Saturday 30 June 2018

★  कोडे   ★
 
        हल्लीच्या बुफेमध्ये पंगतीच्या जेवणाची मजा नाही. घाईघाईत सगळे पदार्थ वाढून घ्यायचे. उभ्या उभ्या खायचे व उरलेले उष्टे टाकून निघायचे. ना खाल्ल्याचे समाधान ना पोट भरल्याचे सुख..

         पंगतीत जेवण्याची मजाच काही और होती. बारसे, मुंज, वाढदिवस, लग्न… कार्यक्रम कोणताही असो, जेवणाची पंगत असायची. मंडपात स्वादिष्ट पदार्थांचा घमघमाट सुटलेला असायचा. लोक पानावर बसले की पदार्थ नेटकेपणाने वाढले जायचे. उदबत्त्यांचा सुवास दरवळायचा. मग कोणीतरी श्लोक म्हणून जेवणाला आरंभ करण्याची सूचना करायचा.  भोजन सुरू असताना श्लोक म्हणण्याची चढाओढ लागायची.

        आमच्या खेड्यात बाला क्षीरसागर नावाचा आचारी होता. चविष्ट स्वयंपाक करण्यात त्याचा हात कोणीच धरत नसे. पंगत सुरू करणारा पहिला श्लोक तोच म्हणायचा.
   ‘ जेवा हो जेवा वरणभात पोळी..
     वांग्याची भाजी तोंडाले लावा..
     कढीचा भुरका मजेत घ्यावा..
     सैंपाक करणा-याले आशीर्वाद द्यावा..
         पुंडलीक वरदा हारी विठ्ठल……..
पंगत जेवण सुरु करायची. की लगेच..गोविंदराव म्हणा श्लोक..
आवाज यायचा. दामोदरपंत होऊ द्या श्लोक… आणि मग श्लोक म्हणण्याची अहमहमिका सुरू होई..

        एकदा एका पंगतीत एका व्यक्तीने एक श्लोक म्हटला. आणि त्याचा अर्थ सांगण्याचे आव्हान दिले. काही दिवसांनी पुन्हा भोजनयोग येताच त्यांनी तोच श्लोक म्हटला. यावेळी मी त्यांना अर्थ सांगून माझी पाठ थोपटून घेतली.

     तर मंडळी….सादर आहे तोच श्लोक !

   “ कोणी एक वनी विचित्र पुतळा जेवावया बैसला ।
    पात्री भोजन जेविता अति त्वरे पात्रेचि त्या भक्षिला ।
    त्याची ती वनिता वनात फिरता सूर्यास प्रार्थी सदा ।
    बोले विठ्ठल हा पदार्थ उमगा...षण्मासीचा वायदा || “

      श्लोक रचयिता विठ्ठल पंतांनी षण्मासीचा म्हणजे सहा महिन्याचा वायदा केला तेव्हाची गोष्ट निराळी होती. काबाडकष्ट करणा-यांना वेळ काढणे जिकिरीचे असायचे. आपली गोष्ट तशी नाही. आपण तर अधूनमधून फेसबुकवर पडीकच असतो. आणि त्या पिढीपेक्षा आपण सवाईने हुशारही आहोत.

       तर बघू या...कोण याचा नेमका अर्थ सांगतो ते…

         ..                              ★  सुरेश इंगोले  ★

(अर्थ ः- श्लोकात रूपक दडलेले आहे.
              भुंगा फुलामध्ये मध घ्यायला बसतो. तेव्हा अंधार पडताच फुलाच्या पाकळ्या मिटून तो तेथे अडकतो. त्याची पत्नी सूर्याची प्रार्थना करते की तू उगवशील तेव्हा पाकळ्या उमलून भुंग्याची सुटका होईल.
शेवटच्या ओळीत श्लोक रचयिता विठ्ठल कवी हे कोडे उलगडायला सहा महिन्यांची मुदत देतात.)

