Saturday 10 March 2018

** आक्रित **

       आकाशात मळभ दाटून आले होते. पावसाचे दिवस नव्हते. मार्च महिन्यात थंडी कमी होत जाऊन उन्हाची तीव्रता वाढायला सुरुवात होते. विदर्भाचा उन्हाळा तसाही रखरखीतच. पण चैत्राची चाहूल मन उल्हसित करते. झाडांना नवीन पालवी फुटू लागते.

           पण कां कोण जाणे...या दोन तीन दिवसात वातावरण बदलले होते. कसे उदास वाटत होते.

             टाकीतले पाणी संपल्याची वर्दी आली. मी विहिरीवरचा मोटरपंप सुरू केला. आठ दहा मिनिटात टाकी भरते. पण पाचच मिनिटात विहिरीतून आवाज येऊ लागला. मी तडक जाऊन पाहिले. विहीर कोरडी पडू लागली होती. पंप उघडा पडला होता. पटकन पंप बंद केला. पोर्चमध्ये बसून विचार करू लागलो.

               या वर्षी मार्चमध्येच विहीर कोरडी होऊ लागली होती. पाण्याची पातळी खूप खोल गेल्याचे जाणवत होते. पूर्व विदर्भात ब-याच गावांमध्ये पाणी विकत घेतले जात असल्याच्या बातम्या कानावर येत होत्या. दक्षिण आफ्रिकेत पाण्याअभावी कित्येक गावे ओस पडू लागल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. ग्लोबल वार्मिंगचा विळखा आवळू लागल्याचीे जाणीव कासावीस करीत होती.

                रात्री जेवण झाल्यावर झोपण्यापुर्वी बातम्या पाहत होतो. ठिकठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य दाखवणा-या बातम्या पाहून मन विटून गेले. टीव्ही बंद करून झोपी गेलो.

                कसल्याशा कोलाहलाने जाग आली. काय झाले असावे हा विचार करीतच दार उघडले. पाहतो तर जागोजागी लोक घोळक्याने चर्चा करीत असलेले. चिंताक्रांत चेहरे पाहून मला कळेना काय झाले असे एकाएकी…..

                 पायात चपला घालून मी बाहेर आलो. मला पाहून एकजण पुढे आला.
-- काय झाले?...मी विचारले.
-- अहो सर, गावातल्या सर्व विहिरी रात्रीतून आटल्या.
-- काय? असे कसे शक्य आहे?
-- हो..सकाळपासून पाण्यासाठी धावाधाव सुरु आहे. कुठेच पाण्याचा थेंबही  मिळाला नाही. तुमची विहीर बघा विश्वास नसेल तर…

             मी लगबगीने विहिरीजवळ येऊन वाकून पाहिले. रात्रीतून चार पाच फूट पाणी आले असेल याची खात्री होती. पण हे काय? विहीर कोरडी ठक्क
होती. म्हणजे बातमी खरी होती तर….

            मला गरगरल्यासारखे झाले. हे देवा ! हे काय आक्रित घडते आहे...पाण्याअभावी तडफडून मारणार आहेस का सर्वांना….पाणी हेच जीवन मानतो आपण. हे जीवनच संपणार आता. पत्नी माझ्याजवळ येऊन बसली होती. तिला सर्व घटना कळल्या होत्या. कोणी कोणाला धीर द्यायचा हेच कळत नव्हते.

               टाकीत असलेले पाणी अत्यंत जपून वापरू या एवढाच निष्कर्ष तूर्तास निघाला होता. कसेबसे प्रातर्विधी व आन्हिके उरकून मी मोठ्या मुलास फोन लावला. येथले वर्तमान त्याला कसे कळवावे हा विचार करीत असतानाच तो घाब-या आवाजात बोलला,
“ अहो बाबा, आता तुम्हालाच फोन करणार होतो. एक भयंकर आक्रित घडलं आहे. रात्रीतून एकाएकी संपूर्ण शहरातील पाणी आटले आहे. पाण्यासाठी धावाधाव सुरु आहे. मी सकाळी वीस लिटरची कॅन आणली होती. बातमी कळल्यावर पुन्हा एखादी आणून ठेवावी म्हणून गेलो तर तो अडीचशे रुपये म्हणाला. “
“ मी त्यासाठीच फोन केला होता. येथेही तशीच परिस्थिती आहे. गावोगावी पाण्यासाठी धुमाकूळ सुरू आहे. आता भय्याला फोन करतो. तेथेही हंगामाच सुरू आसेल.”

         बराच वेळ आम्ही निष्फळ चर्चा करीत बसलो. थोड्या वेळाने मी मधल्या मुलाला फोन केला. बराच वेळ झाला तरी कोणी फोन उचलेना.
गाडी काढून त्याच्याकडे जायचा विचार करणार तोच लोकांनी रस्ते वाहतुक बंद पाडल्याच्या  बातम्या येऊ लागल्या. टीव्ही लावायची भीती वाटू लागली.

