Friday 9 October 2020

     # होस्टेल लाईफ. # (२)



    १९६२-६३ मध्ये माझे मोठे काका- काकू सहा महिन्याच्या अंतराने वारले. आमची तीन चुलत भावंडं आमच्या घरी आली. खाणारी तोंडं वाढली. वडिलांचा पगार पुरेना. 


     मी होस्टेलमध्ये राहत असताना वडिल दरमहा ऐंशी रुपये पाठवायचे. पंचेचाळीस रुपये मेसला लागत. वीस रुपये कॉलेजची फी होती. पंधरा रुपये खूप काटकसरीने वापरावे लागायचे. मी अवांतर कोणतेच खर्च करणे टाळायचो…


     हिरामन उईके आमच्या शेजारच्या रुममध्ये राहायचा. खेड्यातून आलेला हिरामन खूप साधा, सालस व स्वभावाने गरीब होता. तोही खूप काटकसरीने वागायचा. कधी त्याचे वडील भेटायला यायचे तेव्हा पपया, संत्री घेऊन यायचे. तो आम्हाला खायला बोलवायचा. आम्ही त्याला बागायतदाराचा मुलगा समजून त्याच्याशी अदबीने वागायचो. 


      एकदा असेच फळे खात असताना मी त्याला विचारले, " तुझ्या बागेत संत्रा पपयांची किती झाडे आहेत रे?"


   तो बराच वेळ गप्प बसला. मग शांतपणे म्हणाला," आमच्याकडे शेती नाही. माझे वडील पोतदाराच्या बागेत सालकरी आहेत. ते भेटायला येताना वानवळा आणतात."


   हिरामनच्या घरची परिस्थिती लक्षात येऊ लागली होती. आपल्या गरीबीचा फाटका पदर तो कोणालाच दिसू देत नव्हता. आणि स्वाभिमानाने जगत होता...जगणे शिकवत होता.


माझे नि हिरामनचे ट्युनिंग छान जुळले होते. 

आर्वीहून आमचे फराळाचे डबे आले की मी हिरामनला फराळ नेऊन द्यायचो. मला आवडतं म्हणून अंबाडीची भाकरी व मिरचीचा ठेचा तो माझ्यासाठी मुद्दाम राखून ठेवायचा. 


     परीक्षेचे दिवस जवळ आले. फी भरायची तारीख जाहीर झाली. हिरामन जरा अस्वस्थ दिसू लागला. दोन दिवसांनी त्याची तगमग पाहून मीच विचारलं, " काय रे! पैशाची अडचण आहे का? जरा अस्वस्थ दिसतोस म्हणून विचारलं…"

" हो! घरून पैसे आले नाहीत. शेवटची तारीख जवळ येत आहे.."

" अरे, काळजी करू नकोस. आम्ही गोळा करतो. सोय झाल्यावर परत करता येईल."

" नाही…" तो ठामपणे म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावरचा करारीपणा पाहून मी पुढे बोलू शकलो नाही.


    आम्ही बराच वेळ चिंतित होऊन वेगवेगळ्या पर्यायावर चर्चा करीत राहिलो. बोलता बोलता हातातल्या घड्याळाशी खेळत तो म्हणाला," हे घड्याळ विकायला गेलो होतो काल... चाळीस रुपये सुद्धा द्यायला कोणी तयार झाला नाही."


    मी त्या घड्याळाकडे एकटक बघत राहिलो. एच एम टी चे घड्याळ होते. देखणे डायल होते. मी बराच वेळ विचार करीत होतो.‌ अचानक कुठल्यातरी पुस्तकात वाचलेला एक किस्सा आठवला. माझे डोळे चमकले. मी हिरामनला घड्याळ मागितले. त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणालो, " तुझ्या अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळतील."


     दुसऱ्या दिवशी रविवार होता. सकाळी नऊच्या सुमारास नाश्त्याच्या वेळी मेससमोर सगळे गोळा झाले होते. मी कारंजाजवळ उभा राहून ती घड्याळ हात उंचावून दाखवत जोरात बोललो, " फक्त एक रुपयात घड्याळ….कोणाला हवी आहे?"

सगळे चमकले. 

" क्या बक रहा बे….!" कोणीतरी रागाने विचारले.