Monday 25 June 2018

    #प्रौढत्वी_निज_शैशवास_जपणे…

             परिवर्तन हा जगाचा नियम आहे. वय वाढतं तसा शारीरिक बदल होऊ लागतो. बाल्यावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था असा प्रवास करीत आपण यौवनात पदार्पण करतो. मुसमुसते तारुण्य सर्वांनाच हवेहवेसे वाटते. पौगंडावस्थेपासून तो प्रगल्भावस्थेपर्यंत हा प्रवास म्हणजे जीवनातला संस्मरणीय कालखंड असतो. आपण जगलेले तारुण्य आपलेच असते. त्याची दुस-याच्या तारुण्याशी तुलनाच होऊ शकत नाही.

          पण माणूस चिरंतन तरुण राहू शकतो काय? प्रत्येकाचे उत्तर नाही असेच असेल. कसे शक्य आहे? वय वाढतं तशा जबाबदा-या वाढतात. लग्न, अपत्यप्राप्ती, नोकरी-व्यवसाय, मुलांची शिक्षणं, त्यांचे लग्न, आईवडिलांचे आजारपण, आपल्या तब्येतीच्या कुरबुरी…..एक ना अनेक जबाबदा-या पेलता पेलता माणूस ओझ्याने, काळजीने वाकतो...खंगतो. नाना प्रकारच्या चिंतांनी पोखरला जातो. अकाली वृद्धत्व येतं. केस पांढरे होतात, टक्कल पडू लागतं. त्वचा काळवंडते, सैल पडू लागते. सुरकुत्यांनी चेहरा झाकोळला जातो.

           होतं ना असं…? ..असंच होतं !

कारण आपण मनाने खंगलो असतो. हे सगळे बदल मनाने स्वीकारले असतात. शारीरिक बदलांमध्ये मानसिक अवस्थेचा फार मोठा सहभाग असतो. छोट्यामोठ्या संकटांनी मन खचून जाते. परत उभारी घेणे सर्वांनाच शक्य नसते. मनाच्या विषण्णतेचा शरीरावर परिणाम होतो. याचा प्रत्यय तेव्हा येऊ शकतो जेव्हा एखादी व्यक्ती मोठ्या गंभीर आजारातून उपचाराला प्रतिसाद देत लवकर ठणठणीत होते तर एखादी व्यक्ती छोट्याशा आाजारातूनही लवकर बरी होत नाही.

             नकारात्मकता जर प्रयत्नपूर्वक काढून टाकली आणि सकारात्मकता धारण केली तर हे सहज शक्य होते. अर्थात यासाठी नेटाने अथक प्रयत्न करावे लागतात.

            लहान मुलांत रमणे, साठी उलटल्यावरही तरुणांशी संवाद साधणे, त्यांच्या संगतीत त्यांच्या विचारांशी तादात्म्य पावून त्यांच्या सहवासात वेळ घालवणे या कृतींनी त्यांची तरुण सळसळती ऊर्जा आपल्याला मिळत असते. मनाने आपण तरुण होत जातो. शरीर जरी थकले असले तरी मन तरुण असते. मंद हालचालीमध्ये हळूहळू तरतरी येऊ लागते. भरपूर पाणी पिणे, माफक व्यायाम व शारीरिक हालचाली करणे, योगा करणे या गोष्टी सकारात्मकता वाढवतात. अभी तो दिल जवान है...असे वाटणे म्हणजे लढाई जिंकलीच समजा….

       ****
              परवा दुपारी अर्जंट खरेदीसाठी आम्ही शहरातील दुकानात गेलो. सौ आतमधे साड्या पाहत होती व मी काउंटरजवळ मालकाशी गप्पा मारत होतो. मागून आवाज आला,’ दादा, थोडं सरकता का?’ मी लक्ष दिलं नाही. परत आवाज आला,’ अहो भाऊ, थोडं बाजूला व्हा ना..’मी मागे वळून पाहिले. विशीतली एक मुलगी मलाच संंबोधत होती.  मला नेहमी काका ऐकायची सवय होती. भाऊ किंवा दादा म्हणजे जरा अतीच नव्हे का ! मी लगेच दुकानातल्या आरशात पाहिले. डोक्यावर पीकॅप असल्यामुळे टक्कल झाकलेले होते.. दुकानमालकाने हळूच चिमटा काढला…”अभी भी जवान लगते हो सर !”

