Saturday 2 July 2016

** तुही  जात  कंची ? **

     जन्मत:च जी आपल्याला चिकटते आणि जी जन्मभर जात नाही ती ' जात.'
   
     अगदी शाळेत दाखल झाल्यापासून तो नोकरीतून निवृत्त होईपर्यंत ती आपला पिच्छा सोडत नाही.

    जातीवर निवडणुका लढल्या - लढवल्या जातात. जातीसाठी आरक्षण....जातीसाठी ऑनर किलिंग.....जातीमुळे स्पृश्य-अस्पृश्य, दलित - सवर्ण हे भेदाभेद. त्यातही भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात सतराशे साठ जाती.

    कशा निर्माण झाल्या या जाती ?  त्यांत उच्च - नीच हे भेद कां पडले ? त्याचे एवढे अवडंबर कां माजविले जाते ...आणि ते ही विवाह संबंधात..?

       ..... वास्तविक वेदकाळात चातुर्वर्ण निर्माण झाले सामाजिक गरज म्हणून.. जसजशा गरजा निर्माण झाल्या तसतशा त्या पूर्ण करणारे कोणी ना कोणी पुढे येऊ लागले. ज्याला ज्या कामात रस होता, गती होती तो ते काम कौशल्याने करु लागला.  वस्तुविनिमयाच्या काळात आपण बनविलेल्या वस्तु इतरांना देऊन त्यांच्याकडील गरजेच्या वस्तु प्राप्त करणे हे जगण्याचे साधन होऊ लागले.
             अशावेळी ज्या एका बुद्धीमान व्यक्तीने पुढाकार घेतला त्याने प्रत्येकाचे कौशल्य जाणून कामांची विभागणी केली. गरजेच्या वस्तु तयार होऊ लागल्या. त्या त्या वस्तूंच्या नावावरुन त्या तयार करणा-याला संबोधन दिले जाऊ लागले.
       मडकी बनविणारा कुंभकार...कुंभार, चामड्याच्या वस्तु बनविणा-याला चर्मकार...चांभार, सोन्याचे अलंकार बनविणारा सुवर्णकार...सोनार, कपडे विणणारा विणकर...कोष्टी, लाकडी वस्तु बनविणारा सुतार, बागकाम करणारा बागवान...माळी, शेती करणारा कृषिवल...कुणबी.....अठरापगड कामे...अठरापगड नावे.
  हीच नावे नंतर जात म्हणून चिकटली.
   
        ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या चातुर्वर्णामुळे केवळ कामाची विभागणीच केली गेली होती. विशेष म्हणजे कोणतेही काम क्षुद्र किंवा उच्च प्रतीचे नव्हते. ब्राम्हणांनी पौरोहित्य करावे, क्षत्रियांनी समाजरक्षणाचे कार्य करावे, वैश्यांनी प्रत्येकाच्या गरजा भागवाव्या तर शूद्रांनी समाजाच्या  आरोग्याचे रक्षण करावे. घाण उचलणे, मेलेले ढोर उचलणे किंवा जी कामे करताना किळस येईल ती कामे जर इतर कोणी करीत असेल तर त्याचे सामाजिक आरोग्य रक्षणाचे कार्य उलट महान होय.

         पण नंतर याच जाती बनल्या. त्यातून स्पृश्य - अस्पृश्य भेद निर्माण झाले.

        आज परिस्थिती काय आहे ? आपल्याला चिकटलेल्या या जाती आपण पाळतो तर आपण खरोखर तीच कामे करतो काय ?
           कामावरून जाती निर्माण होत असतील तर या कालबाह्य जातींचा त्याग करुन नवीन जाती निर्माण कां होऊ नये ?

     ...... दहा वर्षापुर्वी माझ्या ज्येष्ठ चिरंजिवाचे लग्न झाले. ईटीव्ही हैद्राबादला तो वृत्तनिवेदक म्हणून कार्यरत होता. तेथीलच एक निवेदिका आम्हाला आवडली. मुलाला विचारून तिच्या पालकांशी संवाद साधला. आम्ही सर्व हैद्राबादला जमलो. मने जुळली....संबंध जुळला. आणि त्याच बैठकीत लग्न जमले. हैद्राबादला एंगेजमेंट, कोल्हापूरला रजिस्टर्ड लग्न व शहापूरला रिसेप्शन असा कार्यक्रम ठरला.
             
             एवढे सगळे ठरल्यावर व्याही श्री वैद्य म्हणाले, ' अहो ! पण तुम्ही आम्हाला आमची जात विचारलीच नाही.."
            मी हसून म्हणालो, " मला माहीत आहे, तुमची जात अभियंता....इंजीनियर तर माझी जात प्राध्यापक...त्याहीपेक्षा आपल्या मुलांची जात जुळली ना...! दोघेही पत्रकार आहेत.. इतर काही जाणून घ्यायची माझी इच्छा नाही.'
           
       आणि विवाह पार पडला........

         आज आपण जे काम कुटुंब पोसण्याकरिता करतो तिलाच जात मानली तर बिघडले कुठे ! नवीन जाती निर्माण होतील.
             अधिका-यापासून कारकुनापर्यंत.... मालकापासून कामगारापर्यंत....शेतक-यापासून मजुरापर्यंत....उद्योगधंद्यातील प्रत्येक घटकापर्यंत.... अनेक जाती निर्माण होतील.

            पण हा भेदाभेद तरी संपेल. तो संपणे ही काळाची गरज आहे.

        समाजात तेव्हाच ' अच्छे दिन ' येतील. !!

                                  **** सुरेश इंगोले *****