" ज्याला घड्याळ घ्यायची आहे त्याने स्वत:च्या नावाची चिठ्ठी व एक रुपया या डब्यात टाकावा. साडेदहा वाजता त्यातून एक चिठ्ठी बाहेर काढली जाईल. ज्याचे नाव असेल त्याला ती घड्याळ मिळेल."

थोड्याच वेळात ही बातमी होस्टेलभर पसरली. नशिबाने मिळाली तर एक रुपयात घड्याळ अन्यथा एक रुपयाचे नुकसान म्हणजे नगण्यच!

हळूहळू डबा चिठ्ठी व नाणे-नोटांनी भरू लागला. गोष्ट वॉर्डनच्या कानावर गेली. ते स्वत: बघायला आले. 

" मिस्टर इंगोले, हे बेकायदेशीर आहे असे तुम्हाला वाटत नाही?" त्यांनी मला विचारले. मी याचा विचारच केला नव्हता. मी त्यांना हिरामनची अडचण, त्याचा स्वाभिमान याबद्दल सांगितले. त्यांचे समाधान झालेले दिसले.

साडेदहा वाजता त्यांच्याच हाताने ड्राॅ काढला जाईल असे मी जाहीर करून टाकले. 


    कोणातरी एकाला ती घड्याळ मिळाली. स्वत: वॉर्डननी रक्कम मोजून आलेले एकशे बारा रुपये हिरामनच्या स्वाधीन केले.


हिरामनने मारलेली मिठी तो सोडायला तयार नव्हता. आणि मलाही ती सोडवावीशी वाटत नव्हती…..


                © सुरेश इंगोले.

Thursday 8 October 2020

जीवनात बरेच प्रसंग येतात. बरे-वाईट सगळेच प्रसंग काही ना काही शिकवून मात्र जातात. सचोटीने जगण्याचे संस्कार बालपणापासूनच मिळाले. पण अन्याय, खोटेपणा, लबाडी या गोष्टींविरुद्व लढण्याचे बाळकडू सुद्धा मिळाले होते. आता या वयात गतायुष्याचे सिंहावलोकन करताना खूप घटना आठवतात. कधी मन विषण्ण होतं...कधी सुखावतं…कधी हसू येतं… वाटलं...या गोष्टी तुमच्याशी शेअर केल्या तर...तेवढाच विरंगुळा ! **** ***** ***** # होस्टेल_ लाईफ.. नागपूरला होस्टेलमध्ये राहत असताना माझे सहकारी सगळेच वयाने मोठे होते. कारण मी पंधराव्या वर्षीच हायर मॅट्रीक झालो होतो. माझ्यापुढे सगळेच थोराड दिसत. मला रॅगिंग करण्याचा प्रयत्न मी प्रत्येक वेळी हाणून पाडला होता. आम्ही आर्वीहून आठजण तेथे शिकायला आलो होतो. आमच्या ग्रुपमध्ये दांडगे मुलं होते. मी त्यांच्यामध्ये बारका असूनही कदाचित अभ्यासू व पुस्तकी किडा म्हणून माझा वरचष्मा होता. कुणाला नमवायचे, कुणाची खोड जिरवायची, कुणावर कुरघोडी करायची याचे नियोजन माझ्याकडे असायचे… बिंझाणी होस्टेलमध्ये एसबीसिटी कॉलेज व मोहता सायन्स कॉलेज चे विद्यार्थी होते. फायनलच्या एका सीनिअर विद्यार्थ्याशी आमच्यातील एकाचा उगाच वाद झाला. 'अपनी औकात में रहना' अशी धमकी देऊन तो गेला. त्याला औकात दाखवायची जबाबदारी माझ्यावर आली. रहस्यकथा, बाबुराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक हे माझे तत्कालीन गुरू… दोन दिवस अभ्यासपूर्वक फूलप्रूफ प्लान तयार झाला. रिहर्सल न करता टायमिंगची अचूक प्रॅक्टिस केली गेली. आणि…. प्लान अमलात आणण्याची वेळ आली. आमच्या होस्टेलची मेस मिश्रा चालवीत होते. त्यांचे आचारी, वाढपे सगळे बिहारी होते. हॉलमध्ये भिंतीलगत डेस्क बेंच वर आम्ही बसायचो. वाढपी मध्ये फिरत वाढत असायचे. त्यातला भाजी वाढणारा खूप त्रास द्यायचा. म्हणजे एका टोकापासून भाजी वाढायला सुरुवात केली की ती अर्ध्यातच संपायची. तो पुन्हा आतून भाजी घेऊन आला की परत त्याच टोकापासून सुरुवात करायचा. आम्ही दुसऱ्या टोकाला असल्यामुळे आमच्यापर्यंत तो येतच नसे. त्यांची मिश्राकडे कितीदा तक्रार केली पण काही फायदा होत नव्हता.जेवताना ताटात भाजी पडायला उशीर झाला तर काय अवस्था होते याचा अनुभव सर्वांनीच घेतला असेलच…. आज रात्री एका दगडात किती पक्षी मरतात ते पाहायचे होते. तो सीनिअर विद्यार्थी जेवायला येताच आम्ही काही जण त्याच वेळी जेवायला बसलो. आपापल्या जागा ठरताच आम्ही नेत्रपल्लवीने योजनेचे स्वरूप ठरवून घेतले. योजना अशी होती की भाजी वाढणारा दुसऱ्या फेरीत येताच दारात उभ्या मुलाला इशारा केला जाईल. तो खोलीतल्या मुलाला संकेत देईल. खोलीतला मुलगा बल्ब काढून त्यात नाणे टाकून बटन दाबताच होस्टेलचा फ्यूज उडेल. त्या क्षणिक अंधारात भाजीची गरम वाटी वाढप्याला फेकून मारली जाईल. क्षणातच शेजारच्या ताटातील वाटी आपल्या ताटात पटापट घेतली जाईल. योजनेप्रमाणे नेत्रपल्लवी झाली. क्षणात अंधार झाला. मी शेजाऱ्याच्या ताटातील बटाट्याच्या गरम भाजीची वाटी त्याला अंधारात फेकून मारली. एक किंकाळी हॉलमध्ये घुमली. थोड्या धावपळीनंतर मेणबत्त्या लावल्या गेल्या.ज्याच्या अंगावर भाजी सांडली तो थयथया नाचत होता. मिश्रा भाजीची वाटी कोणी फेकली म्हणून ओरडत होता. आम्ही जणू काही माहिती नाही असे निवांतपणे जेवत होतो. तेवढ्या वेळात फ्यूज टाकला गेला आणि वीज आली. हॉलमध्ये वॉर्डनसुद्धा आले होते. ' किस की थाली में कटोरी नहीं है?' मिश्राजी ओरडले. आणि त्याचवेळी तो सीनिअर विद्यार्थी भांबावून जोरात बोलला, " माझ्या ताटातील वाटी कोणी घेतली.?" सगळ्यांचे लक्ष त्याच्या ताटाकडे गेले. मी वाटी फेकून मारली नाही असे त्याने सांगण्याचा खूप प्रयत्न केला. पण वॉर्डन व मिश्रा यांच्या तावडीतून तो सुटू शकला नाही. या सगळ्या प्रकरणात आमचा काही सहभाग असेल याची साधी शंकाही कोणाला आली नाही. किंबहुना आम्ही ती येणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. © सुरेश इंगोले

