Monday 9 October 2017

..#कुबेर _लग्नसोहळा..

          लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हणतात. खरे असावे ते. माझा तरी यावर विश्वास आहे. भावंडात मी वडील मुलगा म्हणून जबाबदा-या खूप. १९व्या वर्षी मी मुंबईला नोकरीस लागलो. पण तीन वर्षातच वडिलांनी नोकरी सोडून बोलावले. नोकरी करतो म्हणून मुली सांगून येत होत्या पण बहिणींची लग्ने झाल्याशिवाय लग्न करायचे नाही असे मी ठामपणे सांगितले होते. शेवटी १९७५ साली वडिलांनी फर्मान सोडले. मी तुमच्याकरिता वधूसंशोधन करायला जात आहे. मी आणि माझा चुलत भाऊ दोघांचेही लग्न एकाच वेळी करायचे दादाजींनी ठरवले होते.( वडिलांना आम्ही दादाजी म्हणत असू.)
             एक दिवस त्यांनी फर्मान सोडले, " अमरावतीला दोन मुली मी निवडून ठेवल्या आहेत. दोन दिवसांनी जावयासोबत जाऊन त्या मुली पसंत करून या." वडिलांसमोर काही बोलायची सोय नव्हती.
                 आम्ही अमरावतीला गेलो. पहिल्या घरी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. बुजरेपणा आणि संस्कार यामुळे मी धीटपणे मुलीकडे पाहू शकलो नाही. मेहुण्यांनी तिला जुजबी प्रश्न विचारले. कार्यक्रम आटोपला. तेथून लगेच दुसरी मुलगी पाहायला निघालो. वाटेत मेहुण्यांनी आम्हाला विचारले, " कशी वाटली मुलगी ?" मी काही बोलू शकलो नाही पण माझा भाऊ लगेच उत्तरला," मला वहिनी म्हणून पसंत आहे."
मला चॉईसच उरला नाही. मुकाट्याने दुसरी मुलगी मला भावससून म्हणून पसंत करावी लागली. अशा त-हेने हिच्याशी माझी जन्माची गाठ पडली.
                   ३० मे १९७५ साली वयाच्या २८व्या वर्षी आम्ही बंधनात अडकलो. ४२ वर्षानंतरही .....आम्ही आजही काया-वाचा-मनाने एवढे एकरूप आहोत की जोडीदार म्हणून दुस-या कोणाचा विचारही मनाला शिवला नाही.
                                  सुरेश इंगोले

No comments:

Post a Comment