Monday 11 April 2016

चिमखडे बोल.....

   पाहुणे जायला निघाले. निरोप द्यायला सगळे बाहेर आले. पण घाई कोणालाच नव्हती. सुनंदा एका बाजूला सौ.सोबत माहेरच्या गोष्टीत रमली. माझा मुलगा व सून त्यांच्या मुलाशी व सुनेशी गप्पा मारत होते. मुले झाडाभोवती शिवाशिवी खेळत होती. मी व पाहुणे बोलत बोलत टेरेसवर आलो.

     संध्याकाळचे सोनेरी ऊन पसरले होते. भोवतालचे दृष्य पाहून सुभाषरावांच्या चेह-यावर प्रसन्नता उमटली.  " वा सर ! निसर्गाच्या सान्निध्यात राहायला मिळण्यासारखे भाग्य आम्हा शहरी लोकांना कुठून मिळणार ?"
मी हसलो. त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणालो, ' येथे घर बांधायला सर्वांचाच विरोध होता. मुलांना शहरात राहायला हवे होते. बायकोला एवढे मोठे घर नको होते. मोठ्या घराचे काम तिच्याने होत नव्हते. मी येथे वीस वर्षे भाड्याच्या घरात काढली. दोन खोल्यांच्या लहान लहान घरात अडचणी सोसत मुलांना वाढवले. तेव्हाच मनाशी खूणगाठ बांधली होती की जेव्हा स्वत:चे घर बांधीन तेव्हा मोठे प्रशस्त बांधीन."
    " तुमची इच्छा पूर्ण झाली म्हणायची. "
   " सर्वांचा विरोध पत्करून मी हे घर बांधले. वास्तुपूजनाला येणा-या सर्वच लोकांनी जेव्हा घर व परिसराची प्रशंसा सुरु केली तेव्हा घरातला विरोध मावळला."
   
    आम्हाला पाहून सगळेच टेरेसवर आले.  मुले अवती भवती बागडू लागली. आमच्या संभाषणात भाग घेत सौ म्हणाली, " खरेच आधी माझा विरोध होता. पण यांना कर्मभूमी सोडायची नव्हती. येथे सगळे जिव्हाळ्याचे लोक आहेत. अडीनडीला धावून येतात."
" ताई, सर्वात महत्वाचे म्हणजे मुले काही तुमच्यासोबत राहणार नव्हती. नोकरीधंद्यानिमित्ताने दूर कोठेतरी जाणारच होती ना !" सुभाषराव म्हणाले.
" हो ना ! निवृत्त आयुष्य निवांत काढण्यासाठी याहून दुसरा मार्ग नाही असे मला वाटते. आता सणांच्या निमित्ताने तीन ही मुले आपापल्या कुटुंबासह येतात. घर आनंदाने नाचू लागतं. पुढच्या वेळी जेव्हा मुले येतील तोपर्यंत सगळ्या स्मृती घर जपून ठेवतं. तुम्हाला सांगतो सुभाषराव....घराला मन असतं. घर माया लावतं. ओढ लावतं. त्याच ओढीने मुंबई असो की सौदी असो, मुलं घरी येण्याचे प्लॅनिंग करतात. पुन्हा पुन्हा येतात. खूप बरं वाटतं."

      मी जरा जास्तच भावुक झालो होतो. वातावरणाला हलके करण्यासाठी सुभाषरावांनी विषय बदलला.

" बाकी काही म्हणा सर, येथून आजूबाजूचे दृष्य अगदी नयनरम्य दिसते. एका बाजूला नॅशनल हायवे नं. ६ वरुन सतत सुरु असणारी वाहनांची वर्दळ, उत्तर आणि दक्षिणेकडे असणा-या टेकड्या...समोर पसरलेली भातशेती... वा ! केवळ अप्रतिम ..."

     सर्वजण टेकड्यांकडे बघू लागले. मधेच सुभाषरावांचा मुलगा म्हणाला, " अरे इतर टेकड्यावर झाडे व किती छान हिरवळ आहे. ही एकच टेकडी कां बरं बोडकी आहे ? "
माझा सहा वर्षांचा नातू शौर्य चटकन म्हणाला,-" काका, ती रिकामटेकडी आहे."

    सर्वजण खळखळून हसू लागले.

                               ....... सुरेश इंगोले.

Thursday 7 April 2016

वेशीवर पावसाच्या
आल्या सरीवर सरी
चिंब भिजले झोपडे
डोळे कोरडेच तरी ॥

Monday 4 April 2016

वो  कौन  था ?

            दोन तीन वर्षापुर्वीची गोष्ट.  मुंबईहून नागपूरला यायला निघालो तेव्हा मुलाचा फोन आला ," बाबा, मी आवश्यक कामासाठी अमरावतीला जात आहे मित्रासोबत. कार नागपूरला आत्याकडे ठेवली आहे." आम्ही दोघेही नागपूरला सकाळी ९.०० वाजता उतरलो. बहिणीकडे गेल्यावर तिने काही लवकर जाऊ दिले नाही. जेवण, आराम, गप्पा यातच दिवस गेला. संध्याकाळी दोघेही कारने शहापूरला जायला निघालो.