            


         जीवनात बरेच प्रसंग येतात. बरे-वाईट सगळेच प्रसंग काही ना काही शिकवून मात्र जातात. 


      सचोटीने जगण्याचे संस्कार बालपणापासूनच मिळाले. पण अन्याय, खोटेपणा, लबाडी या गोष्टींविरुद्व लढण्याचे बाळकडू सुद्धा मिळाले होते. आता या वयात गतायुष्याचे सिंहावलोकन करताना खूप घटना आठवतात. कधी मन विषण्ण होतं...कधी सुखावतं…कधी हसू येतं…


      वाटलं...या गोष्टी तुमच्याशी शेअर केल्या तर...तेवढाच विरंगुळा !


          ****      *****     *****

    # होस्टेल_ लाईफ..



    नागपूरला होस्टेलमध्ये राहत असताना माझे सहकारी सगळेच वयाने मोठे होते. कारण मी पंधराव्या वर्षीच हायर मॅट्रीक झालो होतो. माझ्यापुढे सगळेच थोराड दिसत. मला रॅगिंग करण्याचा प्रयत्न मी प्रत्येक वेळी हाणून पाडला होता. आम्ही आर्वीहून आठजण तेथे शिकायला आलो होतो. आमच्या ग्रुपमध्ये दांडगे मुलं होते. मी त्यांच्यामध्ये बारका असूनही कदाचित अभ्यासू व पुस्तकी किडा म्हणून माझा वरचष्मा होता. कुणाला नमवायचे, कुणाची खोड जिरवायची, कुणावर कुरघोडी करायची याचे नियोजन माझ्याकडे असायचे…


   बिंझाणी होस्टेलमध्ये एसबीसिटी कॉलेज व मोहता सायन्स कॉलेज चे विद्यार्थी होते. फायनलच्या एका सीनिअर विद्यार्थ्याशी आमच्यातील एकाचा उगाच वाद झाला. 'अपनी औकात में रहना' अशी धमकी देऊन तो गेला. त्याला औकात दाखवायची जबाबदारी माझ्यावर आली.

