Sunday 26 February 2017

थोरांचा सहवास =:= तात्याराव सावरकर //आचार्य अत्रे

             मुंबईत नोकरीला लागलो १९६६च्या फेब्रुवारीत. हळूहळू रुळलो. मित्र तयार होऊ लागले. असाच एक मित्र नंदा प्रधान...सांताक्रूझ विमानतळावर नोकरीला होता.

            बहुधा  जून-जुलै महिना असावा. नंदाने सांगितले की तात्याराव सावरकर खूप आजारी आहेत. मी विचारले," स्वातंत्र्यवीर सावरकर ?" त्याने होकारार्थी मान हलवली. मी त्याचा हात घट्ट धरून म्हटले," नंदू, मला त्यांना पहायचंय...भेटायचंय !"
         
             शनिवारी दुपारी मी ऑफिसमधून आलो. नंदाला सुटी होती. मी दिसताच तो म्हणाला," चल, येतोस सावरकरांना पहायला ?"
              मी उलट्या पावली निघालो. घराजवळच शिवाजी पार्क होते. वळसा घालून आम्ही एका लेनमध्ये शिरलो. दुपारी सगळीकडे निवांत शांतता होती. एका घराच्या पाय-या चढून आम्ही वर आलो. दार लोटलेले होते. खिडकीतून पाहिले. पलंगावर स्वा. सावरकर शांत झोपलेले होते. बाजूच्या आरामखुर्चीवर एक धिप्पाड व्यक्ती डोळे मिटून पहुडली होती.

             नंदा माझ्या कानात कुजबुजला," ते कोण आहेत माहिताय्.?" मी नाही म्हटले. "आचार्य अत्रे !"
 मी चकित झालो. मी अत्रेंचे बरेच साहित्य वाचले होते. मराठा त्यांच्या खुसखुशीत लिखाणामुळे माझे आवडते दैनिक होते. आज या दोन्ही थोर दिग्गजांना भेटल्याशिवाय जायचेच नाही असा मी चंग बांधला. पण नंदा पुढाकार घेईना. आपण चुकीच्या वेळी आलो असे तो म्हणू लागला. मी धीर एकवटला. आणि दारावर हळूच टकटक केले.
           
            छातीत धडधड वाढली होती. थोड्या वेळाने दार उघडले. दारात आचार्य अत्रे उभे होते. सहा फुटाहून उंच व धिप्पाड अशा त्यांच्या देहाकडे पाहून आपले खुजेपण जाणवत होते. " काय रे, कोण तू ? यावेळी कां आलास ?"  त्यांच्या साध्या बोलण्यातही जरब जाणवत होती. मी क्षणभर गांगरलो. मग धीर एकवटून म्हणालो," मी नागपूरहून आलोय. तात्यारावांचे दर्शन घ्यायचंय.." त्यांनी माझ्याकडे रोखून पाहिले. मग दारातून बाजूला होत ते म्हणाले," त्यांची झोपमोड करू नकोस. जा !" मी आणि नंदा आत आलो. पलंगावर एक थोर व्यक्तिमत्व शांत झोपलं होतं. त्यांची कृश काया व शांत चेहरा पाहून हेच का ते अंदमानातून समुद्र पोहून येणारे अशी शंका मनात आली. त्यांच्याविषयीच्या कथा आठवून मी रोमांचित झालो. त्यांची मूर्ती डोळ्यात साठवून घेऊ लागलो. हळूच त्यांच्या पायावर माथा टेकविला. त्यांनी किंचित चुळबुळ केली. मी चटकन बाजूला झालो. नंदाने घाबरून दुरूनच नमस्कार केला.

             आम्ही दाराशी आलो. मी चटकन वाकून अत्रेंना नमस्कार केला. मला हात धरून उठवीत ते म्हणाले," काय म्हणतात आमचे कंडमवार ? आणि अनिलांना ओळखतोस का?"
         मी म्हणालो, "अनिल म्हणजे आ.रा.देशपांडे ना? त्यांच्या कविता खूप आवडतात. त्यांच्या घराकडे धंतोलीला मी बरेचदा गेलो पण भेटायचे धाडस झाले नाही. "
          "आज केलेस ना धाडस ? तसेच करायचे. कन्नमवार खूप चांगले आहेत. मुख्यमंत्रीपद गाजवलंय त्यांनी.."
         
            मी चकित झालो. मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर अत्र्यांनी कायम टीका केली होती. माझ्या पाठीवर थोपटून त्यांनी आम्हाला रजा दिली.

          त्यानंतर आचार्य अत्र्यांची दोनदा भेट झाली. प्लाझामध्ये व्ही शांताराम यांच्या ' इये मराठीचिये नगरी' या चित्रपटाच्या प्रीमियरप्रसंगी गेटवरच भेटले. मी नमस्कार करुन नाव सांगताच तू  'नागपूरचा ना' अशी विचारणा केली. मला कृतकृत्य वाटले.

                                         * * * सुरेश इंगोले * * *

No comments:

Post a Comment