Tuesday 15 December 2015

न्यायदेवता अंध असे, ती पाही साक्षी पुरावे |
त्यामुळेच का मानवामधे येती नित्य दुरावे ?

Tuesday 13 October 2015

एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे

थारेपालट :=
                         भर दुपारच्या उन्हाने जीवाची काहिली होत होती. कुलरच्या समोर बसले तरच गार हवा लागत होती. इतरत्र वातारणातली तप्तता जाणवत होतीच. रुपाने घाम पुसत केबिनमध्ये प्रवेश केला.खुर्चीवर बसून ती आधी गार पाणी प्यायली. मग तिने घरी फोन लावला. ब-याच वेळाने नलिनीने फोन उचलला.
" नलू, किती वेळ लावलास फोन उचलायला ? कुठे गेली होतीस ?  " तिने चिडून विचारले.
" ताई ! तन्मय बाबाला आणायला गेले होते शेजारी... फोनची घंटी ऐकून परत आले." नलिनी म्हणाली.
" आला का तन्मय ?"
" नाही. तो खेळण्यात रमलाय. यायलाच तयार नाही."
" नवीनच खूळ शिरलंय याच्या डोक्यात. बरं मी आल्यावर बघते. लक्ष ठेव त्याच्यावर." रुपाने फोन कट केला. त्याचवेळी आशिश दार ढकलून आत आला.
" काय रुपा, वैतागलेली दिसतेस ?" त्याने हसत विचारले.
" अरे, काय रे हा तुमच्या नागपूरचा उकाडा ! कसे राहता रे तुम्ही येथे ? मी तर सहा महिन्यात कंटाळले बाबा. कसे काढेन मी येथे काही वर्षे ?" रुपा वैतागून म्हणाली.
" होईल गं सवय हळूहळू. इथला कडक हिवाळा अनुभवला, आता उन्हाळ्याचा अनुभव घे. मग पावसाळ्याचा...."
" कसले टोकाचे ऋतु आहेत रे इथले...! हिवाळ्यात कडाक्याची थंडी...आता ४२ / ४५° चे ऊन..माय गॉड..! " रुपा बोलत असतानाच आशिश हसू लागला. " तुमच्या पनवेलचे वातावरण मीही अनुभवले आहे. फरक तर पडणारच. बरं, शेजारी कसे आहेत ? जात असतेस की नाही त्यांच्याकडे ?"
" चांगले आहेत. मी उगीचच गैरसमजुतीने एवढे दिवस अलिप्त राहिले. थँक्स हं आशिश. "
" चालतं गं...देर आये दुरुस्त आये...तन्मयला आवडतं का त्यांचं घर ?"
" आवडतं ? अरे तो तेथेच असतो नेहमी. बरं नाही वाटत रे...त्यांना काय वाटेल ?"
" काही नाही वाटणार .लहान मुलांनी भरलं घर आहे ते. बरं ...उद्या शेखरला घेऊन जेवायला ये. संध्याकाळी विद्या फोन करीलच तुम्हा दोघांनाही " आशिश उठत म्हणाला. ती काही बोलणार तोच ' नो कमेंटस् ' म्हणत तो बाहेर पडला.
          × × × ×
                   