★★★ सुरेश इंगोले

Thursday 21 June 2018

        ★ भूकंप ★


      मुंबईला नोकरी करीत असताना मी दादरला राहत असे. रोज 9.35 च्या लोकलने व्हीटीला जात असे. माझा रुम पार्टनर होता सुधाकर मुदलियार. माझ्या दुप्पट वयाचा. मी विशीचा तर तो चाळिशीचा. फार प्रेमळ होता. माझ्यावर त्याचा फार जीव. वय वाढले पण राहायची सोय नसल्यामुळे बिचारा लग्न करू शकत नव्हता. गर्लफ्रेंडसोबत त्याला दादरच्या चौपाटीवर मी बरेचदा पाहिले होते. पण मी मुद्दाम त्यांच्या समोर जात नव्हतो. एकदा मी दिसल्यावर त्याने हाक मारून बोलावले व तिची ओळख करून दिली होती. त्याला साजेशीच होती ती. काळी सावळी पण रेखीव. ख्रिश्चन होती बहुधा. फ्रेनी होते तिचे नाव. दोघेही घराच्या विवंचनेत असायचे.

         तो बहुधा रोजच आंटीच्या गुत्त्यावर जायचा. मला याची जाणीव नव्हती.. एकदा रात्रीचे दहा वाजून गेले तरी तो आला नाही. मी काळजीने चौकशी केली तेव्हा शेजारचा चंदू मला गुत्त्यावर घेऊन गेला. मला पाहून सुधाकर भडकला. मला कशाला आणले म्हणून चंदूला रागावला. तुझ्याच काळजीने तो बेजार झाला असे चंदूने सांगताच त्याने मला तेथेच मिठी मारली. आपली काळजी करणारे कुणीतरी आहे या भावनेने तो बराच बदलला.

        एकदा माटुंगा - दादर दरम्यान दोन लोकलची टक्कर झाली. हाहाकार माजला. मी त्याच लोकलने व्हीटीला.जायचो. रेल्वे रुळांवरून चालत जात आम्ही काही सहप्रवासी अपघातस्थळी पोचलो. तेथील द्रुष्य भयानक होते. प्रेतांचा खच पडला होता. पोलीस, बाजूच्या झोपडपट्टीतले लोक प्रेताच्या खिशातला ऐवज, घड्याळ, दागिने काढून प्रेताला ढिगावर फेकून देत. पाहूनच अंगावर काटा आला. मी ऑफिसला गेलोच नाही. कर्णोपकर्णी बातमी पसरताच सुधाकर काळजीत पडला. मी त्याच लोकलने जायचो हे त्याला माहीत होते. त्याने माझ्या ऑफिसला फोन लावला. मी ऑफिसला आलोच नाही व काही निरोपही नाही हे कळताच तो कामावरुन तडक दादरला रुमवर आला. दार वाजले तसा मी उठलो व दार उघडले. मी समोर दिसताच त्याने एक माझ्या कानाखाली लावली व शिव्या देऊ लागला. मी गालावर हात ठेवून ऐकत राहिलो. अपघात पाहून मला जबरदस्त धक्का बसला होता. घरापासून, आईवडील भावंडापासून शेकडो मैल दूर आपली चौकशी करणारे कोण आहे या विचाराने मन विषण्ण झाले होते. सुधाकरच्या मायेपोटी मारलेल्या फटक्याने मी भारावलो व त्याला मिठी मारून रडू लागलो.

        ऑफिसमधील माझे जिवलग मित्र अर्थात विदर्भातले… डोंबिवलीला रेल्वे क्वार्टरमध्ये एक खोली किरायाने घेऊन राहू लागले. दत्तूने वहिनींना व मुलीला आणले. अल्पावधीतच अंजूने मला खूप लळा लावला. वहिनींच्या हातचे घरगुती जेवण मला खुणावू लागले. मग माझा मुक्काम दादरला कमी व डोंबिवलीला जास्त होऊ लागला. गजूने त्याच्या बायकोला माहेरी पाठवल्यामुळे मी त्याच्या रुमवर राहू शकत होतो. त्यामुळे मी आता डोंबिवलीत जास्त रमू लागलो.

