Wednesday 17 February 2016

                      *  घाटातला    देवदूत.  *
                      ===============

                 वकील साहेब अकोल्याहून नागपूरला जायला निघाले तेव्हाच चार वाजायला आले होते. आज उशीर होणार नक्कीच ! शिवाय त्यांचा सहकारी आज येऊ शकला नव्हता. उद्या हायकोर्टात महत्वाची केस होती. ते एकटेच कार ड्राईव्ह करीत सुसाट निघाले होते. मधे कुठे थांबायची त्यांची इच्छा नव्हती. तळेगांवचा घाट लागला आणि  गाडी झटके मारू लागली. ऐन घाटाच्या अवघड वळणावर गाडीने आचके दिले.  गाडी बाजूला घेऊन ते खाली उतरले.  गाडीचे बॉनेट उघडून त्यांनी पाहिले. कार खूप गरम झाली होती. तसंही त्यांना गाडीचं काहीच तंत्रज्ञान माहीत नव्हतं. अंधार पडला होता. तुरळक वाहतुक सुरु होती. त्यांनी एकदोन वाहनांना हात देऊन पाहिला. पण त्या अवघड वळणावर कोणी थांबायला तयार नव्हते. काय करावे त्यांना काही सुचेना.
                  तेवढ्यात बाजूच्या दरीतून घाट चढून कुणीतरी रस्त्यावर आले. जवळ आल्यावर तो एक पंचविशीतला तरुण असल्याचे वकीलसाहेबांना दिसले. गोरापान, साधारण उंचीचा, मागे वळवलेले काळेभोर केस, सरळ नाक आणि हसतमुख चेहरा. त्याला पाहून त्यांना एकदम हायसे वाटले.
" काय साहेब, गाडी बिघडली वाटते ?" त्याने हसून विचारले.
" होय रे बाबा ! काय झाले काही कळत नाही. मला त्यातले काही कळतही नाही. " वकील साहेब हताशपणे उद्गारले.
" मी पाहू का ? " त्याने अदबीने विचारले.
" अरे वा ! उपकार होतील रे बाळा..." ते आनंदाने म्हणाले.
" उपकार कायचे त्याच्यात साहेब ? आपलं कामच आहे हे..तुम्ही दूर उभे राहा साहेब. "असे म्हणून त्याने त्याच्या खिशातून अवजारं काढली व तो कामाला लागला. वकील साहेबांनी खिशातून सिगारेटचे पाकीट काढले तोच तो म्हणाला, " साहेब, प्लीज सिगारेट नका पेटवू. मला वास सहन होत नाही." त्यांनी पाकीट खिशात ठेवून दिले. ते सहज त्याच्याशी गप्पा मारू लागले. त्याचे नाव संजय होते. थोड्याच वेळात त्याने कार स्टार्ट करायला सांगितली. वकीलसाहेबांनी कार सुरू केली. ती सुरू होताच त्यांना आनंद झाला. ते खाली उतरले व त्यांनी पाकीट काढून काही पैसै दत्याला देऊ केले. तो नम्रतेने नकार देऊन दरीकडे जाऊ लागला.  "अरे संजय, तू राहतोस कुठे ? चल, मी तुला सोडतो ना " त्यांनी विचारताच तो सहज म्हणाला, " माझी येथे खालीच झोपडी आहे." दरी उतरून तो नाहीसा झाला.
              वकील साहेबांनी पुढे प्रवास सुरु केला. घाट उतरताच सारवाडी गाव लागले. त्यांनी गाडी थांबवली. एका हॉटेलमधे येऊन त्यांनी चहाची ऑर्डर दिली. हॉटेलमालक बोलघेवडे होते. त्यांनी चौकशी करयला सुरवात केली. वकील साहेबांनी गाडी घाटात बिघडल्याचे सांगताच ते म्हणाले, " मग कशी दुरुस्त झाली ?" " एक तरुण मुलगा आला व त्याने चटकन दुरुस्त केली." त्यांनी असे म्हणताच हॉटेल मालकांनी त्याचे वर्णन करुन म्हटले, " संजय नाव होते का त्याचे ?"
" होय हो ! फार गुणी मुलगा. सालस स्वभावाचा. एक पैसा सुद्धा घेतला नाही. "
" खरेच गुणी मुलगा होता बिचारा... कोणाचेही काम करायचा. नेहमी हसत राहायचा."
"म्हणजे..." वकीलसाहेबांनी दचकून विचारले.
" बाजूच्या कारंजा गावातला होता तो. क्लीनर म्हणून ट्रकवर लागला. सगळी कामं शिकून घेतली त्यानं."
" होता म्हणजे.....?" वकील साहेबांचा आवाज घशातच विरला.
" दोन वर्षांपुर्वी घाटात त्याच ठिकाणी त्यांचा ट्रक उलटला व दरीत कोसळला. कोणीच वाचले नाही."
वकीलसाहेबांना दरदरून घाम फुटला. म्हणजे...... म्हणजे ....तो.... संजयचे भूत ....!
हॉटेल मालकांनी वकीलसाहेबांना पाणी पाजले. धीर दिला. " बघा साहेब, आजही तो तेथे एखादी गाडी बिघडली तर दुरुस्त करुन देतो. कधी कोणाला त्रास दिला नाही. तुम्ही घाबरू नका. त्याने तुम्हाला मदतच केली आहे. "
वकील साहेबांनी हॉटेल मालकांना एका ड्रायव्हरची सोय करायला सांगितली. ते आता गाडी चालविण्याच्या मन:स्थितीत नव्हतेच.
        रात्रभर ते दचकून उठत होते. सकाळी जरा फ्रेश वाटताच त्यांनी मित्राला कळवून प्रेस कॉन्फरन्स बोलावली व सर्व वृत्तांत कथन केला.
        दुस-या दिवशी सर्व वृत्तपत्रात ही बातमी छापून आली.

( १९६२-६३ मधे घडलेली सत्यघटना.)


                                                                  ----  सुरेश इंगोले ------

No comments:

Post a Comment