             आशिश हा शेखर व रुपाचा मित्र होता. मुंबईला शिकत असताना रुपा व आशिश वर्गमित्र होते. कॉम्प्युटर सायन्समध्ये दोघांनीही एकदमच पदवी घेतली होती. आशिशच्या नागपुरी भाषेला सुरवातीला सगळे हसत. पण हळूहळू तो रुळला होता. शेखरचे बी.टेक.पूर्ण होताच त्याला दुबईला जॉब ऑफर मिळाली. रुपाशी लग्न करूनच दुबईला जावे असे शेखरला वाटले. त्याने आशिशच्या मदतीने सगळे जुळवून आणले. शेखरच्या आई बाबांचा आशिशवर खूप जीव होता. त्याचा स्वभावच लाघवी होता.
              रुपा उच्च मध्यमवर्गीय आईबापाची एकुलती एक मुलगी होती. लाडात वाढलेली, जिद्दी, एककल्ली ! त्याउलट शेखर भरल्या कुटुंबातून आला होता. पनवेलला त्यांचा मोठा वाडा होता. आजी, आजोबा, आई वडील, दोन काका, काकू, आणि भावंडं....चुलत भावंडांची लग्ने झाली होती, त्यांची लहान मुले....असे सगळे एकत्र राहत. हसणे, खिदळणे, रुसवे फुगवे, थट्टा मस्करी, रागावणे ,भांडणे या सगळ्यातून सारे कुटुंब एका अतूट नात्याने बांधले गेले होते. लहान मुलांच्या बागडण्याने सगळा वाडा फुलून येत असे.
          आशिशच्या मध्यस्थीने शेखर व रुपाचे लग्न झाले. रुपा या घरात आली. तिला या वातावरणाची सवय नव्हती. प्रत्येकाला स्वतंत्र बेडरुम असले तरी रात्र सोडली तर दिवसभर एकमेकाशी बोलायलाही संधी मिळत नसे. रुपा फारशी कोणात मिसळत नसे. तिला घरातील नाती सुद्धा कळत नव्हती. तिला लवकरात लवकर हे घर सोडावेसे वाटत होते. दुबईच्या संधीने तिची वाट मोकळी केली.
           दुबईत दोन वर्षे काढल्यावर ते पुन्हा मुंबईत आले. पुन्हा त्या वाड्यात राहावे लागेल म्हणून ती नाराज होती पण तन्मयची चाहूल लागली होती. तिचे लाड कौतुक पुरवणे सुरु झाले, तशी ती सुखावली.
              तन्मयच्या जन्मानंतर काही काळ तिला जड गेला. शेखरला ऑफिसच्या कामानिमित्त जर्मनीला जावे लागले. सहा महिने तो तेथे होता. त्या सहा महिन्यात तिला घरच्यांशी जुळवून घेणे फार जड जाऊ लागले.
            ती बरेचदा माहेरीच राहत असे. तिच्या एककल्ली स्वभावाची आता सर्वांनाच कल्पना आली होती.
         दोनच वर्षांनी शेखरला नागपूर ब्रँचचा हेड म्हणून संधी मिळाली. तो नागपूरला निघून गेला. रुपा माहेरीच होती. ती सासरी राहायला तयारच नव्हती.
           एक दिवस तिला आशिशचा फोन आला. त्याने तिच्यासाठी जॉब पाहिला होता. ती आनंदून गेली. तिने लगेच नागपूरची तयारी केली.
                         ×××××××××××
  आशिशच्या मदतीनेच त्यांना रामदासपेठेत एक चांगले घर मिळाले. पण रुपा कधी कोणाशीही मिळून मिसळून वागत नसे. आशिशने तिला नेहमी म्हणत असे," अगं, जरा शेजा-यांशी बोल, ओळखी काढ..त्यामुळे तुला व तुझ्या कुटुंबाला करमेल.." त्यावर ती म्हणायची, " छी: ! अरे काय ती त्यांची भाषा...त्यांचे मोठ्या आवाजात बोलणे...पोरांच्या शिव्या व त्यांचे खेळ....शी:!  मी तर माझ्या तन्मयला शेजारच्या पोरांत मिसळूच देत नाही."
" आम्ही नागपूरकर जरा मोकळ्या स्वभावाचे असतो. अघळपघळ बोलणे...वागणे.. ! पण तू तर आम्हाला तुच्छतेनंच झिडकारलं... एकदा शेजारी थोडे संबंध वाढव मग त्यांचा शेजारधर्म बघ...."
" नको रे बाबा, इकडची भाषाच माझ्या अंगावर काटा आणते.."
" नाही रुपा ! असे म्हणू नकोस ! प्रत्येक भागात एक अस्सल प्रादेशिक भाषा असते. तिचेच आपल्यावर खरे संस्कार असतात. पुस्तकी भाषा आपण शाळेत शिकतो. महाराष्ट्रभर संवादाचे माध्यम जरी पुस्तकी भाषा असली तरी आपले संस्कार मूळ भाषेतच आपल्यावर झालेले असतात. आई, बाबा, काका, काकू, आजी, आजोबा सगळ्यांशी आपले जिव्हाळ्याचे नाते असते. या जिव्हाळ्याने, आपुलकीने घर आपल्याला बांधून ठेवते, लळा लावते." आशिश भावनावश होऊन म्हणाला होता.
          एकदा आशिशकडे शेखर व रुपा जेवायला आले होते. आशिशच्या मुलाचे ...कैवल्यचे व तन्मयचे चांगले मेतकूट  जमेल असे वाटले होते पण घडले भलतेच. कैवल्यची सारी खेळणी तन्मयने हिसकावून घेतली. तो कैवल्यला खेळूच देईना. शेखर रागावला. रुपा चिडून मारायला धावली. तिला आशिशने आवरले.
" अरे, हा नेहमी असाच वागतो. आपली कोणतीही वस्तु कोणालाच देत नाही. शेअरींग नाहीच याच्याकडे.." रुपा चिडून म्हणाली.
" सोप्पं कारण आहे रुपा. तो एकटाच असतो म्हणून एकलकोंडा झालाय. त्याच्या वयाच्या मुलांमध्ये तो राहू लागला की आपोआपच शेअरींग येईल त्याच्यामधे."
" मी काय म्हणते रुपाताई... तुम्ही आता दुस-या बाळाचा विचार करा. म्हणजे तन्मयला खेळायला एक बाळ येईल." विद्या हसून म्हणाली तशी रुपाने तिला धपाटा घातला. सगळे हसू लागले.
                           ×××××××××××××
    आशिशने रुपाला एकदा बळजबरीने तिच्या शेजारी नेले. घर फार मोठे होते त्यापेक्षाही घरातील सर्वांची मने फार मोठी होती. डॉक्टर काका फारच प्रेमळ होते. काकू तर खूपच लाघवी होत्या. त्यांचा मुलगा महेश शेखरच्याच वयाचा होता. तो आणि त्याची बायको मनाली दोघेही डॉक्टर होते. स्वभावाने खूप चांगले. अगदी थोड्या वेळातच रुपा त्या कुटुंबात मिसळून गेली. एवढे दिवस आपण त्यांच्यापासून फटकून राहिल्याची तिला खंत वाटू लागली. आताशा रोज ती त्यांच्याकडे जाऊ लागली. महेश व मनालीशी तिचे छान सूत जुळले. डॉक्टर काका तन्मयशी व त्यांचा नातू सुहृदशी खूप खेळायचे. तन्मय तेथे रोज खेळायला येऊ लागला.
                           ××××××××××××
.........शेखर सोबत रुपा घरी आली. तन्मय अजूनही शेजारीच होता. फ्रेश होऊन दोघेही डॉक्टरकाकांकडे आले. तन्मय व सुहृद समोर बरीच खेळणी पडली होती व प्रत्येक खेळणे दोघेही एकमेकांना देत होते. रुपाचा विश्वासच बसेना. तन्मय आणि शेअरींग ?
       रुपाने काकांना सारं सांगितलं. काका हसले. दोघांनाही जवळ बसवून ते म्हणाले, " तुम्ही दोघेही कामावर जाता व बाळाला मोलकरणीवर सोपवता. त्याच्यावर संस्कार कोणाचे होतील ? तुम्हाला त्याच्याशी खेेळायला किती वेळ मिळतो ? बाळ जन्माला येतं कुटुंबात..वाढतं कुटुंबात..त्याच्यावर आपल्याच कुटुंबाचे संस्कार होतात. एकत्र कुटुंब असलं की बाळ सुरक्षित असतं. त्याला सर्वांचं प्रेम मिळतं. त्याला प्रेमाचं महत्व कळतं. आजी आजोबांसाठी नात किंवा नातू म्हणजे दुधावरची साय असते. स्वत:च्या जीवापाड ते त्यांना जपतात. त्यांच्यावर भरभरुन प्रेम करतात. तुमचा मुलगा या गोष्टीपासून वंचित राहतो असं नाही वाटत तुम्हाला ?"
" काका, आमची चूक आम्हाला कळतेय पण काही इलाज नाही. आता तुम्हीच त्याचे आजोबा होऊन त्याला वळण लावलंत. खरंच हे आम्ही कधीच विसरु शकणार नाही." शेखर सद्गदित होऊन म्हणाला.
डॉक्टरकाकांनी त्याच्या पाठीवरुन हात फिरला.  रुपा कसल्या तरी विचारात गढलेली होती. ते जायला निघाले तसा तन्मय आजोबांना बिलगला. तो त्यांना सोडीना. सर्वांना हेलावणारा प्रसंग होता तो.
                 रात्री आशिशकडे जेवायला गेल्यावर हा सगळा प्रसंग शेखरने त्याला सांगितला. आशिशने तन्मयकडे पाहिले. तो कैवल्यशी खेळण्यात गुंतला होता.
   " रुपा, कसला विचार करतेस ?" आशिशने तिला विचारले.
   " शेखर, आशिश...मला खरंच पश्चाताप होतोय. पनवेलच्या घरात माझं मन रमेना. आई बाबांशी मी तुटक वागायचे. काका, काकू किंवा इतर सारेच मला परके वाटायचे. पण तन्मयच्या वेळी त्या सगळ्यांनी माझी केवढी काळजी घेतली. ....मला .....मला परत जायचंय...पनवेलला.... सगळ्यांची माफी मागायचीय..." रुपा रडू लागली.
  आशिशने तिच्या खांद्यावर थोपटले. " रुपा, तुला नागपुरला जॉब मिळवून देण्याबाबत मला काकांनी....शेखरच्या बाबांनीच फोन केला होता. तुझी द्विधा मन:स्थिती त्यांना कळली होती. "
ती अधिकच रडू लागली. हे पश्चातापाचे अश्रू होते. एकत्र कुटुंबाचे महत्व तिला पटले होते. " शेखर, आपण कधी जायचे पनवेलला ?"  तिने विचारले तसा तो हसला.
" बघतो, मी बदलीचाच प्रयत्न करतो." शेखर म्हणाला.
आशिश समाधानाने हसला.
" बरं, रुपा एक सांग....तुम्ही दोघेही तन्मयला घरी शेरू म्हणून कां हाक मारता ?"
दोघेही मनमोकळे हसले.
" अरे, शेखरचा ' शे ' आणि रुपाचा ' रु ' मिळून आम्ही त्याला शेरु म्हणतो."
सर्वजण जोरजोरात हसू लागले.
                                    •••••••
                                        सुरेश पुंडलिकराव इंगोले
                                          शहापुर. . जि. भंडारा. 
                                         .   9975490268