        दादरच्या रुमवर एक लोखंडी पलंग होता. तो रुममालकाचा होता व रुममालक माझा गाववाला असल्यामुळे त्याने तो मला वापरायला दिला होता. सुधाकर त्याची पथारी खाली टाकत असे. पण ज्या दिवशी मी डोंबिवलीला मुक्कामाने जायचो त्या दिवशी सुधाकर पलंगावर झोपायचा. डोंबिवलीला जाताना त्याला सांगून जायचे हा अलिखित नियम बनला होता.
          
      डिसेंबर 1967 ची घटना. ऑफिस सुटताच मी, गजू व दत्तू व्हीटीला निघालो. धावतपळत एका डब्यात निवांत जागा पकडली. गाडीने भायखळा सोडले व एकाएकी दत्तूने मला सांगितले की आज वहिनीनी श्रीखंड केले आहे. गोड पदार्थ हा माझा वीक पॉईंट..दोघेही आग्रह करू लागले.
“ अरे, पण मी सुधाकरला कळवले नाही ना..” मी अयशस्वी प्रयत्न केला. पण शेवटी श्रीखंडाचा विजय झालाच..रात्री मस्त जेवण झाले. अंजूला थोपटून झोपवून दिल्यावर मी गजूच्या रुमवर झोपायला आलो.

       रात्री दोनच्या सुमारास गाढ झोपेत असताना एकाएकी फळीवरली भांडी धडाधड आमच्या अंगावर पडली. मी दचकून.. घाबरून उठून बसलो. वीज गेली होती. बाहेर गलका ऐकू येत होता. मी गजूला गदगदा हालविले. पण तो ढिम्म हलायला तयार नव्हता. तसेही त्याला लाथ घातल्याशिवाय तो उठतच नसे..शेवटी लाथ मारून उठवले व दोघेही बाहेर आलो. रेल्वे कॉलनीतले सगळेजण घाबरुन मोकळ्या जागी गोळा झाले होते. भूकंपाचा जोरदार धक्का बसल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्याच क्षणी पुन्हा एक जबर धक्का बसला व आम्ही जागीच हेलपाटलो. पहाट होईपर्यंत आम्ही बाहेरच होतो.  

       दुस-या दिवशी सगळीकडे भूकंपाच्याच बातम्या. कोयनानगरला तीव्र स्वरूपाचा भूकंप झाला होता. त्याचे क्षेत्र मुंबईपर्यंत पसरले होते. ऑफिसमध्ये असताना दुपारी साडेबाराच्या सुमारास पुन्हा एक सौम्य धक्का जाणवला होता.

       पाचच्या सुमारास मी दादरला रुमवर आलो. जिना चढत असतानाच जाणवले की प्रत्येक जण माझ्याकडे विस्मयचकित नजरेने बघतो आहे. शेजारी राहणारे भाटकर मला म्हणाले देखिल…”सुरेशभाई, शंभर वर्षांचे आयुष्य आहे तुम्हाला.” काय झाले मला काही कळेना..माझ्या रुममध्ये बघ्यांची गर्दी जमली होती. माझ्या छातीत धस्स झाले. काही विपरीत तर घडले नाही ना...मला पाहताच गर्दीने मला जागा करून दिली. सुधाकरचे माझ्याकडे लक्ष जाताच मला विळखा घालून तो आवळू लागला. जणू मी त्याला सोडून जाणार होतो. प्रत्येक जण पलंगावर पाहत होता. माझे तिकडे लक्ष गेले आणि मी मटकन खालीच बसलो.

        पलंगावर उशीच्या मधोमध छताचा मोठ्ठा तुकडा...दहा पंधरा किलो वजनाचा.. पडला होता. पलंगाचा तेवढा भाग पोचा पडून  दबला होता. जो कोणी तेथे झोपला असता त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला असता.

          अचानक डोंबिवलीला गेल्यामुळे मी बचावलो होतो. ...आणि सुधाकरला मी न कळवल्यामुळे तो पलंगावर झोपला नाही म्हणून तोही बचावला होता…

       अखेर देव तारी त्याला.।।।।।।।।


                               ★ .सुरेश इंगोले ★