             अवघा ५० कि.मी.चा प्रवास. त्यातच नागपूर - भंडारा चौपदरी रस्ता झालेला. तरी संध्याकाळची गर्दीची वेळ असल्यामुळे नागपूरबाहेर पडायला सहा वाजले. एकदा हायवेला लागल्यावर गाडी सुसाट सोडली. एफ एमवर मस्त गाणी लागलेली. बायकोला गमतीने म्हटले, " काय मग ? लाँग ड्राईव्हचा फील येतोय ना ! "
ती हसून म्हणाली, " पन्नास किलोमीटर....लाँग ड्राईव्ह...छान ! "

            अर्धा रस्ता पार होईपर्यंत अंधार गडद झाला. सुसाट वेगातल्या गाडीला एकाएकी जोरात झटका लागला. गाडी डिव्हायडरला धडकलीच असती पण...... कशीबशी कंट्रोल झाली व हेलकावत बाजूला थांबली. बराच वेळ बसूनच राहिलो. छातीची धडधड कमी होताच खाली उतरलो. मागचे उजवीकडचे चाक बसले होते. स्टेपनी बदलणे भाग होते. पण मदतीला कोणीच नव्हते. स्टेपनी, जँक सगळे बाहेर काढून ठेवले. थोडा प्रयत्नही करून पाहिला. पण स्क्रू एवढे टाईट होते की हलायलाच तयार नव्हते.  ती खाली उतरली होती. तिला म्हटले, " तू गाडीतच बसून रहा. आतून दार बंद करुन घे. मी मदतील कोण भेटतो का ते पाहतो."

            ती आधी तयारच नव्हती. आजूबाजूला दाट झाडे व माकडांचा हैदोस सुरु होता.  रहदारी सुद्धा तुरळक होती. ती गाडीत बसताच मी आधी समोर गेलो. तिकडे कोणीच नव्हते. मग मागे आलो. परत तिला धीर देऊन मागच्या बाजूला डिव्हायडर ओलांडून रस्ता पार केला. थोड्या अंतरावर एक पेट्रोल पंप दिसला. तेथे एक झोपडी होती. बाहेर टायर वगैरे ठेवलेले होते. मोठ्या उमेदीने मी तेथे गेलो. एक विशीतला पोरगा दिसताच मी त्याला सगळी आपबीती सांगितली. " मालक बाजारमें गये है सब्जी खरीदने. ये छोडके मै कैसे आ सकता हूँ ?" मी त्याला मदतीची विनंती करताच तो तयार झाला. झोपडीचे दार टेकवून तो माझ्यासोबत आला. गाडीपाशी येताच तिने आवाज दिला. ती खूपच घाबरली होती.

            त्याने ताकदीने स्क्रू काढून स्टेपनी बदलली. डिकीत चाक व सामान ठेवून म्हणाला, " साब, स्टेपनी जल्दी बना लेना. वो टायर कमजोर है. " तो जायला निघाला तसा मी खिशात हात घातला. खिशात पाचशेचीच नोट होती. मी त्याला म्हणालो, " मुन्ना, तुम गाडी में बैठो. मै तुम्हे पेट्रोल पंप पर छोडता हूँ. तुम्हे पैसै भी तो देने है."
   " नही साब, पैसे नही होना. मँडमजी डर रही है. आप जल्दी निकल जाईये." एवढे बोलून तो झपझप डिव्हायडर ओलांडून अंधारात नाहीसा झाला. मला फार चुटपुट लागून राहिली. कार स्टार्ट करून मी पुढे निघालो. माझी चुकचुक ऐकून ती म्हणाली, " तुम्ही नेहमीच तर नागपूरला जात असता. मुद्दाम गाडी थांबवून त्याला पैसे देऊन टाका. बिचारा देवासारखा धावून आला." आता स्पीडवर कंट्रोल आले होते. सावकाश घरी पोचलो.

               दोन तीन दिवसांनी मित्रासोबत नागपूरला जायचा योग आला. वडोदा गांव येताच मला त्याची आठवण झाली. मी मित्राला पेट्रोल पंपजवळ गाडी थांबवायला सांगितली. खाली उतरून मी त्या झोपडी जवळ गेलो. दार बंद होते. आजूबाजूला कोणीच नव्हते. पेट्रोल पंपवर जावून चौकशी केली तेव्हा कळले की तेथे कोणी मुलगा काम करीत नाही. पंक्चर दुरुस्तीवाला गावी गेला होता. मी परतलो.
             ........ नागपूरला जाताना अजूनही त्या पेट्रोल पंपजवळ येताच मला त्या मुलाची आठवण येते. तो कोण होता हे गूढ काही उकलले नाही. फक्त त्याच्या दीर्घायुष्याची कामना करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय आहे ?

                                                                            *****  सुरेश इंगोले  *****