Sunday 27 September 2015

साफल्य


           शिंदे सर लगबगीने घराकडे निघाले होते. हातात भाजीची पिशवी होती. आज जरा उशीरच झाला होता. आता जेवून कॉलेजला जायला मिळणार नव्हते. निवृत्तीचे दिवस जवळ आले होते. वक्तशीरपणा आयुष्यभर पाळला होता. त्याला अखेरच्या दिवसात गालबोट लावून चालणार नव्हते.
          
ते घराच्या कोप-यावर वळणार तेवढ्यात समोरून महेश कावरे व त्याचे चेलेचपाटे आले. महेशने दोन्ही हात जोडून मानभावीपणे नमस्कार केला. 
          "
नमस्कार सर ! भाजी घेतलेली दिसतेय्. स्वस्त मिळाली ना ! भाव जास्त लावला असेल तर आपल्याला सांगायचं हं ! दुकान बंद करुन टाकू त्याचं...."
          "
ठीक आहे. मला जरा घाई आहे." असे म्हणून त्यांनी पुढे पाऊल टाकले तोच महेश आडवा आला. 
         "
अहो सर, कुठे जाताय ? तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय्. "
   "
मला कॉलेजला जायचंय, उशीर होतोय. " त्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला पण महेशच्या टोळक्याने संपूर्ण वाटच अडवली होती. त्यांचा नाईलाज झाला. 
   "
बोल, काय म्हणायचंय तुला ?" त्यांनी त्याच्या नजरेत रोखून पाहत विचारले.
    "
आता पुन्हा निवडणुका जाहीर झाल्यात. यावेळी जिल्ह्याच्या राजकारणात नशीब आजमावयाची इच्छा आहे. तुमच्या आशीर्वादाने गेली पंधरा वर्षे सरपंच म्हणून गावाची सेवा करतोय. म्हटलं आता जिल्ह्याची सेवा करावी. " महेशने परत हात जोडून मान झुकवली. त्याच्या चेह-यावरचं छद्मी हास्य सरांच्या नजरेतून सुटलं नाही. तरीही संयम राखून ते म्हणाले, 
"
काय करायचे ते करा. मला काय त्याचं." 
"
असं कसं म्हणता सर ? तुम्ही राज्यशास्त्र शिकवलंत, त्याचाच तर हा परिणाम. तुम्ही शिकवलं, आम्ही आचरणात आणलं. काय रे पोरांनो ?" 
"
खरं आहे भाऊ..." सगळे एकजात ओरडले.
"
हे मी शिकवलेलं राज्यशास्त्र आहे ? लोकांना लुबाडणं शिकवलं मी ? अडाण्यांचा हक्क हिरावणं शिकवलं मी ? मतं विकत घेऊन निवडून यायला शिकवलं मी ? " शिंदे सरांचा संयम सुटत चालला. " गेली १५ वर्षे तू काय चालवलंय ते कोणीही विसरलेलं नाही. पण सगळे एकजात षंढ. विरोध करायची हिंमत नाही. मुकाट सोसताहेत सारे."
"
अहो सर, चाणक्याची नीती तुम्हीच शिकविली. कौटिल्याचं अर्थशास्त्र तुम्हीच शिकवलं. विसरलात !"
   "
अरे चाणक्य म्हणजेच कौटिल्य रे ! कौटिल्याचं अर्थशास्त्र म्हणजे धन कमावण्याचं शास्त्र नव्हतं . राजकारणाचा अर्थ त्यात समजावून सांगितला होता. मात्र मौर्यकालीन कुटील डावपेच तुझ्या लक्षात राहिले. लाज वाटते रे मला तू माझा विद्यार्थी आहेस हे सांगायला." शिंदे सर तळमळीने म्हणाले, तसा तो खदखदा हसू लागला. 
   "
सर, माझ्या विरोधात तुम्ही बरेच प्रयत्न केलेत. मी तरीही तुम्हाला दुखावलं नाही. आपण मानतो तुम्हाला. तुम्ही आपले गुरु आहात. याही निवडणुकीत माझ्या विरोधात काय करायचं ते करा. पण तुम्ही प्रत्येक वेळी हरता तेव्हा आपल्याला फार वाईट वाटतं. चला, यावेळी पुन्हा एक संधी तुम्हाला." त्याचे टोळके  जोरजोरात हसू लागले.
     "
विनाशकाले विपरीत बुद्धी " असे पुटपुटत शिंदे सर घराकडे निघाले.
आज कॉलेजला जाणे शक्यच नव्हते. त्यांनी आजवर कधी उशीर केला नव्हता. तशीच वेळ आली तर ते सुटी टाकत. पण अशी वेळ फारशी येत नसे.
     
जेवण झाल्यावर शतपावली करताना त्यांच्या डोळ्यापुढून सगळे प्रसंग सरकू लागले.
           
         
महेश कावरे हा गावपाटलाचा मुलगा. पाटील सज्जन माणूस होता. लोकांच्या अडीअडचणीला सदैव धावून जात असे. लोक त्याना मान देत, त्यांचा सल्ला घेत. गावकरी खाऊन पिऊन सुखी होते.
         