         सगळीकडे हाहाकार माजला होता. पाणी जनजीवनातून गायब झाले होते. पाण्यासाठी लोक काहीही करायला तयार झाले होते.

           अचानक फोन वाजला. भय्याचाच फोन होता. मी चटकन फोन कानाला लावला.
“ बाबा,” एवढेच बोलून तो गप्प झाला. रडवेला स्वर आणि भावना आवरण्याचा असफल प्रयत्न स्पष्ट जाणवत होता. मी त्याला इथल्या घटना सांगितल्या. तो बोलू लागला आणि तेथील विदारक परिस्थिती काळजाला घरे पाडू लागली. त्याच्या घरातील पाणी संपले होते व त्याची मुले पाण्यासाठी आकांत करीत होती. बाहेर पाणी मिळवण्याचा त्याने प्रयत्न केला. मोठ्या कसोशीने त्याला दीडशे रुपये देऊन एक बिसलेरीची बाटली मिळाली होती. घरी येताच दोन्ही मुलांनी तीवर झडप घातली व झटापटीत बाटली खाली पडून सांडली होती. मग धपाटे, ओरडणे या धांदलीत मोठ्या मुलाने उरलेली बाटली तोंडाला लावली होती. आता धाकट्याचा पाण्यासाठी आक्रोश सुरु होता. फोनमधून त्याचा तो आकांत ऐकवेना. पाणी घेऊन येतो असे सांगून मी फोन बंद केला. पत्नीने लगेच दोन-तीन बाटल्या मोठ्या पर्समध्ये टाकल्या. घराला कुलूप लावून मी स्कूटी बाहेर काढली.

          बाहेर रस्त्यावर सगळीकडे गर्दी, गोंधळ व झटापटी सुरु होत्या. गाडी चालवणे दुरापास्त झाले होते. कशीबशी वाट काढत होतो तेवढ्यात एका घोळक्याने गाडी अडविली. पाणी...पाणी...असे ते ओरडत होते. अनवधानाने पत्नीने पर्स पोटाशी घट्ट धरली. आणि घात झाला. एकाने झटक्यात पर्स ओढली. बाकीचे त्यावर तुटून पडले. तीनही पाण्याच्या बाटल्या त्यांच्या हाती लागल्या. आणि ओढाताणीत तीनही बाटल्या खाली पडून पाणी वाहू लागले. ते वाहणारे पाणी कोणी ओंजळीने प्यायचा प्रयत्न करू लागले. कोणी रस्त्यावरचे पाणी चाटू लागले.

       इकडे पत्नीने शेरू म्हणून टाहो फोडला आणि पाण्यासाठी हातपाय घासत ओक्साबोक्सी रडणारा शेरू डोळ्यासमोर येताच माझी शुद्ध हरपली……

        …...मी खडबडून उठून बसलो. शरीर थरथर कापत होते. मी माझ्याच बेडवर होतो. म्हणजे हे सारे स्वप्न होते तर….माय गॉड..!..मला सावरायला बराच वेळ लागला. पाण्याची धार पडत असल्याचा आवाज कानी आला व मी झटकन बाहेर आलो.

              सौ बेसिनजवळ ब्रश करीत होती व नळ सुरू होता. मी पुढे होऊन नळ बंद केला.
-- काय हो...काय झाले?
--- भांड्यात पाणी घेऊन दात घास . नळ सुरु ठेवू नकोस.
         ती फ्रेश होऊन येताच मी तिला माझे स्वप्न सविस्तर सांगितले. पाण्यासाठी तडफडणा-या शेरूचा भाग ऐकून ती शहारली.
“ यापुढे पाणी जपून वापरू या.,” ती खोल गेलेल्या आवाजात म्हणाली.

           एकाएकी बाहेर गलबला ऐकू येऊ लागला.
कसला गोंधळ आहे हे पाहण्यासाठी मी दार उघडले. लोक घोळक्या घोळक्याने चर्चा करीत होते. मला दाट शंका येऊ लागली. तेवढ्यात शेजारी लगबगीने विहिरीजवळ येऊन वाकून पाहू लागले. त्यांचा भकास चेहरा पाहून मी विचारले,” काय हो?”
“ दादा, टीव्हीवरच्या बातम्या पाहून मी घाबरून गेलो होतो. येऊन पाहिले तर विहीर साफ कोरडी. अहो, सा-या देशातले पाणी गडप झाले आहे. टीव्ही लावा…”
  पुढचे मला काहीच ऐकू आले नाही.

       …….         
                                      सुरेश इंगोले.
( It may happen one day. Be alert…! )

Saturday 3 March 2018

दिल...
तुम्हारे रूखेपन से
आहत होकर
आँखों से
बहने लगता है...
मायूस होकर
हमसे
कहने लगता है...
" तुमसे अपना प्यार
  कहा नही जाता....
   हम से ये दर्द
   सहा नही जाता.....।"

                           सुरेश इंगोले