Monday 15 February 2016

** घरकुल **

 आज मी खरेच अवाक् झालोय्. !
सर्वसामान्यांप्रमाणे जीवन घालवणारे आपण ....शिकतो, नोकरी किंवा उद्योग करतो. लग्न करतो, कुटुंबाच्या रहाटगाडग्यात गुंतवून धेतो. काळजी, संकटे, ओढाताण या फे-यातून काही आनंदाचे क्षण शोधण्याचा प्रयत्न करतो. शरीर धडधाकट असतं. मन, बुद्धी शाबूत असते. त्या दृष्टीने आपण श्रीमंत असतो.
         पण .... शरीराच्या एखाद्या अवयवाला अपंगत्व आले तर काही अंशी कुटुंबावर अवलंबून असतो. असे अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सहाय्याद्वारे स्वावलंबी होऊ शकतात.
             परंतु ' मतिमंदां ' च्या बाबतीत ' समजणं ' ही प्रक्रियाच नसते. त्यामुळे ते पालकावर सर्वस्वी अवलंबून असतात. तीव्र मतिमंदत्व असेल तर त्यांना जगविण्याची जबाबदारी पालकांवर येते. अशावेळी आई वडील नसले तर.... त्यांचा सांभाळ इतर नातलग कसोशीने करु शकत नाही.
                डोंबिवलीत 'खोणी ' या गावी अशा मतिमंद व्यक्तींचा सांभाळ तहहयात करण्यासाठी पालकांनी एकत्र येऊन ' अमेय पालक संघटना ' ही संस्था स्थापन केली आहे. शासनाकडून कोणतेही अनुदान न घेता सुजाण व सहृदय हितचिंतकांच्या पाठबळावर सुरु आहे.
              आज ' कुबेर ' स्नेही चंदूकाका सीएम जोशी यांच्यामुळे मला या ' घरकुलाला' भेट देण्याचा योग आला. आणि मी खरेच धन्य झालो. मतिमंदांच्या विश्वात डोकावण्याची, त्याना जाणून घेण्याची संधी प्राप्त झाली.
                 उजाड माळरानावर अथक परिश्रमाने आज नंदनवन फुलले आहे. प्रशस्त इमारत, अतिशय नीटनेटका परिसर, फळझाडे, फुलझाडे, बाग मन मोहून घेते.
          अविरत सेवा देणारे श्री अशोक वल्लभदास यांनी पूर्ण इमारत व परिसर फिरून दाखवला. तिथल्या मुलामुलींना पाहून, भेटून  मी स्तिमित झालो. अतिशय स्वच्छ, नीटनेटके आणि शिस्तबद्ध वागणे पाहून मला सामान्यांशी तुलना करण्याचा मोह आवरला नाही. त्यांचे स्वच्छ टॉयलेट पाहून मला सार्वजनिकच नव्हे तर इतर कोणत्याही संस्थेतल्या टॉयलेटची आठवण आली.
       मुदपाकखाना, भोजनगृह पंचतारांकित टापटिपीचे ! काही विद्यार्थ्यांना स्वत:च्या हाताने जेवताही येत नाही. तिथलीच एक मतिमंद मुलगी त्याला आपल्या हाताने भरवीत होती. ते पाहून माझे डोळे पाणावले. काका, काका करीत मुले बिलगत होती तेव्हा जाणवले की यांना फक्त मायेचा ओलावा हवा आहे. काही मुले तिशी, चाळिशी ओलांडलेली सुद्धा आहेत. प्रथम दाखल होणारा प्रकाश शेनोलीकर म्हणतो की ही इमारत मी बांधली तेव्हा त्याचे कौतुक वाटते कारण भूमीपूजनाची पहिली कुदळ त्याने मारली असते. येथल्याच एका मुलीने चित्रपटात काम केले म्हटल्यावर तुम्हाला ती व तो चित्रपट आठवला असेलच....
                खरंच मित्रांनो.... आपल्या भेटीने या मुलांना एक वेगळाच आनंद व समाधान मिळते. आपण आपल्या मुलांना यांना भेटायची, यांचे आयुष्य जाणायची एक संधी द्या. मला खात्री आहे की तुम्ही तुमच्या मुलांवर दुपटीने प्रेम करु लागाल.
       
सुरेश इंगोले**

No comments:

Post a Comment