महेश जात्याच थोडा गर्विष्ठ होता. पाटीलकी त्याच्या अंगात मुरलेली होती. लोकांशी तो मग्रूरीने वागत असे. एखाद्या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे सारा गाव आपल्याला टरकला पाहिजे, अशी त्याची भावना होती. मात्र पाटील त्याला मनमानी करू देत नसत. शाळेत असताना त्याची मग्रूरी वाढली होती. पाटील शिक्षण समितीचे अध्यक्ष असल्यामुळे शिक्षक त्याची मग्रूरी खपवून घेत. पण तो अकरावीत आला आणि शिंदे सरांशी त्याची गाठ पडली. गृहपाठ, शिस्तपालन, गैरहजेरी सर्वच बाबतीत त्यांनी महेशचा ताठा उतरवला. त्यांच्या बाबतीत महेशने धनराज पाटलांकडे बरेचदा तक्रार करुन पाहिली. पण, शिंदे सरांचं स्वच्छ चारित्र्य प्रबळ ठरलं. महेशला ११ वी व १२ वीच्या दोन वर्षात सरळपणे वागावं लागलं. त्याला चांगल्या सवयी लागल्या. परिणामी पुढे पदवीपर्यंत त्याचं शिक्षण सहज पार पडलं. पाटलांचा वचक असल्यामुळे त्याला मनमानी करता आली नाही.
          
पदवी घेवून गावात आल्यावर हळूहळू रिकामटेकड्या टोळभैरवांची फौज त्यानं तयार केली. ग्रामपंचायतची निवडणूक जाहीर होताच त्यानं पाटलांना उमेदवारीसाठी गळ घातली. तरण्या पोराच्या हाती कारभार जाऊ द्यावा, या उद्देशाने पाटलांनीही होकार दिला. 
           
गावातला महेशच्याच वर्गात शिकणारा सुताराचा मोहन हुशार आणि तल्लख बुद्धीचा होता. अतिशय सरळमार्गी. तो शिंदे सरांचा आवडता विद्यार्थी होता. घरच्या गरीब परिस्थितीमुळे त्याचं शिक्षण थांबलं. सरांच्या प्रेरणेनं त्यानं गावात राहून व वडिलांना सुतारकामात मदत करून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. तो नेहमी लोकांच्या मदतीला धावून जात असे.
               
ग्रामपंचायतच्या निवडणुकीत त्यानं उभं रहावं असं शिंदे सरांनी सुचवलं. त्यावर्षीच्या निवडणुकीत मोहनला सर्वाधिक मतं मिळाली होती. मात्र पाटलांच्या पुण्याईनं सरपंचपदाची माळ महेशच्या गळ्यात पडली होती.
            पुढील दोन्ही निवडणुकीत साम दाम दंड भेद वापरून महेशनं सरपंचपद प्राप्त केलं होतं. मोहनला सर्व गावाचा पाठिंबा असे. शिंदे सर त्यालाच झुकतं माप देतात व यापुढे त्याच्याशी सामना करणे फार जड जाईल, याची कल्पना आल्यानं महेशनं मोहनला एका खोट्या खटल्यात गोवलं. गरिबाला कोर्टाचे खेटे घालणं झेपत नाही, हे तो जाणून होता. म्हणून आज त्याने शिंदे सरांना खुलं आव्हान दिलं होतं.
             • • • • •
    
शिंदे सर घरात येऊन आरामखुर्चीत बसत नाही तोच मोहन आत आला. 
"
अरे, ये मोहन ये. बरे झाले तू आलास. आता तुझीच आठवण काढत होतो."
"
काही विशेष सर?" मोहनने विचारले.
"
अरे, जिल्ह्याच्या निवडणुका जाहीर झाल्याचे कळले. तू उमेदवारी भरावीस असे वाटते."
"
मी उमेदवारी अर्ज भरू नये याची आधीच तरतूद केली गेली आहे ना सर !" तो विषण्णपणे हसून म्हणाला.
"
एवढ्यात हिंमत हरलास ? " 
"
पण काही इलाज आहे का ?"
"
म्हणूनच तुला बोलावले आहे. तुझ्यावरचा आळ खोटा आहे हे सर्व जनतेसमोर सिद्ध करायची तुला संधी मिळत आहे. ती सोडायची आहे का तुला ? " सरांनी विचारले.
"
पण सर मी काय करू शकतो ?" तो हतबलतेने म्हणाला.
"
तू जनतेसमोर सभा घेऊन आपले निरपराधित्व सिद्ध करायचेस.  त्याने दोन फायदे होतील. तुझी प्रतिमा उंचावेल. लोक तुझं कार्य जाणतातच. तू निर्दोष आहेस हे कळल्यावर तुला भरभरून मते मिळतील. अरे, तुझ्यासारखे निगर्वी, निर्लोभी व सचोटीचे लोक जर राजकारणात आले तर या देशाचं चित्रच पालटून जाईल." सरांच्या डोळ्यातील उज्ज्वल भारताचं चित्र त्याला दिसू लागलं तसा तो मोहरला.
"
हे शक्य होईल का सर ? " त्याने आशाळभूतपणे विचारले.
"
होईल... नक्की होईल. " सर घड्याळाकडे पाहत म्हणाले. 
"
कोणाची वाट बघताय का ? कोणी येत आहे का ? " त्याने सहज विचारले.
तसे सर हसून म्हणाले, " हो, माझा बहिर्जी नाईक येत आहे. "
     
शिंदे सरांनी मोहनला थोडक्यात कल्पना दिली. चार पाच वर्षापूर्वी एक चुणचुणीत मुलगा त्यांचा विद्यार्थी होता. खूप चांगल्या गुणांनी बारावी उत्तीर्ण झाल्यावर पुढे काय करावे हे विचारायला तो सरांकडे आला होता. त्याच्यातील गटस् पाहून सरांनी त्याला शोध पत्रकारितेकडे जायला सांगितले होते. त्यालाही ते आवडले. तो त्यात खूप रमला. आज त्याच्याकडे पत्रकारितेची पदवी आहे. निरनिराळ्या वर्तमानपत्रांसाठी तो स्तंभलेखन करतो. विविध चॅनलवर त्याच्या सनसनाटीं बातम्या झळकत असतात. 
त्यालाच मोहनवरील खोट्या आरोपाबाबत चौकशी करायला सरांनी सांगितले होते.
   " सर, तुम्ही चैतन्यबद्दल तर बोलत नाही ना " मोहनने आतुरतेने विचारले. सर दिलखुलास हसले. तेवढ्यात चैतन्य आत दाखल झाला. मोहनने त्याला घट्ट मिठी मारली. चांगला उंचपुरा, धिप्पाड, रुबाबदार चैतन्य मोहनच्या मिठीने भारावून गेला. त्याला कोचावर बसवीत तो म्हणाला, " दादा, तुम्ही माझे आदर्श आहात. तुमच्याविषयी सर नेहमी भरभरुन बोलायचे. तुमच्यावर किटाळ आल्याचे कळताच मी सर्व कामे बाजूला ठेवून आधी हे काम हाती घेतले व पूर्णही केले."
         
