Wednesday 21 December 2016

सहज सुचलेलं.....मनातलं.....

                 सोशिकपणाबद्दल आम्ही भारतीय विश्वप्रसिद्ध आहोत......कोई शक ?

           प्राचीन काळापासून अनेक राजे आलेत...अन्याय करुन गेलेत. आम्ही निमूट सहन केले.

           शक आले, हूण आले, मंगोल,मोगल, पोर्तुगीज आले.
फ्रेंच आले, इंग्रज आले...
           
            आम्ही उदार मनाने त्यांना आपले राज्य दिले. आपल्यावर अत्याचार करण्याची परवानगी दिली. त्यामुळे सोशिकपणा वाढतो हे जगाला दाखवून दिले.

           मग आम्हाला वाटले...परक्यांचा अत्याचार पाहिला, साहिला....आता आपल्यांचाच अत्याचार सहन करून पाहू.

           परक्यांना हुसकावून आम्ही आपले राज्य स्थापन केले.
आणि त्यांच्या अत्याचारासाठी सज्ज झालो.

           कायदा-नियम धाब्यावर बसवून, निरनिराळ्या क्लृप्त्या लढवून मनमानी करण्याची अनेक तंत्रे शोधली जाऊ लागली.
अनेक आमिषे दाखवून आवळा देऊन कोहळा काढण्याची किमया केली जाऊ लागली.

          ..... आणि आम्ही निमूटपणे सहन करीत आलो.
         
          आजही तेच सुरू आहे.

           आम्ही पै-पैशासाठी दिवसभर रांगेत उभे राहतो. पैसा मागच्या दाराने करोडोंच्या संख्येत मूठभरांच्या खिशात जातो.

           आम्ही हीन - दीन होऊन मंदिरात माथे टेकवून नवसाला जवळ असले-नसले पैसे पेटीत टाकतो. मंदिराच्या कोषागारात अब्जावधी रुपये, सोने-नाणे, हिरे-जवाहिर अगदी बेहिशेबी पडलेले असतात.

            आम्हाला अजूनही असं वाटत असतं की यातून चांगले काही तरी निष्पन्न होईल.

           अच्छे दिन येतील...

         .... नाहीतरी सोशिकपणाबद्दल आम्ही विश्वप्रसिद्ध आहोतच....

                                 *** सुरेश इंगोले ***

No comments:

Post a Comment