रहस्यकथा, बाबुराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक हे माझे तत्कालीन गुरू…


    दोन दिवस अभ्यासपूर्वक फूलप्रूफ प्लान तयार झाला. रिहर्सल न करता टायमिंगची अचूक प्रॅक्टिस केली गेली. आणि….


    प्लान अमलात आणण्याची वेळ आली.


आमच्या होस्टेलची मेस मिश्रा चालवीत होते. त्यांचे आचारी, वाढपे सगळे बिहारी होते. हॉलमध्ये भिंतीलगत डेस्क बेंच वर आम्ही बसायचो. वाढपी मध्ये फिरत वाढत असायचे. त्यातला भाजी वाढणारा खूप त्रास द्यायचा. म्हणजे एका टोकापासून भाजी वाढायला सुरुवात केली की ती अर्ध्यातच संपायची. तो पुन्हा आतून भाजी घेऊन आला की परत त्याच टोकापासून सुरुवात करायचा. आम्ही दुसऱ्या टोकाला असल्यामुळे आमच्यापर्यंत तो येतच नसे. त्यांची मिश्राकडे कितीदा तक्रार केली पण काही फायदा होत नव्हता.जेवताना ताटात भाजी पडायला उशीर झाला तर काय अवस्था होते याचा अनुभव सर्वांनीच घेतला असेलच….


   आज रात्री एका दगडात किती पक्षी मरतात ते पाहायचे होते. तो सीनिअर विद्यार्थी जेवायला येताच आम्ही काही जण त्याच वेळी जेवायला बसलो. आपापल्या जागा ठरताच आम्ही नेत्रपल्लवीने योजनेचे स्वरूप ठरवून घेतले. 


     योजना अशी होती की भाजी वाढणारा दुसऱ्या फेरीत येताच दारात उभ्या मुलाला इशारा केला जाईल. तो खोलीतल्या मुलाला संकेत देईल. खोलीतला मुलगा बल्ब काढून त्यात नाणे टाकून बटन दाबताच होस्टेलचा फ्यूज उडेल. त्या क्षणिक अंधारात भाजीची गरम वाटी वाढप्याला फेकून मारली जाईल. क्षणातच शेजारच्या ताटातील वाटी आपल्या ताटात पटापट घेतली जाईल.


 योजनेप्रमाणे नेत्रपल्लवी झाली. क्षणात अंधार झाला. मी शेजाऱ्याच्या ताटातील बटाट्याच्या गरम भाजीची वाटी त्याला अंधारात फेकून मारली. एक किंकाळी हॉलमध्ये घुमली. थोड्या धावपळीनंतर मेणबत्त्या लावल्या गेल्या.ज्याच्या अंगावर भाजी सांडली तो थयथया नाचत होता. मिश्रा भाजीची वाटी कोणी फेकली म्हणून ओरडत होता. आम्ही जणू काही माहिती नाही असे निवांतपणे जेवत होतो. तेवढ्या वेळात फ्यूज टाकला गेला आणि वीज आली. हॉलमध्ये वॉर्डनसुद्धा आले होते. 

' किस की थाली में कटोरी नहीं है?' मिश्राजी ओरडले. 

आणि त्याचवेळी तो सीनिअर विद्यार्थी भांबावून जोरात बोलला, " माझ्या ताटातील वाटी कोणी घेतली.?" 


सगळ्यांचे लक्ष त्याच्या ताटाकडे गेले. मी वाटी फेकून मारली नाही असे त्याने सांगण्याचा खूप प्रयत्न केला. पण वॉर्डन व मिश्रा यांच्या तावडीतून तो सुटू शकला नाही.


      या सगळ्या प्रकरणात आमचा काही सहभाग असेल याची साधी शंकाही कोणाला आली नाही. किंबहुना आम्ही ती येणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली.


                    © सुरेश इंगोल