चैतन्यने मोहनवरील आरोपांच्या संदर्भात चौकशी करताना बोलणे रेकॉर्ड करीत पुरावे गोळा केले होते. महत्वाचे पुरावे विडियोमध्ये शूट केले होते.
  " दादा, तुम्ही या सर्व पुराव्यांचा अभ्यास करा. त्यानुसार भाषणांची टिपणं तयार करा. जनतेसमोर तुम्हाला या गोष्टी मांडायच्या आहेत. सर्व आरोप हाणून पाडायचे आहेत. तुमचं निर्दोषत्व सिद्ध होताच सर्व स्तरातला पाठिंबा तुम्हाला मिळेल."
"
उमेदवारीचे काय ? मला तर अर्जही भरता येणार नाही." मोहन अजूनही साशंक होता.
चैतन्य हसून म्हणाला, " अहो दादा, २५ तारीख उमेदवारी अर्ज भरायची शेवटची तारीख आहे. २४ तारखेला सर्व चॅनल्सवर  हे व्हिडिओ दाखवण्यात येतील. २५ तारखेच्या सर्व प्रमुख वृत्तपत्रात बातम्या झळकतील. तुमचा अर्ज मान्य होईल आणि महेश कावरेचा अर्ज नामंजूर होईल. चला लागा तयारीला. मोहनने चैतन्यचा हात घट्ट धरला. तो भारावून गेला होता.
   
शिंदे सर कौतुकाने दोघांकडे पाहू लागले. त्यांच्या डोळ्यातील स्वप्न गिरक्या घेऊ लागले होते. सचोटीच्या चारित्र्यवान नेत्यांचा भारत त्यांना दिसू लागला होता. दोघेही पाया पडू लागले तसे ते भानावर आले. दोघांनाही जवळ घेत ते म्हणाले, "तुमच्यासारखी मुलं असताना कोण म्हणेल मी निपुत्रिक आहे म्हणून " क्षणभर थांबून ते म्हणाले, " निवडणुका संपताच पुढच्या महिन्यात माझी निवृत्ती आहे. माझा निवृत्ती सत्कार तुमच्या हस्ते व्हावा ही माझी आंतरिक इच्छा आहे."
   
चैतन्य लगेच म्हणाला, " सर, तुमचा सत्कार  जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षांच्या हस्ते होईल."
तिघेही खळखळून हसू लागले.

                              सुरेश पुंडलिकराव इंगोले
                                 
शहापूर    जि. भंडारा
                                  9975490268

गुरुदक्षिणा


         दुपारचं रणरणतं ऊन. झाडाचं पान सुद्धा हलणार नाही इतकी नीरव शांतता पसरलेली. सारं शिवार गपगार पडलेलं. गुरं ढोरं वडाच्या झाडाच्या सावलीत रवंथ करीत निवांत बसलेली. त्याच झाडाच्या बुंध्याशी पंचा अंथरून कृष्णा पुस्तक वाचत बसलेला. त्याची तंद्री लागली होती. एक पुस्तक संपवून दुसरे, दुसरे संपवून तिसरे.... तो अधाशासारखा वाचत सुटला होता.
      
