमच्या मागे धावू लागलो होतो. "
...... आता सारेच हसू लागले होते.

                                                                              ..**.. सुरेश इंगोले..**..