          उन्ह कलली. गुरं जागची उठायला लागली तसा तो भानावर आला.त्याने पुस्तके पिशवीत घातली. पंचा झटकून खांद्यावर घेतला. बाटली तोंडाला लावून पाणी संपविले व गुरांना एकत्र करून गावाकडे निघाला. गुरं रेंगाळत होती, कुठे हिरवळ दिसली की थबकत होती.गुरं चरत असताना उभ्या उभ्याने कृष्णा एखादे पुस्तक काढून वाचत होता. वाचताना भान नसायचे त्याला.
          कृष्णाचा बाप अशिक्षित होता. त्याला शिक्षणाचे काही महत्व नव्हते. कृष्णाने कामाला जाऊन चार पैसे मजुरी कमवावी म्हणून तो त्याचे नाव शाळेत टाकायलाही तयार नव्हता. पण यशोदा त्याला स्वत: शाळेत घेऊन जायची. त्यासाठी तिने कितीदा तरी नव-याचा मार खाल्ला होता. पण हट्ट सोडला नव्हता.
" मी सोता मजुरी करीन पन माह्या किसनाले शिकू द्या " अशी तिने वारंवार बळवंताची विनवणी केली होती.
       आई शाळेत नेऊन द्यायची आणि वडील शाळेतून मारत मारत त्याला मजुरीला घेऊन जात असे. कोणत्याही वर्गात तो कधीच नियमित नसायचा. मात्र शाळेची प्रत्येक विषयाची पुस्तके तो वाचून काढत असे.
     कृष्णा हुशार होता. एकपाठी होता. तो कुणाचीही कामे करीत असे. सदानंद काळे हा जिल्ह्याच्या वर्तमानपत्राचा पत्रकार होता. कृष्णा त्याची सगळी कामे आनंदाने करी. कृष्णाची हुशारी सदानंद जाणत होता. त्याची वाचनाची आवड त्याला माहीत होती. सदानंदने त्याला घरोघरी वर्तमानपत्र टाकण्याचे काम दिले होते. वेळ मिळेल तेव्हा तो हाती पडेल ते वर्तमानपत्र वाचून काढत असे. सर्व ताज्या घडामोडी त्याला माहित असायच्या.
       कृष्णाचे शाळेचे होत असलेले नुकसान सदानंदाला दिसत असे. त्याला थोडी शाळाबाह्य शिकवणी मिळाली तर तो जिल्ह्याचे नांव काढील असे त्याला वाटे. तसे त्याने अनेकदा यशोदेला बोलून दाखविले होते. त्यांच्या झोपडीला लागूनच गिरडे मास्तरचे घर होते. अनेक मुले त्यांच्याकडे शिकवणीला येत. पण ते आधी पैसे घेतल्याशिवाय कोणालाही क्लासमध्ये बसू देत नसे.
        यशोदेने तरीही हिंमत करून एक दिवस गिरडे मास्तरला कृष्णाच्या शिकवणीबद्दल भीत भीत विचारले, तसे ते एकदम भडकले.
     " शाळेची फी भरायची ऐपत नाही, शिकवणीचा कसला विचार करता ? माझ्या कडे येणारे विद्यार्थी एका विषयाच्या कोर्सचे दोन हजार रुपये देतात. तुमची आहे का तेवढे पैसै भरायची तयारी ?"
       बिचारीने शिकवणीसाठी गिरडे मास्तरच्या किती नाकदु-या काढल्या होत्या. पण त्यांनी तिला हाकलून लावले.
        कृष्णाने तिची समजूत घालून एक सोपा पर्याय निवडला होता. त्याच्या कुडाच्या झरोक्याजवळ त्यांचा प्रत्येक शब्द न् शब्द ऐकू येत होता. तेवढा वेळ कोणतेही काम सांगायचे नाही अशी त्याने मायला अट घातली होती. आणि अशी त्याची शिकवणी सुरु झाली होती.
                  × •×•×•×•×•×•×•×•
       कृष्णा आता कॉलेजच्या दुस-या वर्षाला होता. त्याला सदानंदच्या मदतीने कॉलेजची फी माफ झाली होती. दहावीला सत्तर टक्के मार्कस् मिळाल्यावर  कृष्णाच्या वडिलांची सदानंदने समजूत घातली होती. त्यांनी त्याला कामावर पाठवणे बंद केले होते. परिणामी बारावीत कृष्णाला नव्वद टक्के मार्क्स मिळाले होते. तो आताशा सदानंदसोबतच असायचा. त्याची पत्रकारिता व त्याचे सामाजिक कार्य कृष्णाला फार आवडायचे.
        हल्ली सदानंद त्याला रोज सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारायचा व कृष्णा त्याचे अचूक उत्तर द्यायचा. अवांतर वाचनाने आणि वर्तमानपत्रामुळे त्याचे ज्ञान समृद्ध झाले होते.याच ज्ञानाच्या जोरावर कृष्णा एक दिवस खूप मोठ्ठ्या पदावर जाईल असे सदानंदला वाटे. त्याने कृष्णाला एक मोबाईल घेऊन दिला होता. पण त्याला तो वापरण्याची लाज वाटायची. बहुधा तो मोबाईल सदानंद जवळच असायचा.
      एके दिवशी सदानंद आनंदाने धावत आला व कृष्णाला मिठी मारून म्हणाला, " मुंबईची तयारी कर, दोस्ता !". त्याला काही कळेना. सदाने यशोदेला व बळवंताला जवळ बसवले व त्यांना समजेल अशा भाषेत तो सांगू लागला. ' कौन बनेगा करोडपती ' या कार्यक्रमासाठी विचारल्या गेलेल्या प्रश्नांची
कृष्णाने अचूक उत्तरे दिली होती आणि लाखो करोडो लोकांतून जे भाग्यवान निवडले गेले त्यांत कृष्णाची वर्णी लागली होती. एक दोन दिवसात मुंबईहून गाडी येऊन त्यांची मुलाखत, गावाचे, शिवाराचे शूटिंग करणार होते. मग बोलावणे येताच त्याना सर्वांना मुंबईला जायला मिळणार होते. थाटात राहायला मिळणार होते.
      साक्षात अमिताभ बच्चनशी बोलायला मिळणार म्हणून कृष्णा खूपच आतुर झाला होता. जन्मात कधी रेल्वेतही न बसलेल्या या तिघांना विमानाने मुंबईला जायला मिळाले. त्यांची अवस्था अनाकलनीय होती. कृष्णाने गळ घातल्यामुळे सदानंदने नागपुरातून त्यांना विमानात बसवून ट्रेनने मुंबई गाठली.
      अखेर तो दिवस उजाडला. फास्टेस्ट फिंगर फर्स्ट चा राउंड जिंकून कृष्णा अमिताभ बच्चन समोर हॉट सीटवर बसला. आणि आपल्या धीरगंभीर आवाजात अमितजी बोलू लागले," अब हमारे सामने हॉट सीटपर बैठे है के बी सी. केबीसी में केबीसी यानि कौन बनेगा करोडपती में कृष्णा बलवंत चव्हान"
प्रेक्षकांत हास्याची लाट उसळली. अमितजींनी त्याचा परिचय दिला. गुरे राखणारा एक मुलगा कसा येथवर आला हे सांगत त्याच्या शिरपूरचा विडियो दाखवला. त्यांनी कौशल्याने त्याचा बुजरेपणा घालवला. त्याचे आईवडील बोलूच शकले नाहीत. त्यांच्या वतीने सदानंद बोलला.
        प्रश्नांना सुरुवात झाली. अचूक उत्तरे देत कृष्णा एक एक पायरी चढू लागला. हळूहळू धीटपणे तो बोलू लागला. त्याने दोन्ही पडाव पार केले. चार ही लाईफलाईन संपल्यावर तो निग्रहाने पंचवीस लाखांपाशी थांबला. त्याने खेळ सोडल्यावर अमितजींनी त्याला पन्नास लाखाच्या प्रश्नाचे उत्तर विचारले. त्याने दिलेले उत्तर बरोबर होते. परंतु पंचवीस लाख गमावल्याचे त्याला दु:ख झाले नाही.
       " क्या करेंगे आप इन पैसों का ?" सही करून त्याला चेक देताना अमिताभ बच्चननी विचारले. कृष्णा क्षणभर स्तब्ध झाला. कदाचित त्याचा जीवनपटाची झलक त्याला दिसली असावी. विचारपूर्वक तो बोलू लागला,
" मनुष्य के लिये ज्ञान सर्वोपरी है | मैं मवेशिया ही चराता रहता तो यहाँतक कतई नही आ पाता | यह ज्ञान देने वाले मेरे पहले गुरू हैं, पडोस के गिरडे सर ! उनकी शिक्षासे मेरी पढ़ाई की नींव रखी गयी | मैं उन्हें इस राशी से एक लाख रुपये प्रदान करता चाहता हूँ | मेरे माँ बाप के लिये अच्छासा पक्का मकान बनवाना है | पिताजी को अब मेहनत ना करना पड़े इसलिये एक डेली नीडस् की दुकान लगवा देना है और ......." थोडे थांबून त्याने प्रेक्षकात बसलेल्या सदानंदकडे पाहिले. त्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
      " जीवन में नेक मार्गदर्शक ना हो तो जीवन दूभर हो जाता है | मुझ अनपढ़ को सही दिशा दिखानेवाला मेरा मार्गदर्शक सदानंद भैया, जो यहाँ भी मेरा आधारस्तंभ बनकर मौजूद है, उसे खुद का अखबार शुरू करने के लिये बची खुची सारी राशी मैं देना चाहता हूँ |" कृष्णाने सदानंदला तेथे बोलावण्याची परवानगी मागितली. स्वत: अमिताभ बच्चन यांनी सदानंदला नांव घेऊन बोलावले. सदानंद भरल्या डोळ्यानेच आला व त्याने कृष्णाला कडकडून मिठी मारली. दोघेही रडू लागले. अमिताभ बच्चन कौतुकाने दोघांकडे पाहत होते.
      गावात आधीच बातमी पोचली होती. सगळ्या गावाने कृष्णाला डोक्यावर घेतले. त्याच्या सत्काराच्या कार्यक्रमात मंचावर अचानक गिरडे सर आले व त्यांनी माईक हातात घेऊन अपराधीपणाने कबूल केले, " कृष्णा खरोखरच एकलव्य आहे व त्याने त्याची जाणीव ठेवली पण मी कधी ही द्रोणाचार्य होऊ शकलो नाही. कृष्णाने कृतज्ञपणे देऊ केलेली रक्कम घेण्याचा मला काहीच अधिकार नाही व तो परत ही घेणार नाही म्हणून मी त्याच्याच नावाने ही रक्कम शाळेला दान करीत आहे. कृष्णासारख्या होतकरू मुलांच्या शिक्षणाला त्या रकमेची मदत व्हावी."
                            सुरेश पुंडलिकराव इंगोले....
                             शहापुर.. जिल्हा...भंडारा
                               ( 9975499268 )

श्रावण

शब्द बाण •••••
            
              श्रावणसरी सकाळपासून कोसळतच होत्या. तशा त्या बेभरवशाच्याच ! कधीही येणार... कधी ही जाणार...छत्री घेऊन बाहेर पडावे तो चक्क उन्हं पडणार...छत्री विसरुन बाहेर पाऊल टाकले तर क्षणात बरसून चिंब भिजवणार !
                  त्या थेंबांचे नर्तन पाहत नंदिनी खिडकीशी ओठंगून उभी होती.एखादी उनाड सर तिच्या चेह-यावर सपकारा मारी तेव्हा ती शहारून जाई. पाडगांवकरांचे शब्द तिला आठवे....    श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा ।
उलगडला पानातुन अवचित हिरवा मोर पिसारा ।।
        तिची दृष्टी दूरवर जाई. सृष्टीची हिरवाई तिला भारून टाकीत असे.
           याच पावसाची प्रतिक्षा धरती करीत असते. संपूर्ण आषाढभर.  ढगांची फौज घेऊन पर्जन्यराजा क्षितिजावर कशाची बरे वाट पाहत असतो ? कां उगाच धरतीला मनधरणी करायला लावतो ? आणि मग धो धो बरसून तिचा रुसवा ही काढतो. ती ही राग विसरून जाते. पावसाच्या पहिल्या स्पर्शाने सृष्टीत नवचैतन्याचे वारे वाहू लागतात. आषाढसरी सृष्टीला न्हाऊ माखू घालतात, तृप्त करतात आणि तिच्या बाळसलेल्या रुपाचे कोडकौतुक करायला श्रावण येतो.........
           .... नंदिनीला श्रावणमास खूप आवडतो. अगदी बालपणापासून ! अचानक बरसणा-या श्रावण सरींनी चिंब भिजून तिने कितीदा तरी आईचा ओरडा खाल्ला होता.खळखळ वाहणा-या नालीत कागदी होड्या सोडून किती दूरवर जातात याचा खेळ ती मैत्रिणीसोबत खेळताना भान विसरून जाई. घरी आल्यावर धपाटे ठरलेलेच.
              चुपचाप घरी येऊन सर्वांची नजर चुकवून कपडे बदलायचे तर ताई नेमकी चोंबडेपणा करायची. आणि तिला धपाटे बसताना बघून हसायची. मग दोघींची भांडणे व्हायची. ती रागाने म्हणायची, " बघ हं तायडे, मला त्रास देशील तर... तर.... मी बदला घेईन."
सगळे हसायचे.  आई म्हणायची, " अगं, ती लग्न होऊन सासरी गेली की तूच रडशील तिच्या आठवणींनी ! म्हणे, बदला घेईन ! काय करशील गं ?"
   " मी.... मी.... तिचा नवरा च पळवीन." काही न सुचून ती बोलली तशी सगळे हसले होते.
××××××      एके दिवशी ती शाळेतून आली तेव्हा तिला घरात बरीच मंडळी दिसली. ती सरळ आंत शिरली व पाहुण्यांकडे निरखून पाहत असताना तिला आईने हात धरून घरात ओढले.
  " ही आमची धाकटी मुलगी, नंदिनी. बारावीला शिकते." अण्णा पाहुण्यांना सांगत होते.
" आई, कोण गं ही मंडळी ? " तिने विचारले.
" ताईला बघायला आलेत. कपडे बदल आणि बाहेर येऊ नकोस." आईने ताकीद देऊन ठेवली.
नंदिनीने फ्रेश होऊन तिचा आवडता ड्रेस  घातला व हॉलच्या दाराशी येऊन वाकून पाहिले. दोन पुरुष, दोन बाया व एक देखणा तरुण समोरच बसले होते. तिचे अण्णा, काका व मामा त्यांच्याशी गप्पा मारत होते. ती एकटक त्या तरुणाकडे पाहत राहिली. किती देखणा व रुबाबदार होता तो ! धिप्पाड, कसलेली शरीरयष्टी.... गोरा रंग... बारीक छाटलेले केस, कोरीव मिशी...
" अय्या ! सलमानखानच ! " तिने ताईच्या कानात सांगितले. ताईने लाजून तिला धपाटा घातला.
दाखवण्याचा कार्यक्रम पार पडेपर्यंत नंदिनीला आईने बाहेर येऊ दिले नाही. पाहुणे जायला निघाले, सारे त्यांना सोडायला अंगणात जमा झाले होते. नंदिनी दारातून थोडी पुढे झाली. तो तरुण एकटक तिच्याकडेच बघत होता. नजरानजर होताच अगदी ओळखीचे दिलखुलास हास्य त्याच्या चेह-यावर उमटले. ती ही हसली व एकदम घरात गेली. पाहुणे गेल्यावर घरात चर्चेला उधाण आले. मुलाचे नांव रघुनंदन होते. तो नुकताच सैन्यात अधिकारी म्हणून रुजू झाला होता.
          दोन दिवसांनी शाळेतून घरी येताच नंदिनीला जाणवले की काहीतरी अघटित घडले आहे. ताई रडत होती, आई कपाळाला हात लावून बसली होती व अण्णा नंदिनीकडे रागाने पाहत होते. ती दिसताच आई चवताळून उठली व तिच्या पाठीत धपाटे घालत ओरडली, " कार्टे, कशाला कडमडली होतीस मधे ? झालं का समाधान ताईचं लग्न मोडून ? " नंदिनीला काही कळेना काय झालं ते !
  ......... झाले असे की, दशरथ पाटलांनी निरोप धाडला होता की त्यांना सुमतीचं स्थळ रघुनंदन करीता योग्य वाटत नाही. मात्र धाकटी नंदिनी त्यांच्या मुलाला पसंत आहे व तो तिच्याशी लग्न करण्यासाठी दोन तीन वर्षे थांबायला तयार आहे......
         नंदिनीला कळेना की यात तिची काय चूक होती ? सुमतीपेक्षा ती उजवी होती, गोरी होती, नाकी डोळी नीटस होती हा काय तिचा गुन्हा होता ? रघुनंदनला ती आवडली आणि त्याने सुमतीला नकार दिला यात तिचा काय दोष होता ? पण सुमतीच्या मनाला जी गाठ पडली ती कायमचीच !
......... श्रावणझड हळूहळू थांबली व लख्ख ऊन पडले. एखाद्या सुस्नात षोडषीने ओले केस झटकावे तशी ओलेती सृष्टी मरगळ झटकून आनंदाने हसत होती. पिवळ्याधम्मक उन्हात पानांवरचे थेंब  चमकत होते. श्रावण किती आल्हाददायक असतो ! मनाला उभारी देणारा..... तिच्या मन:चक्षुपुढे सारा घटनाक्रम हलू लागला........
    दोनच महिन्यात ताईचे लग्न झाले. नवरा मुलगा कुठल्याशा कारखान्यात कामाला होता. कुटुंब फार मोठे होते. ताईला सासरी सगळ्यांचे करावे लागत होते. माहेरपणाला आली तरी ती नंदिनीशी मोकळी बोलत नसे. तिला फार वाईट वाटत असे पण सुमतीच्या मनातील अढी काही निघेना.
        रघुनंदन सुटीवर आला की तिची माहिती काढीत असे. तिला ही ते कळे. ती मनातून हरखून जाई. तिच्या डोळ्यासमोर त्याची ती राजबिंडी मूर्ती उभी राही.......
      ....… आणि तिच्या कॉलेजच्या दुस-याच वर्षी दशरथ पाटलांनी तिला रघुनंदनकरिता मागणी घातली.  अण्णांच्या डोक्यावरचे ओझे आपोआप उतरले.  लग्न पार पडले. नंदिनी सासरी जाताना खूप आनंदात होती. मनोरथ पूर्ण झाल्याचे साफल्य तिच्या चर्येवर विलसत होते. सुमती समोर दिसताच नंदिनीने तिला ' ताई ' म्हणून मिठी मारली तेव्हा तिच्या कानात तप्त तेलासारखे सुमतीचे शब्द शिरले, " माझा नवरा पळवीन असे बोलली होतीस ना, आणि खरे ही करून दाखवले तू ! पण लक्षात ठेव नंदे, मला दु:खी करुन तू सुखी होणार नाहीस."
रडत रडत ती बोलली, " नाही गं ताई, माझ्या मनात तसे कधीच नव्हते. आईशप्पथ !"
.........   सुमतीचे ते शब्द सतत तिचा पाठलाग करू लागले. तिची मानसिक शांतताच त्यामुळे भंग पावली. तिच्या हातून नेहमी चुका होऊ लागल्या. त्यामुळे तिला सासरी पदोपदी बोलणी खावी लागायची. लग्न होताच नव्याची नवलाई चारच दिवसात संपली व रघुनंदनला लष्करात परत जावे लागले. एक महिन्यात परत येतो असे सांगून गेलेला रघुनंदन बदली होऊन तातडीने काश्मिरला रुजू झाला तेव्हा त्याला घरी यायला मिळालेच नाही. त्यावेळी नंदिनीला ताईचे शब्द काळीज चिरताहेत असे वाटले होते.
     ........ दोन महिने उलटूनही जेव्हा रघुनंदनचा फोन किंवा निरोप आला नाही तेव्हा दशरथ पाटलांनी अधिका-यांना पत्रे पाठवून विचारणा केली होती पण समाधान कारक उत्तर न आल्यामुळे सर्वांच्याच काळजात चर्रर्र झाले. तो सुखरूप परत यावा म्हणून पाटलांनी घरी पूजा घातली. त्या रात्री सासुबाईच्या कुशीत शिरून नंदिनीने त्यांना सगळे सांगून टाकले.
    त्यांनी मायेने तिच्या पाठीवरून हात फिरवून तिची समजूत काढली. "अगं वेडाबाई, म्हणून तू अशी अस्वस्थ असायचीस होय ? असं काही नसतं बरं ! तुझा दोष नसल्यामुळे तुझे काहीच वाईट होणार नाही. बघ, उद्या तुला रघूचा फोन येतो की नाही ? " ती खुदकन हसली.
     •••••
       ...... पुन्हा पावसाला सुरवात झाली तशी ती भानावर आली. सासुबाईंनी म्हटल्याप्रमाणे आज रघुनंदनचा फोन किंवा निरोप येईल का ?
त्याचवेळी रेडियोवर गाणे लागले होते.....
' हाय हाय ये मजबूरी । ये मौसम और ये दूरी । मुझे पल पल है तडपाये । तेरी दो टकिया दी नौकरी वे मेरा लाखों का सावन जाये ।
     बाहेर असा पाऊस कोसळतोय अन् इकडे माझ्या अंतरात आग पेटलीय. ती विझवणारा श्रावण कधी बरसणार ? तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या.
रेडियोवर दुसरे गाणे लागले होते.
' भिर भिर बरसे सावनी अंखियाँ, साँवरिया घर आये'
......... गाणे संपत नाही तोच दारावर थाप पडली.
तिने डोळे पुसतच दार उघडले..... आणि बेभान होऊन पाहत राहिली.
   दारात तिचा साँवरिया, तिचा रघुनंदन साक्षात उभा होता...... हसत.. हसत ....!
       हातातली सूटकेस खाली टाकत त्याने बाहू पसरले. ती त्याच्या छातीवर बुक्क्या मारत रडू लागली. त्याने तिला मिठीत घेतले व तिच्या पाठीवर थोपटत राहिला.
     " सॉरी ! सरप्राईज देण्याच्या नादात तुझी काय अवस्था होईल याचा मी विचारच केला नव्हता."
    ...... श्रावण खूप जोरात बरसू लागला होता, सृष्टीची आणि नंदिनीची दाहकता शांत करण्यासाठी........
                       
                     सुरेश पुंडलिकराव इंगोले
                          9975490268